बाबा आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याबद्दल माहिती
अतिशय कमी वयात हाती बंदूक आणि चारचाकी बाबा आमटेंच्या हाती आलेली. घरची श्रीमंती असल्याने प्राण्यांची शिकार करणं, महागड्या गाड्या चालवणं असले शौक त्यांना होते.
सर्व प्राण्यांत माणसाचं जीवन
अतिशय अनमोल आहे,
माणसाने माणसासारखं जगणं
ह्यालाही त्याहून मोल आहे…
गणपतराव भिंगावडे यांची हि चारोळी मानवी स्वभावाचे अतिशय चपखल वर्णन करते. माणूस सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे, मानवाला बुद्धी आहे आणि त्या जोरावर त्याने प्रगती केली. हे सगळं खरं असलं तरी माणसाने अनेकवेळा स्वतःच्या क्रूरतेचे व प्राण्यांनाही लाजवेल असे नमुने दिले आहेत. आज माणूस हा माणुसकीच विसरला आहे. या स्वार्थी जगात काही माणसं मात्र अशी असतात जी समाजाच्या स्वार्थी प्रवाहा विरुद्ध चालतात आणि त्यातूनही स्वतःचा वेगळा प्रवाह निर्माण करतात. आपल्या कार्याने जगापुढे एक आदर्श निर्माण करतात.
आज आपण बघणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्त्वाबद्दल ज्यांनी केवळ स्वतःलाच नाही तर स्वतःच्या पुढील पिढयांनाही स्वतःसारखं द्रुढनिश्चयी, परोपकारी आणि सहृदयी बनवले. आपण बोलत आहोत ‘बाबा आमटे’ आणि त्यांचा वारसा अजून चार पाऊले पुढे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या मुलांबद्दल.
बाबा आमटे यांच्या बद्दल (Baba Amte Information in Marathi)
मुरलीधर देविदास आमटे यांना आपण बाबा आमटे (Baba Amte) म्हणून ओळखतो. बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे अतिशय श्रीमंत कुटुंबात झाला. बाबांचे वडील देविदास आमटे हे तेंव्हाच्या ब्रिटिश भारतात मोठे ब्रिटिश अधिकारी होते. आपल्या आठ भावंडांमध्ये बाबा थोरले म्हणून त्यांचा थाटही राजेशाही होता.
अतिशय कमी वयात बाबांच्या हातात बंदूक, चारचाकी गाडी अशा वस्तू आल्या. लहानपणापसूनच त्यांना घरात बाबा या नावाने हाक मारली जात असे. पुढे हेच नाव सवयीचे झाले. बाबांनी नागपूर येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ‘बी.ए’ ची पदवी मिळवली आणि पुढे ‘एल.एल.बी’ करून बाबा वर्ध्यात वकिल म्हणून काम करू लागले. वकिली करत असतांना बाबांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला आणि मग बाबा क्रांतिकारकांच्या बाजूने त्यांच्या पक्षात वकिली करत.
बाबांनी महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात बराच काळ मुक्काम केला आणि ते गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले.
एकदा त्यांनी एका मुलीला काही ब्रिटिश लोकांपासून वाचवले होते यामुळे खुश होऊन गांधीजींनी बाबांना ‘अभय साधक’ असे नाव दिले.
बाबांचे कार्य इथेच थांबत नाही उलट ते इथून सुरु होतं. गांधीवादी विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी संपत्तीचा त्याग केला आणि जनसेवेसाठी जीवन अर्पण केले.
