वाऱ्याच्या वेगाने प्रगती करणारी Aircel कंपनी दिवाळखोरीत कशी निघाली ?
Aircel चे 2017-18 मध्ये जवळपास ९ कोटी यूजर्स होते, मग अशी काय परिस्थिती आली की ज्यामुळे कंपनीला दिवाळखोरीत निघाल्याचे जाहीर करावे लागले
मंडळी तुम्ही Aircel या टेलिकॉम सेक्टर मधील प्रसिद्ध कंपनी बद्दल नक्कीच ऐकले असेल, काही दिवसांपूर्वीच या कंपनीने Bankruptcy म्हणजेच दिवाळखोरीत निघाल्याचे जाहीर केलेले आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की ही कंपनी मागच्या काही वर्षांमध्ये फार प्रसिद्ध झाली होती. कंपनीचे 2017-18 मध्ये जवळपास ९ कोटी यूजर्स देखील होते, मग अशी काय परिस्थिती आली की ज्यामुळे कंपनीला दिवाळखोरीत निघाल्याचे जाहीर करावे लागले, चला जाणून घेऊयात…..
एअरसेल कंपनी संपूर्ण भारतामध्ये प्रचंड वेगाने गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना दिसून आली. 1999 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती सी शिवाशंंकरन (C Sivasankaran) यांनी या कंपनीची स्थापना केली होती आणि अगदी ६ वर्षांतच या कंपनीने मलेशियाची प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Maxis Communications सारख्या कंपनीला देखील भारतात पैसे गुंतवण्यास तयार केले. मॅक्सिस कम्युनिकेशन या कंपनीने एअरसेलमध्ये 74% 2005 मध्येच गुंतवले होते. कुठल्याही भारतीय कंपनीने कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरून गुंतवणूक आजपर्यंत टेलिकॉम सेक्टर मध्ये आणली नव्हती.
सुरुवातीपासूनच Aircel ने वेगाने काम करण्यास सुरवात केली. भारतातील अनेक राज्यांमध्ये या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणात चालू होतं. तामिळनाडू, आसाम, ओडिसा आणि ईशान्य भारतात एअरसेलने आपली ओळख निर्माण केली होती. या भागात कंपनीने मोठ्या प्रमाणावरती युजर देखील तयार केले होते. जर तुम्हाला आठवत असेल तर प्रसिद्ध क्रिकेटपटू M S Dhoni देखील एअरसेल या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसिडर होता यावरून तुम्हाला या कंपनीच्या यशाची देखील कल्पना नक्कीच येईल.
एअरसेल एकेकाळी भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक होती. परंतु असं काय घडलं की एवढं प्रचंड काम करून दाखवणारी कंपनी अचानक दिवाळखोरीत निघाली. तर, मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या टेलिकॉम सेक्टर असा बिजनेस आहे ज्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. त्यामुळे या कंपन्यांना नेहमीच कर्जाची आवश्यकता असते, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा अश्या कंपन्या बिजनेस वाढावा म्हणून अनेक ठिकाणाहून कर्ज घेत असतात. 2017 पर्यंत या कंपनीचे सर्व काही व्यवस्थित चालू होते परंतु काही दिवसांनी आपणा सर्वांना माहिती आहे की रिलायन्स जिओ मार्केटमध्ये आल्यानंतर अनेक टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्यांना मोठा तोटा झाला होता.
Jio सोबत स्पर्धा करण्यासाठी इतर कंपन्यांनी त्यांचे दर देखील मोठ्या प्रमाणावर कमी केले. अनेक कंपन्यांनी एकमेकांशी टाय अप करत जिओ सोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न देखील केला. हे आपण मान्य केले पाहिजे की जगभरात केवळ भारत असा देश आहे जिथे सर्वात स्वस्त इंटरनेट उपलब्ध आहे आणि त्याचं कारण म्हणजे जिओ. जेव्हा रिलायन्स जिओ या कंपनीने फ्री मध्ये सर्व्हिस द्यायला सुरुवात केली तेव्हा इतर कंपन्यांप्रमाणे Aircel ला देखील या गोष्टीचा तोटा झाला. त्यांच्या ग्राहकांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी एअरसेलला स्वतःचे दर कमी करावे लागले नंतर कालांतराने त्याही पेक्षा कमी करावे लागले आणि यामुळे कंपनीचे आर्थिक परिस्थिती खालावू लागली.
स्पर्धेत राहण्यासाठी कुठलाही विचार न करता आपले दर घटवणे एअरसेलने सुरू ठेवले परंतु यामुळे कंपनीला कमालीचे नुकसान झाले. त्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला. 2017 मध्ये कंपनीला तब्बल 120 करोड रुपयांचा नफा झाला होता परंतु पुढे स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी कमी केलेल्या दरामुळे त्यांना तब्बल 120 करोड रुपयांचा तोटा सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर एअरसेल वर तेव्हा जवळपास 15,000 करोड एवढे कर्ज होते. व्यवसायात होणारे नुकसानामुळे एअरसेलला कर्ज फेडणे अवघड जाऊ लागले आणि अशा वेळेला मॅक्स कम्युनिकेशनने देखील एअरसेल मध्ये आपले पैसे गुंतवण्यास नकार दिला, या सगळ्या अडचणींमधून सुटका मिळवण्यासाठी एअरसेलने रिलायन्स सोबत काम करण्याचे ठरवले परंतु काही टेक्निकल कारणांमुळे हे देखील शक्य होऊ शकले नाही.
सततचे होणारे नुकसान सहन होत नसल्यामुळे कंपनीने हळूहळू गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या भागातील आपली सेवा बंद केली आणि अशा परिस्थितीत एअरसेलने दिवाळखोरीत निघाल्याचा दावा केला. कंपनीने National Company Law Tribunal (NCLT) यांच्याकडे दिवाळखोरी प्रस्ताव दाखल केला होता आणि त्यांनी देखील कंपनीची परिस्थिती बघता त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. आता आय आर पी म्हणजेच इंसोवेन्सी रेसोल्युशन प्रोसेस सुरू करण्यात आलेले आहे म्हणजेच आता कंपनी परत चालू करता येईल का याची देखील पडताळणी करण्यात येईल आणि जर असे होत नसेल तर कंपनीची सर्व मालमत्ता लिलावात काढून इतर लोकांचे कर्ज फेडण्यात येईल.
शक्यतो जेव्हा एखादी कंपनी कर्ज फेडू शकत नसेल अशावेळी कोर्ट त्या कंपनीला दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून NCLT या संस्थेकडे घेऊन जाते, परंतु इथे कंपनी स्वतः गेल्यामुळे अनेक गोष्टी सुलभ होतील अशी अपेक्षा आहे.
भारतामध्ये एखादी कंपनी लिलावात काढण्यासाठी किमान चार वर्ष लागतात असे सांगण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमधील कायद्यामध्ये अनेक सकारात्मक बदल केलेले आहेत त्यामुळे ही प्रक्रिया देखील कमी कालावधीत पूर्ण होत असल्याचे सांगण्यात येते. या नवीन कायद्यातील बदलामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान कमी झालेले आहे.