भुज मधील काही महिलांनी १९७१ च्या युद्धाचा निकालंच फिरवला
१९७१ च्या युद्धतीला तो क्षण जेव्हा कच्छच्या महिला भारतीय वायुदलाच्या मदतीला धावून आल्या
फार पूर्वी म्हणजे सिंधू संस्कृती अस्तित्वात होती तेव्हापासून महिलांना समाजात मोठे स्थान होते परंतु कालांतराने बऱ्याच कारणांमुळे पुरुष प्रधान संस्कृती उदयाला आली आणि तेव्हापासून पुरुषी अहंकार शिगेला गेला आणि तो आजही कायम आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजही मुलांना करू दिल्या जातात पण मुलींना नाही.
सामान्यपणे समाजाची मानसिकता अशी आहे कि युद्धकाळात तर महिलांचे काही योगदान असणे अशक्यच, अशी खडतर कामं पुरुषांचीच…मंडळी असं नाहीये बरं ! भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करली होती. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते त्याचप्रमाणे या युद्धाच्या यशामागे सुद्धा महिलांचा खूप मोठा वाटा होता.
हवाईपट्टी उध्वस्त
भारत-पाकिस्तान युद्ध (India Pakistan War) हे ३ डिसेंबर १९७१ ते १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालले. गुजरात राज्यात भुज हे शहर आहे. या शहरात भारतीय सेनेची लढाऊ विमाने भुजच्या हवाईपट्टी वरून उड्डाण घेत होती पण युद्धकाळात ८ डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानी लढाऊ विमानांच्या एका तुकडीने अचानक या भुजच्या हवाईपट्टीवर (Airstrip) बॉम्ब हल्ले केले, हे हल्ले इतके जबरदस्त होते कि संपूर्ण हवाईपट्टी उध्वस्त झाली होती.
आपल्या विमानांना आता तेथून उड्डाण घेणे शक्य नव्हते. अशा युद्धाच्या वेळी हि हानी भरून काढणे गरजेचे होते म्हणून भारतीय वायू दलाने, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला ती हवाईपट्टी पुन्हा बनविण्यास सांगितले होते परंतु आपल्याकडे वेळ फार कमी होता, इतक्या कमी वेळात हि हवाईपट्टी पुन्हा बनविणे केवळ अशक्य वाटत होते.
आव्हाने
आता हवाईपट्टी तर पुन्हा पूर्ववत करणे भाग आहे, वेळ कमी आहे आणि कामगार सुद्धा…काय करावे सुचेना. अशावेळी भुज येथील माधापूर (Madhapur) या गावातील गावकरी मदतीसाठी पुढे आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या मदतीसाठी येणाऱ्या माणसांमध्ये महिलासुद्धा होत्या आणि थोड्या-थोडक्या नव्हे तर सुमारे ३०० महिला या कामासाठी पुढे आल्या. आता बोला, छोट्याश्या गावातील महिलांनी मनातील देशभक्ती जागृत केल्यावर त्यांना बाकी कुठलेही सामाजिक बंधन थांबवू शकले नाही. सर्व सामाजिक ग्रह बाजूला सारून, आपण हे काम करू शकतो कि नाही हा विचार न करता, देशासाठी हे काम महत्त्वाचे आहे आणि आपल्याकडून जे होणार ते आपण करू या भावनेने या महिला पुढे आल्या.
“आम्ही अनेकदा धोक्याची सूचना देणारे भोंगे काम करताना ऐकले, परंतु मनात राष्ट्रभक्ती शिवाय भीतीला आणि बाकी कुठल्या चिंतेला जागा उरली नव्हती”, असे मत याच ३०० मधील एका महिलेने प्रसारमाध्यमांना दिले.
तेव्हाचे जिल्हाधिकारी, गावचे सरपंच आणि भुज येथील Indian Air Force Squadron Leader विजय कर्णिक (Vijay Karnik) आणि अशा अनेकांनी या महिलांना प्रोत्साहित केले. कर्णिक स्वतः ती हवाईपट्टी बांधण्याच्या कामात जातीने लक्ष देत होते. युद्धकाळात हे काम करणे फार जोखमीचे होते, महिला त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या टाकून या कामासाठी आल्या होत्या, अनेकांनी आपली लहान मुलं शेजारच्या घरी सोपवून काम करण्यास तैयारी दर्शविली.
