चीनचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा ह्या मराठमोळ्या डॉक्टर समोर झुकतो
डॉ. कोटनीस हे मुळात एक भारतीय डॉक्टर. ज्यांनी आयुष्याची शेवटची ५ वर्षे चिनी सैनिकांची सेवेत समर्पित केली
“सैन्याने मदतीचा हात गमावला आणि देशाने एक मित्र. त्याचे आंतरराष्ट्रीयवादी विचार आपण नेहमीच स्मरणात ठेवले पाहिजे”
हे शब्द आहेत खुद्द ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’चे संस्थापक असलेल्या माओ झेडाँग यांचे. डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटनीस यांच्या मृत्यूप्रसंगी शोक व्यक्त करताना, या शब्दांद्वारेच माओंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
डॉ. कोटनीस हे मुळात एक भारतीय डॉक्टर. ज्यांनी आयुष्याची शेवटची ५ वर्षे चिनी सैनिकांची सेवेत समर्पित केली आणि लाखो लोकांची मने जिंकत, आपला शेवटचा श्वासही तेथेच घेतला.
आजही डॉ. द्वारकानाथ कोटनीस यांच्याकडे भारत-चीन मैत्रीचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.
डॉ. कोटनीस यांचा जन्म आणि शिक्षण
द्वारकानाथ यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० साली सोलापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते या कुटुंबातील ७ अपत्यांपैकी एक होते. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण मुंबई विद्यापीठाच्या शेठ जी.एस् मेडिकल कॉलेजमधून या ध्येयाने पूर्ण केले की, त्यांना ‘जगातील विविध भागात वैद्यकीय सेवा करायची आहे’.
चीनची भारताकडे मदतीसाठी याचना
१९३० ते १९४० चे दशक भारत आणि चीन दोघांसाठीही बरेच उलथापालथीचे होते. एकिकडे भारतातील स्वातंत्र्यलढ्याने जोर धरला होता तर दुसरीकडे चीनवर जपानचे आक्रमण सुरु होते.
अशातच चीनी क्रांतिकारी असलेल्या जनरल झू दे यांनी जवाहरलाल नेहरुंना पत्र लिहून त्यांच्या सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर्स पाठवण्याची विनंती केली.
मदतीसाठीच्या या याचनेत झेडाँग यांनी स्वतः एक चिठ्ठी जोडली, “…आमची मुक्ती, भारतीय आणि चीनी लोकांची मुक्ती, सर्व शोषित आणि अन्यायग्रस्त लोकांच्या मुक्तीचा संकेत असेल”
डॉ. कोटनीसांचा चीनला वैद्यकीय सेवेसाठी जाण्याचा निर्णय
१९३८ साली कोटनीस नुकतेच ग्रज्युएट झाले होते आणि पोस्ट ग्रज्युएशनची तयारी करत होते. त्यांना या संधी विषयी समजले. तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घरच्यांना कळवून टाकले की पोस्ट ग्रज्युएशन आधी, ते परदेशात जाऊन एक स्वयंसेवक म्हणून काम करु इच्छितात.
त्या साध्या कुटुंबाला चीन एक युद्ध क्षेत्र आहे, याव्यतिरिक्त चीनबद्दल काहीच माहित नव्हते. डॉ. कोटनिसांची लहान बहीण मनोरमा सांगते,
“त्यावेळी ना त्यांना – ना कुटुंबातील एकाही सदस्याला चीनबद्दल फारशी माहिती होती. आम्हाला फक्त इतकंच माहीत होतं की, तिकडचे लोक भारतात चिनी रेशीम विकायला येतात”
चीनबद्दल फारशी माहिती नसूनही डॉ. कोटनीस एका युद्धग्रस्त देशात जायला तयार झाले. डॉ. कोटनीसांचा हा निर्णय त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.
भारतीय डॉक्टरांची टीम चीनकडे रवाना
नागपूरचे एम.चोळकर, कलकत्याचे बी.के.बसु आणि देवेश मुखर्जी आणि अलाहाबादचे एम.अटल या चार इतर डॉक्टर असलेल्या पथकाचे ते सदस्य होते.
झेडाँग आणि जनरल झु यांनी स्वतः या तरुण डॉक्टरांचे चीनमध्ये स्वागत केले. चीनी सैनिकांच्या मदतीसाठी दुसऱ्या आशियायी देशातून आलेली, ही पहिलीच वैद्यकीय टीम होती.
भारतीय डॉक्टरांनी मोबाईल क्लिनिकमध्ये जखमी सैनिकांवर उपचार केले. इतर कोणत्याही सैन्याच्या डॉक्टरांप्रमाणेच त्यांचे कामही अतिशय तणावग्रस्त होते. कारण जपानसोबत सुरु असलेल्या युद्धामुळे दररोज ८०० जखमी सैनिक उपचारासाठी यायचे.
काही दिवस तर डॉ. कोटनीस यांनी डोळ्याला डोळा न लागू देता सलग ७२ तास काम केले. तरुण भारतीय डॉक्टर्स अशा बिकट परिस्थितीतही खंबीरपणे काम करत होते.
या कामामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर परिणाम होत होता. मात्र तरीही चिनी सैनिकांसाठी ते दिवसरात्र झगडत होते.
