८१ वर्षांपासून भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या बिस्किटाची कहाणी
Parle G केवळ एक बिस्कीट राहिलेले नसून ते भारतीयांच्या लाईफस्टाइलचा जणू एक भाग झालंय
आज आपण तुमच्या आमच्या सर्वांच्याच आवडीचा व एकंदरीत जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मंडळी दिवस म्हटलं की धुंद सकाळ आली आणि भारतीयांची सकाळ ही चहाच्या कपाविना सुनीच म्हणावी लागेल. कारण इथल्या प्रत्येक माणसाला चहाचं जणू व्यसनच आहे.
चहाचा एक घोट घेतला की कामगाराला काम करण्यासाठी नवी रग येते….चहाचा एक घोट घेतला की अभ्यासासाठी रात्र सरून जाते…..चहाचा एक घोट घेतला की कित्येक आठवणी ताज्या होतात…..पण या चहा सोबत त्याच्या जोडीदारांना कसं विसरून चालेलं बरं..? हो जोडीदारच..म्हणजे बिस्किट हो..! आणि भारतातील एका कंपनीने त्या बाबतीत भारतीय माणसावर फार मोठ्ठे उपकार केलेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.
भारतात दोन बिस्किटं खूप चालतात एक Marie आणि दूसरं Parle-G……एक कपात जात नाही आणि दूसरं गेलं तर बाहेर येत नाही.
पण ह्या बिस्किटांवर जणतेनं आमाप प्रेम केलेलं आपल्याला पहायला मिळतं. विशेष म्हणजे मारी पण पार्ले ह्या कंपनीचंच दुसरं बिस्कीट. पार्ले जीच्या पाकिटावर चार बोट दाखवणारी ती गोड मुलगी आणि त्याहून सुंदर चव असलेले बिस्किट अशा आपल्या पार्ले-जी चा इतिहास तरी काय आहे..? ह्या ब्रॅन्ड ची सुरूवात झाली तरी कुठे..? याचा नांवावरून तुम्हाला वाटेल की हा विदेशी माल आहे पण माफ करा हा अस्सल भारतीय ब्रॅन्ड आहे आणि आपल्याच भारतीय माणसाने बनवलेला. चला तर मग पाहूया पार्लेजीची कहानी….
‘पार्ले’ कंपनीचा इतिहास (History of Parle Company)
पार्ले ची सुरूवात फार पूर्वी म्हणजे ब्रिटिश काळात झाली. इंग्रज भारतात आले ते एकटे नाही तर सोबत आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी सुध्दा घेऊन आले. इंग्रजांनी आपल्या सोबत कँन्डी आणली होती आणि हि कॅन्डी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विकली सुध्दा जात होती पण ही कॅन्डी खूप महागडी असल्यामुळे फक्त श्रीमंताची बनून राहिली. सर्व सामान्य माणूस ती विकत घेताना दहा वेळा विचार करत असे. पण भारतीय व्यापार जगतात भारतीय बनावटीच्या कॅन्डीची आवश्यकता होती.
हीच गरज ओळखुन आणि स्वदेशी चळवळीने प्रेरित होऊन त्या काळचे रेशिम व्यापारी मोहनलाल दयाल चौहान (Mohanlal Dayal Chauhan) यांनी भारतीय कॅन्डी तयार करण्याचा प्लॅन केला. त्याकरिता ते जर्मनीला गेले आणि कॅन्डी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी जाणून घेतली. एवढेच नव्हे तर त्याकाळी तब्बल 60 हजार रूपये किंमतीचे कॅन्डी तयार करण्याचे यंत्र त्यांनी विकत घेतले व आपल्या नवीन व्यवसायाचा पाया रचला.
त्यांनी मुंबईच्या विले-पार्ले परिसरात आपला पहिला कारखाना सुरु केला. 1929 मध्ये सुरू झालेल्या या कंपनी मध्ये सुरूवातीला फक्त 12 कर्मचारी काम करत होते. सर्व कर्मचारी व मालक आपला हा नविन व्यवसाय उभा करण्यात इतके रमले होते कि त्यांना कंपनीचे नाव ठेवायला सुध्दा वेळ मिळाला नाही.