या कामात अनेक अडथळे होते. काम पूर्णपणे मोकळ्या आकाशाखाली होते, कोणत्याही वेळी पाकिस्तानी विमानांची तुकडी येऊन हवाई हल्ला करू शकत होती, भुजच्या सैनिकांकडे हे काम पूर्ण करून घेण्यासाठी फार कमी कालावधी होता, या कालावधीत हे काम होणे अशक्य वाटत होते. शत्रू अजून शक्तिशाली होण्याच्या आधी आपल्याला सज्ज होऊन याच हवाईपट्टी वरून उड्डाण घेता यावे आणि शत्रूला अद्दल घडवावी हि सर्वांचीच भावना होती. अखेर कामाला सुरुवात झाली. शक्य तितक्या जलद, शक्य तेवढ्या लोकांनी पडेल ते काम केले आणि आपले योगदान दिले.
पहिल्या दिवशी महिलांना व कामगारांना खाण्यासाठी सुद्धा काही मिळाले नाही तरीही तक्रार न करता देशासाठी सर्वानी प्राण पणाला लावून काम केले, दुसऱ्या दिवशी मात्र जवळच्या मंदिरातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून या सर्वांना खाण्याची व्यवस्था झाली. महिलांनी मोकळ्या आकाशाखाली काम करणे धोक्याचे होते, कोणत्याही वेळी पाकिस्तानी विमाने हल्ला करू शकत होते, यासाठी भारतीय वायू दलाला जेव्हाही असा अंदाज वाटे कि आता पाकिस्तानी विमाने हल्ला करतील तेव्हा ते मोठा भोंगा वाजवून सर्वाना सावधान करीत आणि सुरक्षित छत्राखाली त्यांना एकत्र करीत.
महिलांना हिरव्या रंगाच्या साड्या घालण्यास सांगितले गेले ज्यामुळे त्या आजूबाजूच्या परिसरात समरस होतील व आकाशातून शत्रूला सहज दिसणार नाहीत. यापलीकडे त्यांनी कठोर मेहनत घेऊन हवाईपट्टीचा जो भाग बनविला तो भाग गाईच्या शेणाचे सारवला जात असे, यामुळे शत्रूला हि हवाईपट्टी अजून उध्वस्त आहे असेच वाटत राहील व आपले काम सुरळीतरीत्या सुरु राहील.
गगनभरारी
अखेर दिवस-रात्र मेहनत करून महिलांनी सुमारे ७२ तासात हि हवाईपट्टी नव्याने बांधली आणि उध्वस्त झाल्याच्या ७२ तासातच याच हवाईपट्टीवरून भारतीय वायू सेनेच्या पहिल्या विमानाने आकाशात भरारी घेतली आणि युद्धात पुन्हा सामील झाले. या युद्धात पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्करापुढे शरण आले. भारत विजयी झाला. या विजयात वाटेकरी असणाऱ्या या महिलांच्या कामाची दखल इंदिरा गांधी यांनी घेतली आणि त्यांना सन्मानित केले. या महिलांची कामगिरी सदैव सर्वांना स्मरणात राहो व त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळो यासाठी या गावात ‘विरांगणा स्मारक’ बांधण्यात आले आहे.
या ३०० महिलांना इतिहास नेहमीच लक्षात ठेवेल. समाजानेही यापासून फार शिकण्यासारखे आहे. महिलांनी निर्धार केला तर त्या कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावू शकतात आणि बजावत आहेतही. अशा महिलांपासून प्रेरणा घेऊन सर्वच महिलांनी आपल्या अस्तित्वाला आणि स्वातंत्र्याला वेसण घालणारी बंधने झुगारून पुढे आले पाहिजे.
या घटनेपासून प्रेरित होऊन लवकरच एक हिंदी सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव Bhuj: The Pride of India असून ह्यात विजय कर्णिक यांच्या भूमिकेत अजय देवगण (Ajay Devgn) दिसणार आहे.