पायावरून ४९ ट्रेन जाऊन सुद्धा अरुणिमा सिन्हाने माउंट एव्हरेस्ट सर केला
Arunima Sinha माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली अपंग महिला
अरुणिमा सिन्हा हे नाव आपल्या पैकी कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल. आयुष्यात अनेक खाच-खडगे येतात, त्यावर मात करत आपल्याला समोर जायचं असते. आयुष्यामध्ये संघर्ष करत असताना आपल्या ध्येयाकडे कशी आगेकूच करायची हे आपल्याला अरुणिमा सिन्हा हिच्या संघर्ष गाथेवरुन लक्षात येते. अरुणिमा सिन्हाच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे तिचे आयुष्य पूर्णतः बदलले.
अरुणिमा सिन्हाचा अपघात (Arunima Sinha train accident)
अरुणिमा सिन्हाचा जन्म उत्तरप्रदेश राज्यात एका छोट्याश्या खेडेगावात झाला. ती राष्ट्रीय स्तरावरची व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून सुद्धा प्रसिद्ध होती. १२ एप्रिल २०११ रोजी ती लखनऊ वरून दिल्लीकडे प्रवास करत होती. प्रवासा दरम्यान काही गुंडांनी तिची बॅग व गळ्यातील चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार केला असता तिचा त्या गुंडांबरोबर संघर्ष झाला आणि त्या गुंडांनी तिला चालत्या ट्रेनमधून दुसऱ्या रेल्वे ट्रॅक वर फेकले. Arunima Sinha ट्रॅक वर पडली असता विरुद्ध दिशेने एक भरधाव ट्रेन येत होती. रात्रीची वेळ असल्यामुळे चालकाच्या काही लक्षात आलं नाही व ती ट्रेन तिच्या डाव्या पायावरून गेली आणि ती अतिशय गंभीर जखमी झाली. रात्रभर ती मदतीसाठी याचना करत होती परंतु तिच्या मदतीसाठी कुणीही धावून आलं नाही.
जखमी अवस्थेत पडलेली असल्यामुळे तिला हालचाल करणे शक्य नव्हते आणि त्या रात्री तब्बल ४९ ट्रेन तिच्या पायावरून गेल्या. किड्यामुंग्या व उंदीर तिच्या जखमी झालेल्या पायावर येऊन मांस कुरतडत होते. सकाळी जेव्हा काही गावकऱ्यांना ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली तेव्हा तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तिथून पुढे AIIMS हॉस्पिटल दिल्ली येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले.
जवळपास ४ महिने एम्स हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालले. तिचा डावा पाय कापावा लागला तर उजव्या पायात रॉड टाकावा लागला. कापलेल्या डाव्या पायाच्या जागी एक कृत्रिम पाय बसवण्यात आला. Arunima Sinha च्या पाठीमध्ये बरेच फ्रॅक्चर होते त्यासाठी बऱ्याच शस्त्रक्रिया तिच्यावर करण्यात आल्या. उपचार सुरु असताना तिच्या डोक्यात केवळ एकच विचार येत असे आणि तो म्हणजे, इतका मोठा जीवघेणा प्रसंग माझ्या अंगावर बेतून सुद्धा मी आज जिवंत आहे म्हणजे माझ्या हातून काहीतरी इतिहास घडवण्यासाठी मला देवाने जिवंत ठेवलं असावं.
तेव्हा तिने निर्णय घेतला कि मी आता जगाला माऊंट एवरेस्ट (Mount Everest) सर करून दाखवणार. हा विचार केल्यानंतर ती सर्वप्रथम बछेंद्री पाल यांना भेटली आणि त्यांच्याकडे माऊंट एवरेस्ट सर करण्याचा मानस व्यक्त केला. बछेंद्री पाल ह्या Mount Everest सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्या अरुणिमाला म्हणाल्या,
‘तू अश्या स्थितीमध्ये हा विचार करत आहेस म्हणजे तू इथेच अर्धी लढाई जिंकली आहेस’
संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एवरेस्ट चढायला सुरुवात केली. २१ मे २०१३ हा दिवस अरुणिमाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस ठरला. याच दिवशी तिने माऊंट एवरेस्टची लढाई पूर्ण केली. नुसतच माऊंट एवरेस्ट सर करून ती थांबली नाही तर जगामधील सातही उंच शिखरावरती तिने आपला भारताचा झेंडा रोवला. तिच्या या अद्वितीय पराक्रमाबद्दल भारत सरकार ने तिला २०१५ मध्ये पदमश्री ने सुद्धा सन्मानित केले. या वरून एक गोष्ट लक्षात येते की माणूस हा कधीपण शरीराने अपंग नसतो तो मनाने अपंग असतो आणि त्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो.