चीनच्या बड्या नेत्याने जेवताना मांसाचा तुकडा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ताटात टाकला आणि…
शाकाहारी असणाऱ्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चीन दौऱ्यातले हे किस्से चांगलेच प्रसिद्ध आहेत.
भारतीय संस्कृतीत माता-पित्यांप्रमाणे गुरुलाही एक विशिष्ट आणि अढळ असं मानाचं स्थान आहे. ( dr sarvepalli radhakrishnan information in marathi ) “अज्ञानाचा अंधकार दूर करणारा म्हणजे गुरू”….ज्याचं महत्व खरंच वादातीत आहे. अशा प्रत्येक गुरूचा, शिक्षकाचा सन्मान म्हणून भारतात ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ साजरा केल्या जातो. विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय राहिलेल्या या शिक्षकाचा – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस – ५ सप्टेंबर !
हा दिवस जर शिक्षक दिन म्हणून मान्यता पावला तर मी माझा वाढदिवस साजरा झाला असं मी समजेन – असा खुद्द राधाकृष्णन यांचा आग्रह सरकारला मोडवला नाही व १९०९ ते १९४८ असे जवळपास चाळीस वर्ष शिक्षक म्हणून राहिलेल्या या तत्वज्ञाचा वाढदिवस, तमाम शिक्षकांसाठीचा सन्मान म्हणून ५ सप्टेंबर हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा होण्याची पद्धत रूढ झाली.
चीन दौऱ्यातील प्रसिद्ध किस्सा
एक तत्वज्ञ ,एक शिक्षक म्हणून असलेल्या या माणसाने राष्ट्रपतीपद व उपराष्ट्रपतीपदही भूषविलेलं आहे. (dr sarvepalli radhakrishnan information in marathi) १९५७ मध्ये एकदा ते चीनच्या दौऱ्यावर होते. त्यावेळचे नेते होते ‘माओ’, त्यांनी राधाकृष्णन यांना स्वतःच्या घरी म्हणजे चुग नान हाई येथे भेटीस बोलावलं. भारतात एखाद्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्या पाठीवर किंवा खांद्यावर प्रेमाने थोपटल्या जातं.
पाश्चिमात्य देशात तर एखाद्या सख्ख्या आईने देखील आपल्या सख्ख्या मुलाला प्रेमाने गालगुच्चा घेतला आणि त्याला ते आवडलं नाही तर तो पोलिसांत तक्रार करू शकतो- असं ऐकिवात आहे ! त्या आपल्या सख्ख्या मुलाच्या अंगाला त्याच्या मर्जीविरुद्ध स्पर्श केल्याचा त्या सख्ख्या आईवर गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणे ! आपल्या भारतीयांसाठी ही गोष्ट हास्यास्पद असली तरी पाश्चिमात्य लोक याला फार गंभीरतेने घेतात…
राधाकृष्णन यांनी तर माओ यांच्या चक्क गालावरच प्रेमानं थोपटलं ! त्यावर माओ यांची नापसंतीची प्रतिक्रिया येऊ शकते हे राधाकृष्णन यांच्या त्वरित लक्षात आलं असावं….. त्यामुळे ते लगोलग म्हणाले,
“महोदय, नाराज होऊ नका……..हे असं मी स्टॅलिन व पोपला सुद्धा केलं आहे !” अर्थात त्यानंतर माओ काही बोलूच शकले नाहीत.
प्रत्येकाची प्रेम दर्शविण्यासाठीची पद्धत असते. भोजन घेत असताना, माओ यांनी हास्यविनोदात राधाकृष्णन यांच्या प्लेटमध्ये आपल्या प्लेटमधील नॉनवेजचा एक तुकडा टाकला. हे त्यांचं आपल्याविषयीचं प्रेम आहे हे उमजल्यामुळे डॉ. राधाकृष्णनही काहीच बोलले नाहीत. हास्यविनोद तसेच फुलत गेले. जेवण तसंच रंगत गेलं. पूर्णपणे शाकाहारी असलेल्या राधाकृष्णन यांनी आपल्या प्लेटमध्ये नॉनव्हेजचा तुकडा बघूनही त्यावर चकार शब्द न बोलणं हे त्यांचं मोठेपण दर्शवतं !
चीनला जाण्याआधी ते कंबोडियाच्या दौऱ्यावर होते. कारमध्ये बसतेवेळी त्यांच्या सहयोगीच्या चुकीमुळे त्यांच्या बोटाचा अंगठा कारच्या दारामध्ये अडकला आणि अंगठ्याचं हाड तुटलं. चीनच्या दौऱ्याची लगबग म्हणून याकडे विशेष लक्ष न देता ते चीनला गेले. मात्र माओ यांनी त्यांच्या या दुखऱ्या अंगठ्यावर त्वरित औषधोपचार करवले !
तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन
शिक्षक व थोर तत्वज्ञ असलेल्या या माणसाने ४० च्या वर पुस्तके लिहिली आहेत. ऑक्सफर्डने त्यांच्या तत्त्वज्ञानातील कार्यासाठी ‘नाईटहूड’ हा पुरस्कार दिला. असा पुरस्कार पटकवणारे ते पहिले आशियाई ठरले. तसंच त्यांच्या नावाने ऑक्सफोर्डमध्ये ‘राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट’ हा पुरस्कारही देण्यात येतो. इंग्लंडने “सर” ही पदवी त्यांना बहाल केली. ‘साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी’ त्यांना १६ वेळा तर ‘शांतीच्या नोबेल पुरस्कारासाठी’ ११ वेळा नामांकन मिळालं होतं.
भारतीय तत्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत सांगण्यासाठी ते आग्रही होते. मजेची गोष्ट अशी की “तत्वज्ञान” हा विषय त्यांनी अनिच्छेने निवडला होता. त्यांना हव्या असलेल्या विषयाची पुस्तकं महाग असल्याने त्यांनी ‘तत्वज्ञान’ घेतलं. तत्वज्ञान हा विषय घेऊन पदवीधर झालेल्या आपल्या एका नातेवाईकाकडून पुस्तकं घेऊन त्यांनी अभ्यास सुरू केला आणि २०व्या वर्षी लिहिलेला त्यांचा वेदांत तत्वज्ञानावरील प्रबंध हा सर्वोत्तम म्हणून घोषित
झाला !
निरुपाय म्हणून “तत्वज्ञान” विषयाला सोबत घेतलं. परंतु याच विषयाने त्यांना जगभर “तत्वज्ञ” म्हणून ओळख मिळवून दिली..
या जगात प्रत्येकाबद्दलच काही चांगलं तर काही वाईट बोललं जातं. डॉ. राधाकृष्णनबद्दलचा एक वाद त्या काळी बराच रंगला होता. आपल्या एका विद्यार्थ्याने लिहिलेलं थिसीस राधाकृष्णन यांनी आपल्या नावाने करवून त्यासाठी वाहवा मिळवली – असा एक आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. परंतु आपला व त्या विद्यार्थ्याच्या थिसिसचा विषय एकच असल्याने दोघांच्याही थिसिस सारख्याच असू शकतात हा मुद्दा डॉ. राधाकृष्णन यांनी मांडला. अर्थात या वादावर नंतर पडदा पडला…
आपल्या विषयाचे गाढे अभ्यासक, एक लोकप्रिय शिक्षक, तत्वज्ञ, उत्तम वाकपटु राहिलेल्या डॉ. राधाकृष्णन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !