बाजारातून आणलेल्या फळ भाज्यांवरील कीटकनाशके काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
भाज्या आणि फळे ह्या जीवनावश्यक गोष्टी आहेत. चौरस आहारात कोणत्या भाज्या, फळे असावीत याची गणतीच घरातील आजी आणि आई, काकवा, माम्या सांगत असतात. आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट हे त्यांना अनुभवावरून कळते म्हणूनच त्या आग्रही असतात. त्यामुळे भाज्या, फळे खाल्लीच पाहिजेत पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायला हवी ती म्हणजे फळे आणि भाज्यांची उत्तम स्वच्छता.
भाज्या, फळे यांच्यावर कीडनाशके (pesticides) फवारलेली असतात. उत्तम पीक येण्यासाठी जशी खते वापरतात तसेच किडनियंत्रणासाठी किटकनाशक वापरतात. हल्ली त्यात रासायनिक औषधांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.
नाही म्हणायला सेंद्रीय खते, कीडनाशकेही वापरली जाताहेत. पण भाज्या, तयार फळे यांच्यावर या कीडनाशकांचा एक थर असतो. नजरेला तो भले कळणार नाही पण तो असतोच. तसेच वाढते प्रदुषण, धूळही त्या भरीला आहेच. त्यामुळे भाज्या फळे नुसती पाण्याखाली धुवून घेतली तर उपयोगाचे नाही.
घरी भाज्या धुताना काही गोष्टींचा वापर करून त्या स्वच्छ करता येतील. पाण्याखाली भाज्या धुतल्याने त्यांची केवळ 20 टक्के स्वच्छता होते असे म्हणतात, मग उरलेल्या 80 टक्क्यांच्या स्वच्छतेसाठी खालील उपाय करून पाहूया. अगदी 100 टक्के नाही तरी जास्तीत स्वच्छ भाज्या कोणाला नको असतील.
बाजारातून आणलेल्या भाज्या,फळांवरील कीटकनाशक काढून टाकण्यासाठी टिप्स (Tips to remove pesticides from fruits and vegetables)
मीठाचे पाणी (Salt Water)
हा घरगुती उपाय माझी आजीदेखील करत असे हे मी पाहिले आहे. फ्लॉवरचे तुरे, मटार दाणे, निवडलेल्या शेंगा आदी भाज्या ती याच पद्धतीने धुवत असे. तेच अनुकरण मीही करतेय. फक्त त्यात बदल असा की पाणी थोडे गरम करून घेते. खळाखळा उकळायची गरज नाही, अतिगरमही नाही. मग त्यात मीठ घालायचे, ढवळून त्यात ह्या निवडलेल्या भाज्या (vegetables) घालून वीस मिनिटांनी पाणी काढून टाकायचे. स्वच्छ पाण्याने पुन्हा दोन वेळा धुवून घ्यायचे.
पालेभाजी धुताना मात्र गार पाण्यात मीठ विरघळवून मग त्या पालेभाजी वीस मिनिटे बुडवून ठेवायची. मग दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यात बुडवून धुवून निथळून घ्यायची.
व्हिनेगरचा वापर (Vinegar)
व्हिनेगर हे देखील उत्तम जंतुनाशक म्हणून काम करू शकते. त्यासाठी भाज्या मावतील एवढे मोठे भांडे घ्यावे. त्यात एक भाग व्हिनेगर घालावे आणि चार भाग पाणी घालावे. ते मिसळून त्यामध्ये जी फळे किंवा भाज्या (fruits or vegetables) धुवायची आहेत ती वीस मिनिटे बुडवून ठेवावी. भाज्या या द्रावणात व्यवस्थित बुडल्या पाहिजेत. व्हिनेगरमुळे भाज्यांवरील जीवाणू नष्ट होतात.
व्हिनेगरच्या पाण्यातून काढून फळे, भाज्या पुन्हा दोन वेळा साध्या पाण्याने अवश्य धुवून घ्या. व्हिनेगरमुळे 98 टक्क्यांपर्यंत भाज्या आणि फळांवरील जीवाणू कमी होतात, असे सांगितले जाते.
व्हिनेगर आहारातही सेवन केले जात असल्याने त्याचा वाईट परिणाम होणार नाहीच. काही नाजूक फळे जसे संत्री, बेरी वर्गातील फळे या द्रावणात ठेवल्यास त्याच्या वरच्या पातळ भागावर परिणाम होऊ शकतो. कारण ही फळे सच्छिद्र असतात.
बेकिंग सोडा आणि पाण्याचे द्रावण (Baking Soda)
हा उपाय बहुतेक घरांमध्ये वापलेला असू शकतो. भजी, ढोकळा, केक किंवा बिस्किटे आदी बेकरी पदार्थांमध्ये वापरला जाणारा बेकिंग सोडा किटकनाशकांचा प्रभाव कमी करण्यासाठी उत्तम मानला जातो. साधारण तीन लीटर पाण्याला 28 ग्रॅम बेकिंग सोडा घालावा. ते द्रावण मिसळून घ्यावे आणि त्यामध्ये भाज्या वीस मिनिटे बुडवून ठेवाव्यात. त्यानंतर साध्या पाण्याने दोन वेळा धुवून घ्याव्यात.
जर सलाड स्पिनर असेल तर निवडलेली पालेभाजी, पाणी आणि बेकिंग सोडा घालून ते एक मिनिटभरासाठी फिरवून त्यात पालेभाज्या सहजपणे स्वच्छ करू शकता. सलाड स्पिनर नसले तर वरील पारंपरिक पद्धत आहेच.
थंड पाणी (Cold Water)
भाज्या आपण नेहमीच थंड पाण्याने धुतोच. काही संशोधनातून असे निष्कर्ष मिळाले आहे की थंड पाण्यानेही भाज्य़ांवरील कीटकनाशकांचे (pesticides) थर धुतले जाऊ शकतात. 12 किटकनाशकांपैकी 9 किटकनाशकांचे थर निघून जाऊ शकतात, असे सिद्ध झालेले आहे.
साल काढणे (Peeling)
भाज्या धुवून घेऊन त्यांची साल काढून वापरणे हा देखील किटकनाशकांचा थर काढून टाकण्याचा उपाय होऊ शकतो. पारंपरिक पद्धतीच्या काही भाज्या करताना आपण साले काढून टाकत असतो. त्यामुळे भाज्यांच्या वर चिकटलेला किटकनाशकांचा थर नक्कीच काढून टाकला जाऊ शकतो. उदा. दुधीभोपळा, लाल भोपळा, बटाटा ह्या भाज्या तर सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळिंब यांची साले काढून टाकूनच ती फळे (fruits) सेवन केली जातात.
त्या व्यतिरिक्त भाज्या कच्च्या न खाता व्यवस्थित शिजवून खाल्ल्या तरीही किटकनाशकांचा प्रभाव नष्ट होतो. 2020 हे वर्ष कोरोनाच्या दहशतीखालचे असल्याने प्रत्येक गोष्टीत स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे बाहेरून भाज्या आणल्या नंतर त्या अशा प्रकारे निर्जंतूक करणे दोन्ही दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.