सिद्दीकडून पुन्हा एकदा रायगड मराठ्यांकडे आणणारा योद्धा
आज आपण पाहणार आहोत एका झंझावाताची कहाणी, एका वादळाचा इतिहास, म्हणजेच आज आपण जाणून घेणार आहोत मराठा साम्राज्यातील एक शूर वीर, बुद्द्धीवान, बलवान, चतुर आणि युद्धवीर अशा पेशवा बद्दल
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे हिंदवी स्वराज्य याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. प्रत्येक माणसाला आठवतो शिवरायांचा प्रताप, प्रत्येकाला आठवतो शिवरायांचा एकेक मावळा, प्रत्येकाला आठवते शंभूराजांची दुर्दैवी मौत आणि त्यांचा पराक्रम परंतु, अनेकांना प्रश्न पडतो कि शिवाजी व संभाजी महाराजांनंतर स्वराज्यात एकही पराक्रमी शासक झाला नाही का ? या आणि अशा अनेक प्रश्नांना आज आपण पूर्णविराम देणार आहोत.
आज आपण पाहणार आहोत एका झंझावाताची कहाणी, एका वादळाचा इतिहास, म्हणजेच आज आपण जाणून घेणार आहोत मराठा साम्राज्यातील एक शूर वीर, बुद्द्धीवान, बलवान, चतुर आणि युद्धवीर अशा पेशवा बद्दल आणि, त्यांचे नाव आहे श्रीमंत पेशवा बाजीराव (पहिले). शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या नंतर अतिशय प्रेरणादायी असा इतिहास हा बाजीराव पेशवे यांचाच गणला जातो.
कोण होते बाजीराव पेशवा ?
१८ ऑगस्ट १७०० रोजी जन्मलेले बाजीराव हे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे थोरले पुत्र होय. लहानपणापासूनच बाजीराव वाचन, लिखाण आणि लेखांकनात उत्तम होते. लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या छायेत त्यांना कूटनीती व युद्धनीती यांचे शिक्षण मिळाले आणि इतकेच नव्हे, तर त्यांना घोडेस्वारी सुद्धा उत्तम येत होती अगदी लहान वयातच. आपल्या वडिलांसोबत त्यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये साथ दिली होती. त्यातच उत्तरेकडील मोहीम सुद्धा येते. याच उत्तरेच्या मोहिमेत बाजीरावांना उत्तरेकडील राजकारण समजण्यास खूप मदत झाली.
कसे मिळाले बाजीरावांना पेशवेपद ?
छत्रपति शाहू यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद देऊन स्वराज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली. बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर शाहूंनी ठरविले कि बाळाजी विश्वनाथ यांचा मोठा मुलगा बाजीराव याच्या हाती पेशवेपदाची सूत्रे सोपवावी. बाजीराव यांच्यावर व त्यांच्या योग्येतेवर छत्रपती शाहू यांना फार ठाम विश्वास होता. मराठा साम्राज्यातील श्रीपतराव प्रतिनिधी यांच्या अधिपत्याखाली असलेले अनेक सरदार बाजीराव यांच्या पेशवेपदाला विरोध करीत होते. बऱ्याच सरदारांनुसार बाजीराव वयाने लहान आहेत आणि त्यांनी स्वतःची योग्यतादेखील सिद्ध केलेली नाही, त्यामुळे अशा पेशवाच्या अधिपत्याखाली राहणे अनेकांना मान्य नव्हते.
छत्रपती शाहू यांना बाजीराव यांच्या प्रति असलेल्या विश्वासामुळे, अखेर बाजीराव एक पेशवा म्हणून योग्य कार्य न करून आपली योग्यता सिद्ध करण्यात अपयशी झाल्यास त्यांना शाहू स्वतः पेशवे पदावरून बरखास्त करतील या आश्वासनावर बाजीराव यांच्या पेशवेपदाला मंजुरी मिळाली. सातारा मधील मसूर येथे १७ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव यांच्या हाती पेशवेपदाची सर्व सूत्रे सोपविण्यात आली आणि बाजीरावांचा पेशवे म्हणून प्रवास सुरु झाला.
