शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कुणी लावला, टिळकांनी कि फुलेंनी ?
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली ह्या विषयावर नेहमीच वाद घातला जातो. काही लोक समाधी टिळकांनी शोधली असं म्हणतात तर काही लोक फुलेंचं नाव घेतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि महाराजांची समाधी नेमकी कुणी शोधली…
रायगड या दुर्गाला इतिहासात फार महत्त्वाचे स्थान आहे. रायगडावर शिवरायांची समाधी आहे आणि आपण दर वर्षी रायगडावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. आज समाजात फार चर्चा होते की ही समाधी नक्की शोधली कुणी ? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक की महात्मा जोतीराव फुले ? आज आपण याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत.
इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगड पूर्णपणे उध्वस्त केला. या अग्नितांडवात शिवरायांच्या रायगडावरील समाधीची देखील नासधूस झाली. या नंतर बराच काळ उलटला परंतु, रायगडावर फारसे कोणी फिरकत नव्हते. बरं, सर्वप्रथम टिळक किंवा फुले यांच्यापैकी कोणीही समाधी तयार केली नाही, ती पूर्वापार रायगडावरच होती.
परंतु, या समाधीची भग्नावस्था दूर करून तिचा जीर्णोद्धार करून जनसामान्यांत समाधी विषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम मात्र संपूर्णपणे या दोघांनीच केले यात दुमत नाही. शिवसमाधीचे पुनर्निर्माण याच्या आनंदापेक्षा; कोण होते याचे जनक, आमचे फुले की तुमचे टिळक ? याच वादात लोकांना वाद घालण्यात जास्त रस आहे. असो, वाद घालायचा नसला तरी इतिहास जाणून घेणे मात्र महत्त्वाचं आहे. तर, आपण फुलेंनी कसे आणि काय परिश्रम घेतले व टिळकांनी काय केले याबद्दल सविस्तर पाहूया.
महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule)
शिवरायांच्या समाधीबाबत (Shivaji Maharaj Samadhi) महात्मा फुलेंचे कार्य सांगणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. महात्मा फुलेंनी मराठी भाषेत सर्वप्रथम शिवरायांचे जीवन पोवाड्यातून मांडले. ‘छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा’ महात्मा फुलेंनी १८६९ साली मुंबईच्या ओरिएंटल छापखान्यात प्रकाशित केला. याची तेव्हाची किंमत सहा आणे इतकी होती. (स्त्रोत: महात्मा फुले समग्र वाङ्मय, संपादक: श्री. धनंजय कीर आणि डॉ. स. गं. मालशे).

सुमारे १८७० मध्ये महात्मा फुलेंनी सामान्य स्तरावर शिवजयंती साजरी केली (याची नोंद फारश्या ऐतिहासिक साधनांत मिळत नाही). खऱ्या अर्थाने १८८० मध्ये रायगडावर आणि पुण्यात Mahatma Jyotiba Phule यांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.
महात्मा फुलेंच्या या कार्याबद्दल अधिक माहिती अशी की, आपण रायगडावर जावे ही त्यांची फार जुनी इच्छा होती. अखेर, ते रायगडावर गेले आणि त्यांनी शिवरायांची अतिशय दयनीय अवस्थेत असलेली समाधी पाहिली. ज्या शिवरायांनी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला एकत्र आणले आणि आपल्या रयतेसाठी अतोनात परिश्रम केले, ज्या माणसामुळे आज आपले जगणे आहे त्याच्याच समाधीची ही दुरावस्था असणे अतिशय शरमेची बाब होती.
लगेचच दीनबंधु या वृत्तपत्रातून फुलेंनी, शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी अत्यंत मोडकळीस आलेली आहे, तिच्यावर गवत व झाडे-झुडपे वाढली आहेत असा मजकूर छापला. अखेर, हिराबागेतील मोठ्या पटांगणात चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील नागरिकांची एक सभा आयोजित केली. या सभेत स्वतः फुले, नारायण मेघाजी लोखंडे, भालेकर यांची भाषणे झाली. सभेच्या अखेरीस, ‘शिवसमाधी जिर्णोद्धारक कमिटी’ फुलेंच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झाली. परंतु, पुढे पैश्यांच्या आणि वेळेच्या अभावी या योजनेकडे दुर्लक्ष झाले आणि हे काम अर्धवट राहिले. (संदर्भ: ज्योतिबा फुले यांचे चरित्र, पंढरीनाथ पाटील).