कुष्ठरोग्यांची सेवा
आपण ‘कुष्ठरोग’ या आजाराबद्दल नक्कीच ऐकलं असेल. हा रोग तेव्हाच्या काळात एखाद्या श्रापासारखा होता. कुष्ठरोग (Leprosy) हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. हळूहळू हा आजार वाढत जातो. शरीरावरील हाथ, पाय, पूर्ण त्वचा, घसा, डोळे अशा भागांवर परिणाम होऊन त्यांची संवेदना नष्ट होते. त्यामुळे शरीर वेडेवाकडे व विद्रूप होते. अंगावर विचित्र चट्टे तैयार होतात, नाक फुगते, शरीरभर अनेक गाठी तयार होतात असा हा विचित्र आजार आहे. हा आजार संसर्गजन्य आहे असा गैरसमज तेंव्हा पसरला होता त्यामुळे कुष्ठरोग्यांना कोणीही हात लावत नसे, कुष्ठरोग्यांना सरळ घराबाहेर अथवा समाजाबाहेरच टाकले जायचे.
या कुष्ठरोग्यांची व्यथा बाबांना सहन झाली नाही. समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस बाबांनी केले. बाबांनी स्वतः कुष्ठरोग निदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे ठरविले. Baba Amte यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे १९५१ साली ‘आनंदवन’ (Anandwan) या नावाने कुष्ठरोग्यांसाठी आश्रमाची स्थापना केली. परिवारातून, समाजातून बेदखल केलेल्या कुष्ठरोग्यांना बाबांनी आनंदवनात आसरा दिला. त्यांच्यावर योग्य ते उपचार वेळोवेळी केले. अर्थातच बाबांनाही समाजाने वाळीत टाकले. अशा गोष्टींनी डगमगून न जाता बाबांनी अधिक जोमाने आपले कार्य सुरु ठेवले.
बाबांनी ‘नर्मदा बचाओ आंदोलन’, ‘भारत जोडो आंदोलन’ अशा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. बाबांच्या कार्यात अनेक समाजसेवकांनी साथ दिली. ‘महारोगी सेवा समिती’ अंतर्गत बाबांनी आपले कार्य अजून व्यापक केले आणि पुढे अंध व अपंगांसाठी शाळा देखील सुरु केल्या. आनंदवनातील सुविधा वाढविल्या, दवाखाने सुरु केले व कुष्ठरोग्यांना (leprosy patients) स्वावलंबी बनविण्यासाठी बाबांनी अनेक उपक्रम अंमलात आणले. बाबांना मात्र इथेच थांबायचे नव्हते, कुष्ठरोग्यांच्या व्यथेनंतर बाबांना खुणावत होती आदिवासींची व्यथा, त्यांचे राहणीमान, त्यांच्याकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष, नक्षलवादाने होरपळून गेलेले त्यांचे जीवन.
वयाची साठी उलटूनही बाबांचा पुढचा निश्चय केला, तो म्हणजे महाराष्ट्राच्या मध्यपूर्व भागात, गडचिरोली जिल्ह्यात, ‘माडिया-गोंडं’ या आदिवासी जमातींना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्याचा. बाबांच्या आनंदवनाची बरीचशी जाबाबदारी त्यांच्या थोरल्या मुलाने म्हणजेच विकास आमटे (Vikas Amte) यांनी स्वीकारली होती. आता, बाबांना ज्या भागात काम करायची इच्छा होती तो भाग पूर्णपणे जंगलाने वेढला होता, नक्षलवाद्यांचा धोका सतत डोक्यावर होता आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची होती. हा विचार करून, क्षणाचाही विलंब न करता हि जबाबदारी पूर्णपणे बाबांच्या धाकट्या मुलाने स्वीकारली; त्यांचे नाव डॉ. प्रकाश बाबा आमटे.
डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Baba Amte in Marathi)
प्रकाश आमटे यांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेज मधून आपले ‘एम.बी.बी.एस’ आणि ‘एम.एस जनरल सर्जरी’ असे शिक्षण पूर्ण केले. या नंतर डॉक्टर म्हणून प्रकाश यांनी माडिया-गोंड आदिवासींसाठी सेवा करण्याचे ठरविले. ते म्हणतात ना कि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण, इथे जरा वेगळं आहे. इथे स्त्री पुरुषामागे नाही; उलट पुरुषाबरोबर आहे. त्या स्त्री आहेत डॉ. मंदाकिनी आमटे; प्रकाश यांच्या पत्नी. या दोघांनी मिळून आपला नवा संसार जंगलात शून्यापासून थाटायचा ठरवला.