डॉ. कोटनीसांचा चीनमध्येच थांबण्याचा निर्णय
अखेर युद्ध संपले आणि भारतातून आलेले सर्व पाहुणे मायदेशी जाण्यास तयार झाले. फक्त डॉ. कोटनीस त्यात नव्हते. चीनच्या प्रेमात पडलेल्या डॉ. कोटनीसांनी आणखी काही काळ तेथेच घालवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुटुंबाला लिहिलेल्या पत्रांमधून त्या प्राचीन देशाबद्दल त्यांना जे काही आवडले, ते प्रतिबिंबित होत होते.
डॉ. कोटनीस यांची लोकप्रियता शिगेला
हे म्हणजे केवळ असे नव्हते की, एका भारतीयाने चिनींना मदत करण्यासाठी घर सोडले आणि चिनी त्याची प्रशंसा करत होते. डॉ. कोटनीस त्यांच्यापैकीच एक होत होते. त्यांनी त्यांची भाषाही शिकली.
लोक त्यांना ‘केडीहुआ डाय फु’ म्हणायचे. केडीहुआ, हे कोटनीसांचे चिनी नाव आणि ‘डाय फु’चा अर्थ डॉक्टर. केडीहुआंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच होती.
उत्तर चीनमध्ये सेवा केल्यानंतर १९३९ साली डॉ. कोटनीस माओच्या नेतृत्वातील एथ रुट आर्मीत सामील झाले. इथे देखील ते तणावग्रस्त वातावरणात तासंतास काम करत होते.
त्यांचे हे कष्ट सर्वच लोक उघड्या डोळ्यांनी पाहत होते. या कष्टाचे फळ म्हणूनच की काय, पुढच्याच वर्षी डॉ. कोटनीस यांची ‘बेथून आंतरराष्ट्रीय पीस हॉस्पिटल’च्या डायरेक्टर पदी नेमणूक करण्यात आली.
डॉ. कोटनीसांचे चीनी युवतीशी लग्न आणि अपत्यप्राप्ती
इथेच डॉक्टर कोटनीसांना त्यांचं पहिलं प्रेम मिळालं. गुओ क्विंग्लॅन असं त्या युवतीचं नाव. तिने नर्सिंगचा कोर्स केला होता आणि वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एथ रुट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती.
तिने डॉ. कोटनीसांना एका उद्घाटन कार्यक्रमात पाहिले आणि पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडली. डॉ. कोटनीसही त्या युवतीच्या प्रेमात पडले, जिने त्यांचे जीर्ण आर्मी जॅकेटपाहून त्यांना एक स्वेटर भेट केले.
१९४१ च्या डिसेंबर महिन्यात दोघेही लग्न बंधनात अडकले आणि पुढच्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्यांना पुत्रप्राप्ती झाली. नाय रॉंगझेन या एका प्रमुख कम्युनिस्ट राज्यकर्त्याच्या शिफारसी वरुन कोटनीस जोडप्याने मुलाचं नाव यीनहुआ ठेवले. यीन म्हणजे इंडिया आणि हुआ म्हणजे चायना, त्यामुळे हे नाव दोघांसाठीही उचित होते.
डॉ. कोटनीस यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर
मान, प्रतिष्ठा, सुखी संसार असं सर्व काही असतानाही या जोडप्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. डॉ. कोटनीसांवर कामाचा ताण पडत होता आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत होता.
अखेर ९ डिसेंबर १९४२ रोजी म्हणजे यीनहुआच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यातच डॉ. कोटनीस यांची एपीलेप्सी अटॅकने प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांचे वय फक्त ३२ वर्ष होते.
त्यांचे शव नॅनक्वान गावातील हिरोज कोर्टयार्डमध्ये दफन करण्यात आले आणि संपूर्ण देशाने त्यांना श्रद्धांजली वाहिली.
“त्यांची स्मृती फक्त तुमची किंवा आमची नाही. तर मानवजातीच्या प्रगती आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाची आहे. वर्तमानापेक्षा भविष्यात त्यांचा अधिकच सन्मान होईल. कारण त्यांचा संघर्ष हा भविष्यासाठी होता” – मदामे सन यात-सेन (चिनी नेते)
डॉ. कोटनीस यांचा मुलगा यीनहुआ त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत होता. पण याला नियतीचा खेळ म्हणा किंवा अजून काही, यीनहुआ १९६७ साली मेडिकल कॉलेजमधून ग्रज्युएट होऊन बाहेर पडणार होता. परंतु त्याचवेळी त्याचा वैद्यकीय स्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला.
डॉ. कोटनीस यांच्या पत्नीने आपले उर्वरित संपूर्ण आयुष्य नवरा आणि मुलाच्या आठवणींच्या आधारे व्यतीत केले.
डॉ. कोटनीस गेल्यानंतरही त्यांच्या पत्नीचा यथोचीत सन्मान
डॉ. कोटनीस यांच्या पत्नीला भारत – चीन दरम्यान होणाऱ्या परराष्ट्र संबंधाविषयीच्या अनेक बैठकांमध्ये आदरणीय पाहुणे म्हणून बोलावले जायचे. एकदा बिजींग येथे माजी राष्ट्रपती के.आर.नारायण आणि पंतप्रधान वाजपेयी यांच्यासाठी आयोजीत कार्यक्रमातही त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
त्या अधूनमधून मुंबईत आपल्या सासरच्यांचीही भेट घ्यायच्या. २०१२ साली वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचीही प्राणज्योत मालवली. टपाल तिकिटांद्वारे असो, पुतळ्यांद्वारे असो किंवा मग शब्दांद्वारे, डॉ. कोटनीसांच्या निस्वार्थी सेवेला चीनच्या हृदयात नेहमीच महत्वाचे स्थान मिळाले!