अर्जुन, कर्ण, भीष्म नव्हे तर हा होता महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा
महाभारताची कथा आपल्या सर्वांनाच माहित असेल. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या या युद्धात भगवान श्री कृष्णाच्या रणनीती आणि मार्गदर्शनामुळे पांडव हे युद्ध जिंकले आणि कौरव कैक पटीने जास्त असूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. या युद्धात एकाहून एक सरस असे पराक्रमी आणि वीर योद्धा होता. पण एक योद्धा असा होता ज्याचा एकच बाण युद्धाचा निकाल पलटवून टाकण्यासाठी पुरेसा होता. त्या योद्ध्याचं नाव होतं बर्बरीक.
बर्बरीक घटोत्कच आणि नाग कन्या अहिलावती यांचा पुत्र होता. त्याचे केस जन्मापासूनच कुरळे असल्याने त्याचे बर्बरीक हे नामकरण करण्यात आले होते. लहानपणापासूनच तो वीर आणि महान योद्धा होता. त्याने युद्ध कला आपल्या आईकडूनच शिकली होती.
भगवान शंकराची घोर तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेत तीन अद्भुत बाण प्राप्त करण्याचे काम बर्बरीकने केले होते. यामुळेच पुढे तो ‘तीन बाणधारी’ या नावाने प्रसिद्ध झाला.
अग्नी देवांनी प्रसन्न होऊन त्यांला धनुष्य प्रदान केला होता जो त्यांला तिन्ही लोकांमध्ये विजयी बनवण्यास समर्थ होता.
कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध अपरिहार्य झाल्याची बातमी बर्बरीकला मिळाली. तेव्हा ही बातमी ऐकून आपणही युद्धात भाग घ्यावा अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. जेव्हा तो आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या आईने ‘तू हरणाऱ्याच्या बाजूने युद्धात भाग घेशील’ असे वचन त्याच्याकडून घेतले. आईला तसे वचन दिल्यावर आपले तीन दिव्य आणि अद्भुत शक्ती असणारे बाण घेऊन बर्बरीक निळ्या घोड्यावर स्वार होत युद्धभूमीच्या दिशेने निघाला.
पांडवांच्या बाजूने असणाऱ्या भगवान श्री कृष्णांना बर्बरीक येत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा एका ब्राम्हणाचे रूप धारण करून भगवान श्री कृष्णांनी त्याची भेट घेतली. बर्बरीकच्या भात्यातले ३ बाण पाहून ब्राम्हणाच्या रूपात असेलले भगवान श्री कृष्ण त्याला हसत हसत म्हणाले, फक्त ३ बाण घेऊन तू युद्धात सामील होणार आहे ? तेव्हा बर्बरीक त्यांना म्हणाला माझा एकच बाण संपूर्ण सैन्याला संपवण्यासाठी पुरेसा आहे.
तेव्हा ब्राम्हणाच्या रूपातील भगवान श्री कृष्णांनी त्याला जवळच असलेल्या एका झाडाची सर्व पानं एकाच बाणात छेदून दाखवण्यास सांगितले. बर्बरीने आपल्या भात्यातील बाण काढला आणि झाडाच्या दिशेने सोडला. बाण एक एक करून सर्व पानं भेदत होता. तेव्हा झाडाच्या खाली पडलेल्या एका पानावर भगवान श्री कृष्णांनी मुद्दाम पाय ठेवला. बाण ते पान छेदण्यासाठी त्यांच्या पायाजवळ फिरू लागला. तेव्हा बर्बरीकने ब्राम्हणाच्या रूपातील भगवान श्री कृष्णांना विनंती केली की आपण त्या पानावरुन वरून पाय हटवावा नाहीतर तो बाण आपणांस इजा पोहोचवेल.
बर्बरीकच्या बाणांची ही अद्भुत शक्ती पाहून भगवान श्री कृष्णांनी त्याला विचारले की तुम्ही कोणाच्या बाजूने युद्धात सामील होणार आहात. तेव्हा त्याने आईला दिलेल्या वचनाचा उल्लेख करत ‘मी हरणाऱ्या म्हणजेच कमजोर असलेल्या पक्षाकडून युद्धात सामील होणार’ असे सांगितले. भगवान श्री कृष्णांना हे आधीच माहित होते की युद्धात कौरावांचा पराभव होणार आहे आणि उद्या जर बर्बरीक हरणाऱ्या म्हणजे कौरवांच्या बाजूने सामील झाला तर पांडव हरतील आणि अधर्माचा विजय होईल.