पुढे शासनाकडून भामरागडच्या जंगलात प्रकाश यांना ५० एकर जागा हेमलकसा येथे मंजूर झाली. ‘दिनांक २३ डिसेंबर १९७३’ रोजी हेमलकसा (Hemalkasa) येथे आमटे यांनी ‘लोक बिरादरी’ प्रकल्पाची स्थापना केली.
जिथे हा प्रकल्प उभा राहिला होता तो प्रदेश पूर्णपणे जंगलाने वेढलेला होता, अनेक जंगली जनावरं तिथे निवास करत होते आणि एकंदरीतच हा भाग सर्व सुख-सुविधांपासून वंचित होता. साधी वीज सुद्धा इथे माहित नव्हती आणि पाणी सुद्धा २/३ किलोमीटर लांब जाऊन नदीवरून आणावे लागत असे. या ठिकाणी आदिवासी कुपोषणाचे शिकार झाले होते, अनेक रोग आणि समस्यांनी वेढलेले होते. सरकार त्यांची अमाप पिळवणूक करीत होते, चांगले अन्न, शिक्षण, दवाखाना अशा गोष्टी त्यांना माहीतच नव्हत्या. जंगलात हलणारी प्रत्येक सजीव वस्तू ते मारून खायचे, लाल मुंग्यांची चटणी हा त्यांचा विशेष आवडीचा पदार्थ होता.
त्यांची भाषा आपल्या भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि त्या माडिया भाषेची स्वतःची लिपी सुद्धा नव्हती त्यामुळे कोणी साक्षर असण्याचा प्रश्नच नव्हता. अशा बिकट परिस्थितीत प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी डगमगून न जाता आपला निर्णय ठाम ठेवला आणि जोमाने कार्याला सुरुवात केली. प्रकाश व मंदाकिनी यांच्यासोबत प्रकाश यांची धाकटी बहीण रेणुका, विलास मनोहर, दादा पांचाळ, मुक्ता, जगन, गोपाळ, वासंती, प्रभा यांसारख्या अनेकांनी लोक बिरादरी प्रकल्पाला (Lok Biradari Prakalp) हातभार लावला आणि हा प्रकल्प फुलविला.
लोक बिरादरी प्रकल्प (Lok Biradari Prakalp Information in Marathi)
सर्वप्रथम प्रकल्पात दवाखाना सुरु केला. प्रकाश व मंदाकिनी हे दोघे अतिशय अल्प सुविधा असतानाही याच दवाखान्यातून अनेक आदिवासींवर उपचार करून त्यांना जीवनदान देत होते. १९७६ मध्ये हेमलकसा येथे मग पहिली शाळा झाडाखाली सुरु केली. ज्या मुलांना शिक्षण माहीतच नव्हते, अक्षरं ज्यांना अगदी अनोळखी होती अशा मुलांना शिकवणे अतिशय कठीण पण, हे सुद्धा काम यशस्वी झाले आणि पुढे शाळा मोठा आकार घेऊ लागली. सोबतच दवाखाना सुद्धा हळूहळू सोयीसुविधांनी पूर्ण होत होता.