पेशवा म्हणून बाजीरावांच्या पुढील आव्हाने
पेशवेपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बाजीरावांच्या पुढ्यात अनेक समस्या आणि आव्हाने होती. सर्वप्रथम बाजीरावांना छत्रपती शाहू यांचा विश्वास जिंकायचा होता आणि अनेक मराठा सरदारांनी त्यांच्यावर जो अविश्वास दर्शवला होता तो बाजीरावांना खोटा ठरवायचा होता. कोल्हापूरचे राजे संभाजी (दुसरे) यांनी अजुनपर्यंत शाहू राजांची सत्ता मान्य केली नव्हती त्यामुळे त्यांच्यासोबत सतत संघर्ष होणार होता. निझाम-उल-मुल्क याने दक्खन वर कब्जा केलाच होता, त्यामुळे मराठ्यांनी दख्खन मधील काबीज केलेल्या प्रदेशांवर हक्क सांगणे कठीण बनले होते. या सर्व प्रश्नांना लक्षात घेऊन एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून स्वतःला सिद्ध करणे बाजीरावांना भाग होते.
सिद्दीची दाणादाण
Related Posts
बाजीरावांनी एक पेशवा म्हणून अतुलनीय कामगिरी करून दाखविली आणि इतिहासात स्वतःला अजरामर केले. निझाम-उल-मुल्क याच्याशी संघर्ष असो, काही मराठा सरदारांच्या विरोधाचा सामना करणे, जंजिऱ्याच्या सिद्दीचा पाडाव करणे, भोपाळची लढाई आणि पोर्तुगीजांना वठणीवर आणणे अशा अनेक प्रसंगात बाजीरावांनी आपले शौर्य दाखवून दिले आहे.
सिद्दी हा शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोघांचाही एक अतिशय बलाढ्य शत्रू होता. शिवाजी व संभाजी राजांनी अनेकवेळा सिद्दी विरुद्ध मोहीम आखल्या परंतु काही ना काही कारणाने त्या पूर्ण करण्यात दोघांनाही पूर्णतः यश आले नाही. अशा या मराठ्यांच्या शत्रूला पुढील काळात बाजीरावांनी मात्र चांगलाच धडा शिकविला. सिद्दीचे नौदल/आरमार अतिशय बलवान होते आणि याच जोरावर त्याचा कोंकण किनारपट्टीजवळ दबदबा होता.
औरंगजेबाने रायगड, सिंधुदुर्ग, अंजनवेल असे दुर्ग सिद्दीच्या ताब्यात ठेवले होते. मराठ्यांविरोधात अनेकवेळा पोर्तुगीझांना व ब्रिटिशांना सिद्दिनेच मदत केली होती. घटनेची सुरुवात साधारण १७२७ ची असावी, सिद्दीने स्वामी ब्रह्मेंद्र यांनी बांधलेले एक देऊळ उध्वस्त केले. हा सिद्दी सात गोवळकोट व अंजनवेल येथील गव्हर्नर होता. यामुळे बाजीरावांनी सिद्दीला लढत देण्याचे ठरविले आणि याचमार्फत गोवळकोट, अंजनवेल आणि रायगड हे देखील सिद्दीच्या ताब्यातून हिसकावण्याचा मनसुबा मनाशी होताच. मग एकाच वेळी पेशवा बाजीरावांनी सिद्दीशी पाणी व जमीन अशा दोन्ही ठिकाणी लढत दिली.
