महाभारतातील पाच भयानक शाप
महाभारतात अनेक शापांविषयीचं वर्णन आहे आणि त्या प्रत्येक शापामागे काही कारणं आहेत. काही शापांमागे जगाचे हित दडलेले होते तर काही शापांमागे त्याविषयीच्या काही कथा, कारणं होती. आज आपण महाभारतातील पाच भयानक शाप विषयी माहिती करून घेणार आहोत ज्याचे इतिहासात महत्वाचे योगदान होते, पण त्याचा प्रभाव आज वर्तमानकाळतही जाणवतो.
महाभारतातील भयानक शाप 1 – युधिष्ठिराने सर्व स्त्री जातीला दिलेला शाप
महाभारतात सांगितल्याप्रमाणे जेव्हा महाभारताचे भीषण युद्ध संपले, तेव्हा माता कुंतीने पांडवांना जाऊन ‘कर्णाच्या जन्माचे रहस्य’ सांगुन तो तुमचा मोठा भाऊ होता असं सांगितलं. तेव्हा हि गोष्ट ऐकुन पांडवांना मनोमन दुःख झाले, त्यावेळेस युधिष्ठिराने कर्णाचा विधीवत अंतिमसंस्कार केला आणि त्यानंतर अतिशय उदास मनाने तो माता कुंतीजवळ गेला आणि त्याने समस्त स्त्री जातील असा शाप दिला कि, जगातील कोणतीच स्त्री महत्वाची गोष्ट कधीच गोपनीय ठेवू शकणार नाही.
महाभारतातील भयानक शाप 2 – शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला शाप
दुसरा शाप आहे शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला. जेव्हा पांडव आपल्या शेवटच्या स्वर्गारोहण यात्रेला निघाले तेव्हा त्यांनी आपल्या सर्व राज्याची धुरा अभिमन्यूचा पुत्र परीक्षित यांच्याकडे दिली. राजा परीक्षितच्या अधिपत्याखाली सर्व प्रजा सुखाने नांदत होती. एके दिवशी परीक्षित राजा जंगलात गेला असताना त्याला तिथे शमिक नावाचे ऋषी दिसले जे त्यांच्या तपश्चर्येत मग्न होते आणि मौन व्रतात होते.
त्यांच्याशी अनेकवेळा बोलण्याचा प्रयत्न करून देखील त्यांनी त्यांचे मौनव्रत सोडलं नाही, तेव्हा परीक्षित राजाने रागाने त्यांच्या गळ्यात एक मेलेला साप टाकला. जेव्हा ही गोष्ट शमिक यांचे पुत्र शृंगी यांना कळाली तेव्हा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी राजा परीक्षितला शाप दिला कि सात दिवसांत ‘तक्षक’ नागाच्या दंशाने त्याचा मृत्यू होईल. परीक्षित जिवंत असेपर्यंत कलियुगात एवढे साहस नव्हते कि तो हावी होऊ शकेल, परंतु परीक्षित राजाच्या मृत्यूनंतर कालियुगाने पृथ्वीवर पसरायला सुरुवात केली.
महाभारतातील भयानक शाप 3 – भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेला शाप
तिसरा शाप आहे जो भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिला. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर चिडलेल्या अश्वत्थामाने झोपलेल्या पांडवपुत्रांना मारून टाकलं. पळून जाणाऱ्या अश्वत्थामाचा श्रीकृष्ण पांडवांसोबत पाठलाग करू लागले. महर्षी वेद व्यासांच्या आश्रमामागे लपुन बसलेल्या अश्वत्थामाने पांडवांवर ब्रम्हास्त्र सोडले, ते पाहून लगेचच अर्जुनाने देखील ब्रम्हास्त्र सोडले.
महर्षी व्यासांनी दोन्ही ब्रम्हास्त्र एकमेकांना धडकण्यापासून थांबवलं आणि दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घेण्यास सांगितलं. अर्जुनाने त्याचे ब्रम्हास्त्र परत घेतले, परंतु अश्वत्थामाला ते अस्त्र परत घ्यायची विद्या ठाऊक नव्हती. त्याने अस्त्राची दिशा बदलून ते अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर सोडले.
अश्वत्थामाचे हे अतिशय नीच कर्म पाहुन भगवान श्रीकृष्ण अतिशय क्रोधीत झाले आणि त्यांनी त्याच्या मस्तकावरचा मांसल मणी काढून घेतला आणि त्याला भयंकर शाप दिला कि, ‘त्याची डोक्याची जखम तशीच भळभळत राहून तो पृथ्वीच्या अंतापर्यंत तसाच भटकत राहील, पृथ्वीतलावर कोणाशीही तो बोलू शकणार नाही, त्याच्या शरीरातून रक्त आणि पस याचा एवढा दुर्गंध येईल की तो मनुष्यवस्तीत राहू शकणार नाही, दुर्गम जंगलातच पडून राहील.’
महाभारतातील भयानक शाप 4 – मांडव्य ऋषींनी यमराजाला दिलेला शाप
चौथा शाप आहे जो मांडव्य ऋषींनी यमराजाला दिला. एकदा एका राजाने न्यायदानात चुक केली व त्यांना सुळीवर चढवण्याचे आदेश दिले, परंतु खूप वेळ सुळीवर चढवून देखील त्यांचे प्राण गेले नाहीत, तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली व त्याने ऋषींना सुळीवरून खाली उतरवून आपल्या चुकीची क्षमा मागितली. त्यानंतर मांडव्य ऋषी यमराजकडे गेले आणि त्यांनी यमाला विचारलं की मला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली.
त्यावर यमराजाने सांगितले की ते जेव्हा ते बारा वर्षांचे होते तेव्हा त्यांनी एक छोट्याश्या किड्याच्या शेपटीमध्ये सुई घुसवली होती याच कारणामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली,त्यावर मांडव्य ऋषी म्हणाले बारा वर्षाच्या वयात कोणालाच धर्म-अधर्म या गोष्टींची जाण नसते पण तू खूप लहान गोष्टीसाठी मला शिक्षा दिलीस म्हणून मी तुला शाप देतो की तुला शूद्र योनीत दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि म्हणूनच महाभारतात यमराजाला ‘विदुराच्या’ रूपात जन्म घ्यावा लागला.
महाभारतातील भयानक शाप 5 – उर्वशीने अर्जुनाला दिलेला शाप
जेंव्हा अर्जुन दिव्य अस्त्राच्या प्राप्तीसाठी स्वर्गलोकी गेला होता तेव्हा उर्वशी नावाची अप्सरा अर्जुनाकडे आकर्षित झाली होती. ही गोष्ट जेव्हा तिने अर्जुनाला सांगितली तेव्हा अर्जुनाने नम्रपणे तिला सांगितले की ती त्याच्या मातेसमान आहे. हे ऐकून उर्वशी अतिशय क्रोधीत झाली आणि अर्जुनाला म्हणाली, नपुंसक माणसारख्या अर्जुना मी तुला शाप देते की तू खरंच नपुंसक होऊन स्त्रियांमध्ये नर्तक बनून राहशील.
ही गोष्ट जेव्हा अर्जुनाने देवलोकांचा राजा इंद्र याला सांगितली, तेव्हा राजा इंद्राने त्याला दिलासा देत सांगितलं की हाच शाप तुझ्यासाठी एक वर्षाच्या अज्ञातवासात वरदान ठरेल. अज्ञातवासात असताना नर्तिकेच्या वेशामुळे कौरवांपासून तू सुरक्षित राहशील.