अशातच एक वेगळी गोष्ट घडत होती ती म्हणजे आदिवासी लोक जंगलातील सगळेच प्राणी मारून खात असत, त्यातील एखाद्या प्राण्याचे पिल्लू ते प्रकाश आमटे यांना आणून देत. अशातच प्रकाश यांनी युक्ती केली आणि त्या प्राण्यांच्या बदल्यात आदिवासींना धान्य देऊ केले आणि त्यांना शेतीचे महत्व पटवून दिले व हळू हळू त्यांना सक्षम केले. आदिवासी अनेक प्राणी प्रकाश यांना आणून देत आणि प्राण्यांचा लळा असलेले प्रकाश त्या प्राण्यांना आपल्याकडेच ठेऊन घेत. प्रकाश यांच्याकडे हळू हळू सगळेच प्राणी निवास करू लागले; अगदी साप, मगर, अस्वल, हरीण, वाघ आणि सिंह सुद्धा. प्रकाश यांनी प्राण्यांना भरभरून प्रेम दिले आणि बदल्यात अगदी जंगली हिंस्त्र प्राण्यांनी सुद्धा प्रकाश यांना प्रेमचं दिले.
आज प्रकाश आमटे यांच्या प्राणिसंग्रहाला ‘आमटे’ज आर्क’ (Amte’s Animal Ark) असे सुद्धा म्हटले जाते.
सद्यस्थितीला; हेमलकसा येथे दवाखाना, ५ सब सेंटर्स, अनेक पटींनी वाढलेली आश्रमशाळा, प्राण्यांचे भले मोठे मायेचे घर असा मोठा वटवृक्ष झाला आहे. आज जवळपास महाराष्ट्राच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातील सुमारे ३६३ खेड्यांतील लाखो लोकांना औषधोपचार करण्यात येतात. आश्रम शाळेतून शिक्षण घेऊन आज आदिवासी समाजातील मुले जगभरात नाव मिळवत आहेत आणि त्यांचे राहणीमान देखील स्थिर झाले आहे. खरंच, इथे फक्त बाबा आमटेच नव्हे तर त्यांच्या पूर्ण परिवाराचे कौतुक करायला शब्द अपुरे पडावेत असा त्यांचा व्यापक कार्यविस्तार आहे. बाबांनी त्यांची पुढची पिढी त्यांच्यासारखीच नव्हे तर, त्यांच्यापेक्षा उत्तम विचार, दृढनिश्चय व धैर्याने आणि माणुसकीने परिपूर्ण घडवली. आज बाबांची मुलचं नव्हे तर त्यांचे नातू, पणतू सुद्धा त्यांचा हा लोककल्याणाच्या वारसा पुढे नेत आहेत.
बाबा आमटे व प्रकाश आमटे यांना मिळालेले पुरस्कार (Baba and Dr. Prakash Amte Awards)
बाबा आमटे यांना १९८५ मध्ये रॅमन मॅगसेसे (Ramon Magsaysay Award) ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रॅमन मॅगसेसे पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार सुद्धा म्हणतात. सोबतच भारत सरकार कडून बाबांना पद्मश्री आणि पद्मा विभूषण सुद्धा प्रदान करून गौरविण्यात आले. एवढंच नव्हे तर गांधी पिस प्राईझ (Gandhi Peace Prize) सुद्धा बाबांना मिळाले आहे. बाबांप्रमाणेच प्रकाश यांनाही २००८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पद्मश्री प्रदान करून गौरवण्यात देखील आले. लोकमान्य टिळक अवॉर्ड सुद्धा प्रकाश व विकास आमटे यांना मिळाले आहे.
मोनाको या देशाने प्रकाश (Dr. Prakash Baba Amte) यांच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट देखील छापले आहे. २०१९ साली डॉ प्रकाश आमटे यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन तर्फे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड (Lifetime Achievement Award) देण्यात आला. हा पुरस्कार बिल गेट्स यांनी स्वतः आमटेंना प्रदान केला.
बाबा आमटे व त्यांच्या परिवाराने खरंच जगाला हेवा वाटावा असे कार्य केले आहे. या सगळ्यांनी खरंच सिद्ध करून दाखवले कि माणसात माणुसकी शिल्लक असेल, इतरांसाठी समानता, करुणा आणि प्रेमभाव असेल तर माणसाच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक करता येतं. बाबा आमटे आणि त्याच्या परिवाराला मनापासून धन्यवाद आणि मानाचा सलाम.