रायगड ताब्यात आला तसेच गोवळकोट, अंजनवेल देखील ताब्यात आले. अशातच या लढतीमध्ये मराठ्यांच्या बाजूने लढणाऱ्या आंग्रे या घराण्यात सेकोजी आंग्र्यांच्या मृत्यूने काही पारिवारिक भांडणे निर्माण झाली या कारणास्तव पेशवा बाजीरावांनी तात्पुरता सिद्दीशी तह केला. त्यानुसार रायगड व महाड सोडून बाकी काही भाग सिद्दीला परत देण्यात आला. पुढे मग कालांतराने पिलाजी जाधव आणि चिमाजी यांनी सिद्दी सात रेवस नजीक असतांना त्याला ठार केले आणि यामुळे जंजिऱ्याचा सिद्दी चांगलाच हादरला आणि शेवटी सिद्दीने मराठ्यांबरोबर तह केला आणि मग सिद्दीची सत्ता जंजिऱ्या पर्यंतच मर्यादित राहिली. सोबतच मराठ्यांनी रेवस, चौल व थळ देखील जिंकून घेतले.
पराक्रमी पेशवा बाजीराव
पेशवा बाजीरावांनी अतिशय तरुण वयात पेशवेपदाची सूत्रे हातात घेतली होती आणि त्यांच्या वयानुसार हि जबाबदारी फार मोठीच होती. एक पेशवा म्हणून बाजीरावांनी आपली योग्यता सिद्ध करून दाखविली. २० वर्षाच्या कालावधीत बाजीरावांनी मराठ्यांची सत्ता दक्षिण तसेच उत्तरेतही पसरविली. बाजीरावांमुळेच निझाम-उल-मुल्क याने मराठ्यांना त्यांची चौथ व सरदेशमुखी परत केली, बाजीरावांमुळेच सिद्दीसारख्या आरमारी ताकदीला वचक बसला, पोर्तुगीज़ानसारख्या विदेशी सत्तानाही धडा मिळाला.
पेशवा बाजीराव एक अतिशय उत्तम योद्धा होते. आपले सैन्य घेऊन वाऱ्याच्या वेगाने आक्रमण करून शत्रुसैन्याची दाणादाण उडविणे हि बाजीरावांची खासियत होती. पुणे ते दिल्ली हे १० दिवसांचे अंतर पेशवा बाजीरावांनी ५०० घोड्यांसोबत केवळ ४८ तासातच पूर्ण केले असे म्हंटले जाते. दिल्लीच्या मुघलांवरही बाजीरावांनी आक्रमण केले. तब्बल ३ दिवस पेशवा बाजीरावांनी दिल्लीला वेढा दिला होता. परंतु नंतर बाजीराव सैन्यासह पुन्हा महाराष्ट्रात आले.
वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी, दिनांक २८ एप्रिल १७४० रोजी पेशवा बाजीराव निधन पावले. पेशवा बाजीरावांनी मराठा साम्राज्य वाढविण्यात खूप मेहनत व शौर्य दाखविले. पेशवा बाजीरावांच्या काळात मराठा साम्राज्याची युद्धनीती उल्लेखनीय असली तरीही मराठा सरदारांच्या परस्पर बिघडलेल्या संबंधांना सोडविण्यासाठी फारसे प्रयत्न बाजीराव करू शकले नाही. मराठा साम्राज्याची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी कोणत्याही नवीन योजना बाजीरावांनी आणल्या नाहीत त्यामुळे मराठ्यांची बिघडलेली आर्थिक परिस्थिती कमकुवतच राहिली.
हे हि वाचा –
मराठा साम्राज्य निर्मितीत महत्वाची व्यकती मतवे महाराज शहाजी राजे,राजमाता जिजाबाई, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, महाराणी यसूबाई, छ.राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि पेशवे पहिले बाजीराव !
स्वराज्य मुघलांच्या हाती जाण्यापासून रोखण्यात आणि मराठ्यांची जरब पूर्वरत करण्यात तितकाच महत्वाचा वाटा आहे तो सरसेनापती. संताजी घोरपडे ह्यांना कितीही ठरवलं तरी दुर्लक्षित करू शकत नाही.. त्याच बरोबर धनाजी जाधव, सरखेल कान्होजी आंग्रे
Jay Jijau Jay Shivray.