नंतर मग या नविन सुरू झालेल्या कंपनीचे नाव तिच्या ठिकाणावरून म्हणजे मुंबईच्या Vile Parle परिसरात सुरू झाली म्हणुन पार्ले असं ठेवण्यात आले. या कंपनीचं सुरुवातीचं प्रॉडक्ट म्हणजे ऑरेंज कॅन्डी.. आपल्या पहिल्याच प्रयत्नात या कॅन्डीला मोठ्ठा प्रतीसाद मिळाला. त्यानंतर पार्ले ने अनेक कॅन्डींच उत्पादन सुरु केलं. पण त्याकाळी इंग्रजांची अजून एक सवय भारतीय लोकांना आवडायची, इंग्रज आपल्या दिवसाची सुरूवात चहा सोबत बिस्किट खाऊन करत असत. पण त्याकाळी हि विदेशी बिस्किट महाग असल्यामुळे ही सुध्दा श्रीमंतांचीच सवय बनून राहिली होती. पण Parle ने हे चित्र सुध्दा बदलायचं ठरवलं आणि त्यांनी भारतीय बिस्किटांच उत्पादन करायला सुरूवात केली.
पहिलं भारतीय बिस्कीट Parle Gluco
भारतीय बाजारात पहिल्यांदाच झालेल्या या प्रयोगाच्या पहिल्या उत्पादनाच नाव होतं “पार्ले ग्लुको” (Parle Gluco). अश्या रीतीने 1939 साली भारतात सर्वाधिक विक्री करणारे बिस्किट तयार झाले. पार्लेच्या या पहिल्याच प्रयोगाला ग्राहकांचा अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाला. हे उत्पादन सर्वसाधारण माणसाच्या खिशाला परवडणारं व चविष्ट होतं त्यामुळे या उत्पादनाने भारताच्या ग्राहकावर जणू मोहिनीच केली. या बिस्किटाने त्या काळच्या ब्रिटिश कंपन्यांना अगदी सहजपणे मागे टाकलं.
Parle Gluco त्या काळात इतकं लोकप्रिय झालं कि कित्येक इंग्रज अधिकारी सुध्दा याचे दिवाने होते असं सांगण्यात येते.
Parle Gluco बिस्किटाचे उत्पादन बंद करावे लागेल
या बिस्किटाने दुसऱ्या महायुध्दापर्यंत लोकप्रियतेचा कळस गाठला होता. परंतु दूसरं महायुध्द सुरू झालं आणि पार्ले ला या बिस्किटांच उत्पादन थांबवाव लागलं. यामागचं कारण होतं त्याकाळी भारतात उद्भवलेला गव्हाचा तुटवडा आणि कमी झालेलं गव्हाचं उत्पादन. त्यामुळे पार्ले ला कच्च्यामालाच्या आभावी बिस्किटाचे उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागले. 1947 ला भारत स्वातंत्र होऊन भारताची फाळणी झाली परिणामी कच्च्या मालाची कमी अधिकच भासू लागली. भारतीय लोकांना पार्ले ग्लुको बिस्किटांची कमी सतावत होती, त्यामुळे कंपनीने परिस्थिती स्थिर झाल्यानंतर लगेचचं उत्पादन पूर्ववत होईल असं आश्वासन दिलं.
Parle Gluco चं Parle G कसं झालं ?
तुम्हाला प्रश्न पडला असेलच कि ह्या पार्ले ग्लुको नाव असलेलं बिस्कीट पुढे जाऊन पार्ले जी कसं का झालं. पार्लेने आपल्या ह्या बिस्किटाचे नाव 1982 साली बदललं. खरतर कंपनीला हे नाव बदलायचं नव्हतं पण पार्ले कंपनीकडे ‘ग्लुको’ या शब्दाचं पेटंट नव्हतं त्यामुळे भारतातील अनेक बिस्किट कंपन्या या नावाचा उपयोग आपल्या उत्पादनात वापरत होत्या आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम पार्लेच्या विक्रीवर होत होता. शेवटी कंपनीने 1982 ला पार्ले ग्लुकोचं नाव बदलून पार्ले-जी (Parle G) ठेवलं.
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन होता, अश्या कठीण काळात हेच Parle G बिस्कीट अनेकांचा सहारा होतं. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार पार्लेजी बिस्किटाची गेल्या ८० वर्षात झाली नाही तेवढी विक्री ह्या लॉकडाऊनच्या काळात झाली आहे. या भारतीय बिस्किटाने शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या प्रवाशांची भूक भागवली आहे.
त्यामुळे सकाळच्या चहा सोबत Parle G खाताना हि कहानी विसरू नका..!