पी.व्ही.नरसिंह राव यांचे पार्थिव कॉंग्रेस मुख्यालयात ठेवण्यास सोनिया गांधींनी का नकार दिलेला ?
पी.व्ही. नरसिंह राव यांचा एवढा राग का करत सोनिया गांधी ?
भारतीय राजकारणातील काही मोजक्या आणि प्रभावशाली नेत्यांच्या यादीत पी.व्ही.नरसिंह राव यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. स्वतंत्र भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून आपण त्यांना ओळखतोच. त्यांच्या कारकिर्दीत भारत सरकारने घेतलेले निर्णय आजही भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर प्रभाव राखून आहेत.
कॉंग्रेसच्या या नेत्याने पक्ष उभारणीतही मोठा सहभाग दिला होता. तरीही कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मनात मात्र P. V. Narasimha Rao यांच्या बद्दल द्वेष होता. आजही या द्वेषामागचे खरे कारण सामान्य भारतीयांना माहित नाही. मात्र, अतिशय अभ्यासू नेतृत्व म्हणून लौकीक कमावणाऱ्या पी.व्ही. नरसिंह राव यांचा सोनिया गांधीना एवढा राग का होता त्याचे अज्ञात कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
पी.व्ही. नरसिंह राव यांनी नवीन औद्योगिक धोरण जाहिर केले. ज्याअंतर्गत भारत एक खुली जागतिक बाजारपेठ बनला आणि खासगी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली. भारतात आर्थिक उदारीकरण आणण्याचा हा निर्णय क्रांतिकारी ठरला. अर्थमंत्री मनमोहन सिंग यांचा देखील या निर्णयात मोठा सहभाग होता. कारण अर्थसंकल्प त्यांच्या हस्ते सादर झाला आणि भारताच्या व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळाली.
पी.व्ही. नरसिंह राव हे गांधी घराण्याशी संबधित नसलेले पहिले असे पंतप्रधान होते ज्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. भारताच्या य़शस्वी पंतप्रधानांपैकी एक पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव भारताच्या राजकीय इतिहासात नोंदविले गेले. अशा या कर्तुत्ववान नेत्याचे २३ डिसेंबर २००४ रोजी हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ज्या नेत्याने आपले अख्खे आयुष्य कॉंग्रेससाठी समर्पित केले त्याच कॉंग्रेसने निधनानंतर त्यांना परक्यासारखी वागणूक दिली.
या आधी निधन पावलेल्या प्रत्येक जेष्ठ कॉंग्रेस नेत्याचे शव अंतिम दर्शनासाठी कॉंग्रेसच्या मुख्यलयात ठेवण्याची परंपरा होती मात्र, तत्कालिन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या आदेशानुसार P. V. Narasimha Rao यांचे शव कॉंग्रेस मुख्यालयात ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. नरसिंह राव यांच्या मुलाने, ‘माझ्या पित्याची कर्मभूमी दिल्ली आहे त्यामुळे त्यांना हा मान मिळावा’ अशी वारंवार विनंती करूनही कॉंग्रेस हायकमांडला पाझर फुटला नाही.
सोनिया गांधी ह्या पी.व्ही. नरसिंह राव यांचा एवढा राग का करत ?
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत भक्कमपणे पाठिशी उभे राहिलेल्या पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सन्मानाची ही विटंबना पाहून अख्खा भारत हळहळला. पण, सोनिया गांधींनी असं करण्यामागे नेमका काय उद्देश होता याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. Rajiv Gandhi यांच्या हत्येनंतर आपसूकच पंतप्रधानपद पी.व्ही.नरसिंह राव यांच्या पारड्यात पडलं होतं. मात्र पंतप्रधान झाल्यावरही पी.व्ही. नरसिंह राव यांनी राजीव गांधींची हत्या करणा-यांना पकडण्यासाठी जास्त कष्ट घेतले नाहीत असा सोनिया गांधींचा आरोप होता.
राजीव गांधी यांच्या हत्याकांड प्रकरणी अतिशय धिम्या गतीने चौकशी सुरू होती याबद्दलही सोनिया गांधींना राग होता. जोपर्यंत पी.व्ही.नरसिंह राव पंतप्रधान आहेत तोवर राजीव गांधींच्या मारेक-यांना शिक्षा होणार नाही अशी खंतही अप्रत्यक्षपणे त्यांनी ब-याचदा बोलून दाखवली. वारंवार जलद चौकशीची विनंती करूनही पंतप्रधान कार्यालय दुर्लक्ष करत आहे अशी नाराजीही व्यक्त केली. आपल्या पतीच्या मृत्युने व्यथित झालेल्या सोनिया गांधी यांच्या मनात तेव्हापासूनच पी.व्ही. नरसिंह राव यांच्याबद्दल द्वेष उत्पन्न होऊ लागला.
त्याचीच परतफेड म्हणून कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर सोनिया गांधी यांनी पी.व्ही. नरसिंह राव यांना एकप्रकारे वळीतच टाकले आणि त्यांच्या मृत्युनंतर कॉंग्रेस मुख्यालयात P V Narasimha Rao यांच्या पार्थिवास जागा न देऊन आपला राग उघडपणे व्यक्त केला.
अर्थात, पी.व्ही. नरसिंह राव यांनी जाणीवपूर्वक राजीव गांधी यांच्या हत्याकांडाची चौकशी लांबवली हि गोष्ट जेष्ठ राजकारणी नाकारतात. नरसिंह राव यांनीच राजीव गांधींची राजकीय कारकीर्द उभारण्यास मदत केली होती त्यामुळे सोनिया गांधी यांना पतीविरहामुळे गैरसमज निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही एक पत्नी म्हणून त्यांचे दु:ख त्यांच्या जागी योग्य आहे. मात्र, पी.व्ही. नरसिंह राव यांचा मृत्युपश्चात झालेला अपमान खरंच दुर्देवी आहे.