नेताजींवर झाडलेल्या ३ गोळ्या त्यांनी आपल्या अंगावर घेतल्या आणि नेताजींचे प्राण वाचवले
![Netaji Subhash Chandra Bose driver, Col Nizamuddin](https://myinfobuzz.in/wp-content/uploads/2020/09/Webp.net-compress-image-3.jpg)
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असे अनेक क्रांतीकारक होऊन गेले ज्यांचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांच्या कार्याचे दाखले इतिहासाने दिलेलेच आहेत परंतु असे अनेक स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांनी स्वत: ला देशासाठी समर्पित केले पण आजतागायत त्यांची नावे आपल्यापर्यंत कधी पोहोचू शकली नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांहून अधिक वर्षे काळ उलटून गेला आणि काळासोबतच अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी धूसर झाल्या आहेत. त्यातीलच एका नायकांपैकी एक म्हणजे ‘कर्नल निजामुद्दीन’.
यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. ‘कर्नल निजामुद्दीन’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी होते, ज्यांनी बर्माच्या जंगलात नेताजींचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या अंगावर बंदुकीच्या तीन गोळ्या झेलल्या होत्या. तेव्हापासून नेताजींनी त्यांना ‘कर्नल’ या नावाने संबोधले. निजामुद्दीन यांचे खरे नाव सैफुद्दीन. त्यांचा जन्म १९०१ मध्ये धक्वान गावात (सध्या उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात आहे) येथे झाला. त्याची आई गृहिणी होती आणि त्यांच्यासोबत खेड्यात राहत असे, तर वडील रंगूनमध्ये कॅन्टीन चालवत असत.
वयाच्या २० व्या वर्षी सैफुद्दीन ब्रिटिश सैन्यात भरतीसाठी घरून पळून गेले. ब्रिटीश सैन्यात नोकरी करत असताना एक दिवस त्यांनी एका ब्रिटीश अधिकाऱ्याला गोऱ्या सैनिकांशी बोलताना ऐकले की, “भारतीय सैनिकांना वाचविण्यापेक्षा या शिदोरीने भरलेल्या गाढवांना वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे जे उर्वरित सैन्याला रसद पुरवतात.”
आपल्या सहकाऱ्यांबद्दल अशा निर्दयी आणि कटू टीका ऐकल्यावर सैफुद्दीन चिडले आणि त्यांनी त्या ब्रिटीश अधिकाऱ्याला गोळी झाडून ठार मारले. तेथून त्यांनी सिंगापूरला पळ काढला व आपले नाव बदलून निजामुद्दीन असे केले. सिंगापूरमध्येच सुभाषचंद्र बोस यांच्या उपस्थितीत त्यांनी आझाद हिंद सेनेमध्ये प्रवेश केला.
१९४३ मध्ये नेताजी बर्लिनहून सिंगापूरला आले होते व त्यांनी आझाद हिंद सेनेची धुरा सांभाळली होती आणि येथूनच त्यांच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा अध्याय सुरू झाला.
आझाद हिंद फौजमध्ये सामील झाल्यानंतर हळूहळू निजामुद्दीन सुभाषचंद्र बोस यांचे विश्वासू सहकारी बनले. ते नेताजींच्या १२ सिलेंडर कारचे ड्रायव्हर होते, जी कार त्यांना मलयच्या राजाने भेट दिली होती. सन १९४३ ते १९४४ पर्यंत, त्यांनी नेतांजींसोबत बर्माच्या जंगलात (सध्याचे म्यानमार) जंगलात ब्रिटिश सैन्याविरूद्ध युद्ध केले होते.
सन २०१६ मध्ये ‘द टेलीग्राफला’ दिलेल्या मुलाखतीत निजामुद्दीन म्हणाले, “आम्ही जंगलात होतो आणि अचानक मला झुडूपाच्या मध्यभागी एक बंदूक दिसली आणि मी ताबडतोब नेताजींच्या समोर उडी मारली. तीन गोळ्या लागल्यानंतर मी बेशुद्ध पडलो आणि जेव्हा मला पुन्हा शुद्ध आली तेव्हा नेताजी माझ्या शेजारी उभे होते. कॅप्टन लक्ष्मी सहगलने माझ्या शरीरातून गोळ्या काढल्या.” ही सन १९४३ ची घटना आहे.
त्यांच्या साहस आणि समर्पणामुळे प्रभावित होऊन नेताजींनी त्यांना ‘कर्नल’ ही पदवी दिली. मग पुढची चार वर्षे निजामुद्दीन यांनी नेताजींचे ड्रायव्हर व बॉडीगार्ड म्हणून काम केले. ते नेताजींच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांच्यासोबत होते, मग ते जपान, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, मलेशिया असो किंवा सिंगापूर. ते नेताजींच्या सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असत.
ऑगस्ट १९४५ मध्ये जपानच्या आत्मसमर्पणानंतर, नेताजींनी आझाद हिंद सेनेचे काम थांबवले. यानंतर निजामुद्दीन यांनी अज्बुन निशाशी लग्न केले आणि रंगून येथील बँकेत ड्रायव्हर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलाचा व मुलीचा जन्मदेखील रंगून येथेच झाला.
जून १९६९ मध्ये निजामुद्दीन आपल्या कुटुंबासमवेत भारतात परतले व मूळ गावी स्थायिक झाले. त्यांनी गावात आपल्या घराचे नावदेखील ‘हिंद भवन’ असे ठेवले आणि आजही त्यांच्या घराच्या छप्परावर तिरंगा फडकावलेला दिसतो. ते लोकांचे स्वागत देखील आझाद हिंद सेनेमध्ये नियमांप्रमाणेच ‘जय हिंद’ म्हणूनच करत असत. हसत-हसत ते लोकांना मस्करीमध्ये सांगत असत की ‘जुन्या सवयी लवकर सुटत नाहीत!’
निजामुद्दीन आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धक्वानमध्येच राहिले आणि त्यानंतर दिनांक ६ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मृत्यूच्या वेळी ते ११७ वर्षांचे होते. तथापि, विशेष बाब म्हणजे, स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिकाविषयी लोकांना २०१६ मध्ये कळले, जेव्हा त्यांनी व त्यांच्या १०७ वर्षीय पत्नीने बँकेत आपले खाते उघडले.
अशा इतिहासाच्या पानांमध्ये प्रकाशझोतात न आलेल्या या खऱ्या देशभक्ताच्या कार्याला आमचा सलाम!