जेव्हा एका RAW गुप्तहेराने अमेरिकेच्या CIA ला खुळ्यात काढलं.
मिशन फेल झाल्यावर चिंतन शिबिरात CIA ला लक्षात आलं RAW गुप्तहेराने त्यांना खुळ्यात काढलं
जासुस किंवा गुप्तहेर संघटना बोललं की सगळ्यात आधी आपल्या लक्षात येते ती इस्रायलची मोसाद आणि त्या पाठोपाठ अमेरिकेची CIA. जगभरातील विविध माध्यमांवर या दोन गुप्तहेर संघटनांचा कायमच बोलबाला दिसतो, एवढंच नाही तर अनेक भारतीय सुद्धा यांची मिशन मोठ्या फुशारक्या मारत एकमेकांना सांगत असतात. मग भारताची RAW या सगळ्यात कुठे आहे ?
आपली गुप्तहेर संघटना काहीच करत नाही का ? तर याचं साधं उत्तर आहे या दोन संस्थाबद्दल अनेक लोकांनी महिती लिहून ठेवली आहे तर त्या मानाने भारताच्या RAW बद्दल आणि त्याच्या मिशन बद्दल फारशी माहिती बाहेर आणली गेली नाही त्यामुळे छाती फुगवून सांगायला आपल्याकडे फारश्या गोष्टी नाहीत. पण आता यात बदल होत आहे, RAW ची अंगावर शहारे आणणारी अनेक मिशन आता समोर येत आहेत. आजच्या लेखात त्यापैकीच एक..
1968 च्या आसपास घडलेली ही कथा, भारताच्या RAW चा नुकताच जन्म झाला होता त्यामुळे CIA त्यांना बाळंच समजत होते. पण RAW च्या एका गुप्तहेराने खुद्द अमेरिकेच्या संपुर्ण CIA ला खुळ्यात काढलं तेव्हा त्यांना 440 चा करंट लागला असेल यात वादच नाही. स्टोरीचे नायक आहेत फणी बॅनर्जी उर्फ नाथबाबु. अगदी कसलेले गुप्तचर आणि मितभाषी. फणी बॅनर्जी उर्फ नाथबाबु (The great PN Banerjee) यांनी 1968 मध्ये लंडनला इंदिरा गांधी यांचे दूत म्हणून शेख मुजीब यांची भेट घेतली आणि या खेळाला सुरवात झाली.
बांगलादेश मुक्ती युद्धाचा काळ, त्यावेळचा पूर्व पाकिस्तान तो. खोंडकर मुश्ताक अहमद हे त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानमधील मोठे नेते पण पहिल्यापासून भारतविरोधी. आधी परराष्ट्रमंत्री आणि व्यापारमंत्री म्हणून काम करणारे हे मुश्ताक नंतर मुजीब यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष सुद्धा झाले. बरं, हे खोंडकर मुश्ताक म्हणजे CIA च्या हातातले बाहुले आहे हे फणी बॅनर्जी उर्फ नाथबाबु यांना समजले आणि त्यांनी त्याचा फायदा घेण्याचं ठरवलं. सगळ्या उच्च दर्जाच्या परवानगीनंतर फणी बॅनर्जी यांनी मुश्ताक सोबत आपली जवळीक वाढवायला सुरवात केली. त्यांच्या सोबत विविध मुद्दयावर चर्चा करू लागले, आणि हळू हळू आपण भारतविरोधी असल्याचं भासवू लागले या खेळात ते यशस्वी झाले आणि मुश्ताक त्यांना भारतविरोधी मानू लागले. आणि भारताचा एक उच्च अधिकारी त्यांच्या जाळ्यात अडकला आहे अस ते अमेरिकेला सांगू लागले.
इंदिरा गांधींच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली भारत काहीही करू शकतो याची जाणीव अमेरिकेला होती त्यामुळे भारताचे प्लॅन समजणे खुपचं महत्वाचं होत. मुश्ताकने दिलेल्या या बातमीने पाकिस्तान आणि अमेरिकेच्या गोटात आनंदी आनंद वातावरण होते. फणी बॅनर्जी मोठ्या विश्वासाने भारताच्या योजना खोंडकर मुश्ताकला सांगू लागले आणि मुश्ताक CIA ला. भारताचा सगळा प्लॅन आपल्याला समजत आहे या खुशीत अमेरिका आणि पाकिस्तान त्यांचे प्लॅन बनवत होते.
भारताचे सैन्य आता पूर्व पाकिस्तानमध्ये घुसले होते, मुख्य पाकिस्तान अक्षरशः हादरून गेला होता. अमेरिकेच्या साहाय्याने पाकिस्तान आपल्या पूर्व भागाला वाचवण्यासाठी आटापिटा करत होता तेव्हा फणी बॅनर्जी यांनी त्यांना टॉप सिक्रेट सांगितले ते म्हणजे
“पूर्व पाकिस्तानमध्ये भारताचे सैन्य आले आहे ते केवळ तेथील नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी, पूर्व पाकला स्वतंत्र करण्याचा भारताचा कोणताही हेतू नाही”
वाढलेली जवळीक आणि विश्वास यामुळे मुश्ताक यांनी ही बातमी अमेरिकेला पोच केली आणि प्लॅनमध्ये बदल झाला. इकडे भारतानं पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करायचा या इराद्याने मोठी तयारी केली होती, मुजीब संघटनेला प्रशिक्षण देण्यात येत होते आणि तयार झालेल्या तुकड्या जागो जागी तैनात करण्यात येत होत्या. फणी बॅनर्जी यांच्या माहितीमुळे CIA गाफील राहिली आणि पाकला कोणतीही मदत केली नाही. अन भारताने जोरदार हातोडा हाणत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. ही सगळी माहिती अमेरिकेला कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि बांगलादेश स्वतंत्र झाल्याचा जल्लोष चालुही झाला.
पुढे भारताबाबत आपले अंदाज एवढे कसं काय चुकले म्हणून अमेरिकेने आपले एक चिंतन शिबिर केले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले फणी बॅनर्जी उर्फ नाथबाबु हा भारताचा उच्च अधिकारी नव्हे तर मुरलेला गुप्तहेर होता आणि या बंगालीबाबूने त्यांना चांगलच खुळ्यात काढलं आहे.