प्राध्यापक, हरि नरके यांच्यानुसार, काही साधने असेही नमूद करतात की, हिराबागेतील या सभेत लोकवर्गणीतून तब्बल २७ रुपये त्या काळी जमा झाले आणि मग पहिली शिवजयंती साजरी झाली. परंतु, नंतरच्या काळात मात्र पैश्यांच्या अभावी हे कार्य अपूर्ण राहिले.
प्राध्यापक, हरि नरके असे देखील नमूद करतात की, १८८२ साली, टिळक-आगरकर यांना शिवरायांच्या वंशजांबद्दल त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल डोंगरीच्या तुरुंगात जावे लागले होते. या प्रसंगी, Jyotiba Phule यांनी स्वतः सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ उरवणे यांना १० रुपये देऊन टिळक-आगरकर यांच्या जामिनासाठी पाठविले आणि स्वतः सत्यशोधक समाजाने ते सुटून आल्यावर त्यांची मिरवणूक सुद्धा काढली. या घटनेबद्दल स्वतः लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रात नमूद केले होते. त्यांनी केसरी मध्ये सत्यशोधक समाजाने त्यांना दिलेले मानपत्र देखील छापून आणले होते. (केसरी, ३ ऑक्टोबर १८८२).
पोलिस खात्याचे अहवाल, जुनी कागदपत्रे, सत्यशोधक समाजाचे दस्तावेज अशी विविध साधने आपल्याला हे स्पष्ट करतात की, देशात रायगडावर शिवरायांची समाधी शोधणे, सुशोभित करणे आणि शिवजयंती साजरी करणे अशी कामे महात्मा फुलेंनी केली, असे प्रा. हरि नरके सांगतात.
लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak)
दूसरा युक्तिवाद असा आहे की, शिवरायांची समाधी ही लोकमान्य टिळक यांनी शोधली. परंतु टिळकांबद्दल मिळणारे पुरावे जो काळ दर्शवितात तो फुलेंच्या नंतरचा आहे. टिळकांबद्दल इतिहासात काय उल्लेख आहेत हे पाहूया.

१८९५ साली लोकमान्य टिळक यांनी शिवरायांच्या समाधीचा प्रश्न हाती घेतला. टिळकांनी स्वतः केसरी वृत्तपत्रात याबद्दल छापून आणले. या लेखांमुळे समाधीच्या कामासाठी वर्गणी जमविण्यास अधिक सहाय्य झाले. फुलेंप्रमाणे टिळकांनी देखील अनेक सभा भरविल्या आणि समाधीच्या डागडुजीसाठी वर्गणी देण्याचे आवाहन यातून करण्यात आले आणि त्याच्यासाठी कमिटी देखील स्थापन केली.
शिवरायांचा पुतळा, समाधीवर लागणारी छत्री, रायगडावर उत्सव साजरा करायचा असल्यास कराव्या लागणार्या सोयी इत्यादी अनेक खर्च मांडले गेले. टिळकांसोबतच प्रो. भानू, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, पंडित मालविय अशा अनेकांचा या कार्यात हातभार होता. २५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर उत्सव करण्याचे टिळकांनी ठरविले आणि ठरल्याप्रमाणे रायगडावर उत्सव झाला देखील.
आत्तापर्यंत सुमारे रु. १६००० इतकी रक्कम शिवसमाधी साठी जमली होती तरी, अजून बरीच रक्कम गरजेची होती. १८९७ मध्ये Lokmanya Tilak यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरविला गेला आणि इथूनच पुन्हा या स्मारक निर्मितीच्या कार्यात खंड पडला. (संदर्भ: रायगडची जीवनकथा, शां. वि. आवळसकर).
इंग्रजांचे योगदान
इंग्रजांच्या योगदानात सर. रिचर्ड टेंपल आणि जेम्स डग्लस या दोघांचे नाव प्रामुख्याने येते. सर. रिचर्ड टेंपल (Sir Richard Temple) हे मुंबईचे गव्हर्नर होते, ते स्वतः रायगडावर भेट देण्यास आले होते, त्यांनी रायगडाच्या देखाव्याची अनेक चित्रे रेखाटली आणि सोबत नेली. त्यांनी देखील शिवरायांची मोडकळीस आलेली समाधी पाहिली आणि आपल्यासोबत आलेल्या अधिकार्यांना समाधीच्या डागडुजीबाबत सूचना दिल्या आणि सोबतच त्यांनी कुलाब्याच्या कलेक्टरला देखील या संदर्भात पत्र दिले. त्या काळी रायगड किल्ला कुलाबा जिल्हा लोकल बोर्ड अंतर्गत येत होता. (संदर्भ: रायगडची जीवनकथा, शां. वि. आवळसकर).