बर्बरीकला युद्धात सामील होण्यापासून रोखण्यासाठी भगवान श्री कृष्णांनी एक युक्ती वापरली. ब्राम्हणाच्या रूपातील भगवान श्री कृष्णांनी दानाची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा बर्बरीक त्यांना म्हणाले, मला जे दान करण्यास शक्य असेल ते मी जरुर दान करेल. भगवान श्री कृष्णांनी हीच संधी साधत बर्बरीकडे त्यांचे मस्तक दान करण्याची मागणी केली. ब्राम्हणाची ही मागणी ऐकून बर्बरीक चकित झाला. पण दिलेल्या शब्दला जागत त्याने स्वतःचे मस्तक दान म्हणून देण्याचे मान्य केले.
मस्तकाची मागणी करणारी ही व्यक्ती कोणी साधी सुधी व्यक्ती नाही हे कळल्यावर बर्बरीकने ब्राह्मणाला त्याच्या खऱ्या रूपाशी अवगत करून देण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या विराट रूपाचे दर्शन बर्बरिकला दिले. या सोबतच अजून एक विनंती बर्बरीकने भगवान श्री कृष्णांकडे केली. ती म्हणजे, ‘मला महाभारताचे संपूर्ण युद्ध पाहायचे आहे तेव्हा आपण माझी ही इच्छा पूर्ण करावी’. भगवान श्री कृष्णांनी त्याची ही विनंती पूर्ण करण्याचे मान्य केले.
फाल्गुन मासाच्या द्वादशीला बर्बरीकने आपले मस्तक बोलल्याप्रमाणे दान केले आणि भगवान श्री कृष्णांनीही मान्य केल्याप्रमाणे त्याच्या कापलेल्या मस्तकारावर अमृत शिंपडत जवळच्याच एका डोंगरावर त्यांचे मस्तक नेऊन ठेवले. जेणेकरून त्याला संपूर्ण युद्ध पाहता येईल. एवढेच नव्हे तर श्री कृष्णाने बर्बरिकला सांगितले कि त्याला येणार काळ कृष्णाच्या नावाने ओळखेल आणि ते नाव म्हणजे ‘खाटू श्याम’. खाटू श्यामचं मंदिर उभारलं जाईल आणि तेथे कृष्णाची नव्हे तर खाटू श्यामची पूजा केली जाईल असे वरदान कृष्णाने बर्बरिकला दिले. आज खाटू श्यामचं हे मंदिर राजस्थान मध्ये असून लोक मोठ्या श्रद्धेने ह्या मंदिरात जातात.
महाभारताचे युद्ध झाले, पांडवांचा विजय झाला. या विजयाचे श्रेय कोणाचे यावरून पांडवांमध्ये तणाव निर्माण झाला. तेव्हा हा प्रश्न घेऊन ते भगवान श्री कृष्णांकडे गेले. भगवान श्री कृष्णांनी त्यांना बर्बरीकला हा प्रश्न विचारण्यास सांगितले. कारण बर्बरीकचे मस्तक सुरवातीपासून शेवटपर्यंत हे युद्ध पाहत होते. जेव्हा पांडवांनी बर्बरीकच्या मस्तकाला विजयाचे श्रेय कोणाचे हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, या विजयाचे श्रेय भगवान श्री कृष्णांना जाते. त्यांची शिकवण, त्यांची उपस्थिती, त्यांची रणनीती निर्णायक होती. मला तर युद्धभूमीमध्ये फक्त त्यांचे सुदर्शन चक्र फिरताना दिसले जे क्षत्रू सैन्याला कापून काढत होते’.
भगवान श्रीकृष्णांच्या रणनीतीमुळे पांडवांचा विजय झाला आणि जो या युद्धाचा निकाल फक्त एका बाणाने बदलू शकत होता तो या युद्धात सामीलच होऊ शकला नाही!
अप्रतिम लेख. सुंदर पणे शब्दांची मांडणी
👍👍👍 शुभेच्छा
धन्यवाद ऍड घनश्याम पोपट दराडे जी.
लेख आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.
फारच छान होता हा लेख
असेच लेख व पौराणिक व इतिहासाततील वास्तव तुम्ही आम्हाला अवगत करत राहाल ही अपेक्षा
धन्यवाद
धन्यवाद Ramesh More जी.
लेख आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.