पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारी महाराष्ट्रातील नितांत सुंदर ठिकाणे
पावसाळा म्हणजे सगळ्यांचाच आवडत ऋतू. उन्हाळ्यात ऊन बेचैन करते आणि हिवाळ्यात थंडी बोचते पण पावसाळा असा एकच ऋतू असतो ज्याचा कोणालाही काहीही त्रास होत नाही उलट तो हवाहवासा वाटतो. पावसाळा आला म्हणजे पावसाळी ट्रिप तर झालीच पाहिजे. पण बऱ्याच वेळा कामानिमित्त जास्त दिवस सुट्टी काढून कुठे मनसोक्त फिरण्याचा जास्त आनंद घेता येत नाही.
आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगणार आहे जिथे जाऊन तुमची पावसाळी ट्रिप एकदम ओली चिंब होऊन जाईल. चला तर मग जाणून घेऊया Best Places to Visit this Monsoon in Maharashtra
माळशेज घाट (Malshej Ghat)
मुंबईकडे जाताना वाटेत लागणारा माळशेज घाट पावसाळ्यात अतिशय नयनरम्य असा असतो. तुम्ही मुंबई, पुणे, नगर कुठेही राहत असला तरी हा पावसाळी पिकनिक स्पॉट तुम्हाला अगदी मध्यवर्ती ठिकाणावर आहे. घाटाच्या एका मोठी दरड आणि एका बाजूने खोल दरी, त्यातून धो धो पडणारे धबधबे, थंडगार वारा आणि आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा हे माळशेज घाटाचं वैशिष्ठय.
माळशेजला जाऊन तुम्ही एकाच दिवसात तुमची पावसाळी पिकनिक मस्त एन्जॉय करू शकता. माळशेज घाटात आपल्या पोटपूजेची पण उत्तम अशी सोय आहे. येथील प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारी मिसळ म्हणजे अफलातूनच. घाटात अनेक ठिकाणी लोक गरम गरम वडापाव विकायला बसलेले असतात. मग एवढ्या छान वातावरणात गरम वडापाव आणि चहाची मजा घेतलीच पाहिजे, नाही का ?
ठोसेघर धबधबा (Thoseghar Waterfall)
आकाशातून जोमाचा पाऊस आणि उंचावरून कोसळणारे धबधबे हि दृश्य जरी मनात आणली तरी कसं छान वाटतं. पण हा आनंद जर तुम्हाला फक्त मनात न ठेवता प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर ठोसेघर धबधबा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ठोसेघर धबधबा साताऱ्यापासून अगदी २०-३० किमीच्या अंतरावर आहे. या धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतल्यावर तुम्ही तिथल्या हॉटेलमध्ये चुलीवर बनवलेल्या मस्तं अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद नक्की घ्या.
भंडारदरा (Bhandardara)
भंडारदरा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध पिकनिक स्पॉट. आर्थूर लेक आणि विल्सन डॅम ही भंडारदऱ्यातील पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाणे. इथे दरवर्षी पावसाळ्यात भरणारा काजवा महोत्सव तर अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. त्यामुळे तुमच्या दोन दिवसांच्या छोट्याशा पावसाळी पिकनिकसाठी भंडारदरा हे ठिकाण अगदी सार्थ आहे.
रतनवाडी (Ratanwadi)
तुम्ही जर ट्रेकिंगचे शौकीन असाल तर पावसाळ्यात रतनगडचा ट्रेक जरूर करा. रतनवाडी हे गाव अहमदनगर पासून हाकेच्या अंतरावर असून रतनवाडीचा रतनगड किल्ला आणि अमृतेश्वर मंदिर विशेष बघण्यासारखे आहे. रतनगड ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे आणि पावसाळ्यात इथे बरीच गर्दी बघायला मिळते. रतनवाडी पासून ६ किमी तर भंडारदऱ्यापासून २३ किमी अंतरावर रतनगड किल्ला उभा आहे.
घाटघर (Ghatghar)
घाटघर हे सुद्धा अहमदनगर जिल्यात असून इथे दर वर्षी तब्बल ५००० मीमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. घाटघरला मोठा जलविद्युत केंद्र सुद्धा आहे. चहू बाजूनी असलेले मोठे मोठे डोंगर आणि पावसाळ्यात पसरलेली हिरवीगार शाल तुमचे मन प्रफुल्लित करते. त्यामुळे तुम्हाला जर पावसात ओलेचिंब भिजायचे असेल तर घाटघर तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे.
कळसुबाई (Kalsubai)
कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, त्याला ‘महाराष्ट्रातील एव्हरेस्ट’ असंही म्हणतात. जर तुम्हाला पावसाळ्यात ट्रेक करायची इच्छा असेल तर कळसुबाई मिस करू नका. हिरव्यागार दात झाडीतून ओलाचिंब होत कळसुबाई सर करण्याची मजा काही औरंच आहे.
चिखलदरा (Chikhaldara)
विदर्भातील चिखलदरा हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथले अनेक पॉईंट्स बघायला लोक गर्दी करतात. गार वारा आणि आकाशातून कोसळणारा पाऊस चिखलदऱ्यात अनुभवणे म्हणजे पर्वणीच. चिखलदऱ्याचे वर्णन महाभारतात देखील आहे. ह्याच ठिकाणी भीमाने किचक चा वाढ करून त्याला एका दरीत फेकून दिले होते. ह्या दरीला किचकदरा म्हणू ओळखले जाते.
भीमाशंकर (Bhimashankar)
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तसेच इथूनच भीमा नदीचा उगम होतो असे म्हणतात. सह्याद्रीच्या रांगेत असलेलं हे ठिकाण घनदाट जंगलाने वेढल्या गेलं आहे. पावसाळ्यात भेट दिली असता आजूबाजूचे विहंगम दृश्य बघून तुमचे मन अगदी प्रसन्न होते.
आंबोली घाट (Aamboli Ghat)
आंबोली घाट म्हणजे महाराष्ट्रातील लोकांसाठी चेरापुंजीच. दाट जंगल आणि मोठ मोठे धबधबे हे आंबोली घाटाची वैशिट्ये. हिरण्यकेशी नदीचा उगम आणि नांगरतास धबधबा बघण्यासाठी पावसाळ्यात लोक इथे गर्दी करतात. महाराष्ट्रात आंबोली घाट नावाचे ४ घाट आहे परंतु सिंधुदुर्गातील आंबोली घाट सर्वात जास्त प्रसिद्ध आणि सुंदर आहे.