दुसरे नाव आहे, जेम्स डग्लस. जेम्स यांचे १८८३ मध्ये ‘A Book of Bombay’ हे पुस्तक बॉम्बे गॅझेट तर्फे प्रकाशित झाले. या पुस्तकात James Douglas यांनी शिवरायांच्या समाधीच्या व रायगडाच्या मोडकळीस आलेल्या स्थितीचे वर्णन केले आहे.
ते असे नमूद करतात की, “रायगड किल्ल्याचे शिवरायांच्या जीवनात व इतिहासात खूप मोठे स्थान आहे. याच रायगडावर शिवरायांनी अनेक मोहिमा आखल्या, याच रायगडावरून दक्षिण मोहीम सुरू झाली, याच गडावर शिवरायांनी आपल्या वडीलांच्या मृत्युची बातमी ऐकली, याच रायगडावर शिवरायांच्या आईने प्राण सोडले, याच रायगडावर शिवरायांचे विवाह झाले, राज्याभिषेक झाला आणि इथेच शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. आज रायगडाची स्थिती दयनीय आहे. धर्मशाळेवर झुडुपांचे राज्य आहे, सगळी वास्तु मोडकळीस आलेली आहे. समाधीची अवस्था देखील खराब आहे.”

“आज कोणीही शिवाजी महाराजांची काळजी करत नाही. शिवरायांनी जिथे राज्य केले, ज्या लोकांना आपले मानले, ज्या लोकांनी शिवरायांना देव मानले, आपण रक्ताने आणि कष्टाने मिळविलेले स्वराज्य ज्या शिवरायांनी कोल्हापूरचे राजे, साताराचे भोसले आणि पुण्याचे पेशवे यांना काळजीपूर्वक दिले त्यापैकी एकही माणूस आज एकही रुपया त्यांच्या समाधीच्या दुरुस्तीसाठी योगदान म्हणून देत नाही.” (संदर्भ: अ बुक ऑफ बॉम्बे, पृष्ठ क्र.४३३, जेम्स डग्लस).
याच पुस्तकानंतर टिळक आणि इतर समाजसुधारक पुढे आले आणि विविध वृत्तपत्रांमधून शिवरायांच्या समाधीच्या मोडकळीस आलेल्या अवस्थेवर लेखन केले आणि हा विषय सामान्य तसेच पुढारी व्यक्तींचे लक्ष वेधून घेऊ लागला. याच पुस्तकानंतर शिवरायांच्या समाधीच्या दुरुस्तीसाठी मोठे प्रयत्न झाले. इतिहासात डोकावून पाहताना हे नक्की समजते की, महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि रिचर्ड आणि जेम्स यांसारखे इंग्रज यांच्या कार्यामुळे आज आपण रायगडावर शिवरायांची समाधी सुव्यवस्थेत बघतो आहोत.
महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक या दोघांनी Chhatrapati Shivaji Maharaj यांचे महत्त्व घराघरात पोहोचविले, आपापल्या संघर्षात जनतेला एकत्र करण्यासाठी शिवरायांची प्रेरणा स्वतः घेतली व जनतेलाही दिली. या दोघांनीही सुरू केलेले समाधीच्या दुरुस्तीचे काम या दोघांच्या निधनानंतर देखील बरेच वर्षे अपूर्ण होते.
जेम्सच्या पुस्तकातील लिखाण खरंच विचार करायला लावते. आपल्याला ज्या माणसाने स्वराज्य दिले, ज्याने स्वाभिमानाने जगणे शिकवले त्याच शिवरायांच्या गडकिल्ल्यांची आज काय अवस्था आहे आणि याला केवळ शासन नव्हे तर तुम्ही-आम्ही देखील जबाबदार आहोत. आपणच गडांच्या वास्तूवर खडूने आपली कला सादर करून आपले फुटकळ नाव अशा दगडावर लिहितो जो एक दगड अबाधित राहावा म्हणून एक एक शिवरायांचा मावळा आपले प्राण देखील गमावायला हसत तयार होता. आज अनेक गड संवर्धन गट खूप सुंदर काम करून गडाची स्वच्छता आणि डागडुजी पाहतात त्यांचे कार्य स्तुत्य आहेच आणि प्रत्येकाने आपल्या परीने या कार्याला हातभार लावणे गरजेचे आहे.

शेवटी, डॉ. अमोल कोल्हे यांच्या ओळी आठवतात, “ जगात लोकांचं टिचभर असतं ते आभाळभर सांगतात आणि आमच्या शिवरायांचा इतिहास आभाळभर आहे पण आम्ही टिचभर सुद्धा सांगत नाही.”