आईच्या प्रेमापोटी स्वतःसोबत आईचं नाव लावण्यारा पराक्रमी राजा.
आता सोशल मीडियावर आपल्या नावात आईचे नाव लावण्याची पद्धत आली आहे पण ही नवलाई नाही. इ स 230 मध्येच एका पराक्रमी राजानं याची सुरवात केलीय.
काही वर्षांपासून सोशल मीडियावर आपल्या नावात आडनाव लावण्याऐवजी सोबत फक्त वडिलांचे नाव लावण्याची पद्धत चालू आहे. त्याच्याही पुढे जाऊन आता काही मंडळी वडील आई आणि आडनाव अशी तिन्ही नाव जोडतात. उदाहरण द्यायचं झालं तर आदित्य ठाकरे यांनी शपथ घेताना तसा उच्चार केला होता, नंतर लोकांनी भरभरून कौतुक सुद्धा केले. पण आता याच्याही पुढे जाऊन काही लोक फक्त आपल्या आईच्या नावाचा आपल्या स्वतःच्या नावासोबत उल्लेख करत आहेत. आईच्या प्रेमापोटी तिचे लावणे हे योग्यच. आपल्याला वाटेल ह्याचा उदय आता झाला की काय ? पण उत्तर नाही अस आहे. इ स 230 मध्ये महाराष्ट्रातील पराक्रमी राजाने आपल्या आईच्या नावाचा उल्लेख पहिल्यांदा केला आणि मग तिथून पुढच्या सगळया राजांनी तीच पद्धत अवलंबली.
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात अनेक ठिकाणी विविध राज्य उदयास आली. उत्तरेत शुंग आणि कनवांचे वर्चस्व निर्माण झाले तर इकडे महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याचा उदय झाला. सातवाहन काळात राजकीय स्थैर्य आणि उत्कृष्ट प्रशासनच्या जोरावर महाराष्ट्राची कला स्थापत्य आणि व्यापारात भरभराट झाली आपल्याला माहीत आहे.
तब्बल इ स पू 230 ते इ स 230 असे एकूण 460 वर्षे 30 सातवाहन राजांनी महाराष्ट्रावर राज्य केले. महाराष्ट्राला सुजलाम करणाऱ्या या साम्राज्याने जागतिक नकाशावर महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण केली. याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
‘त्रिसमुद्रतोय-पितवाहन’
सिमुक नावाच्या राजापासून या साम्राज्याची सुरवात झाली. यानंतर अनेक राजे आले त्यांनी पराक्रम गाजवले आणि सातवाहनचा विस्तार केला पण पुढे याच तडफेचे राजे तयार न झाल्याने सातवाहन साम्राज्याला गळती लागली आणि शकांच्या आक्रमानपुढे राज्य दुर्बल बनले. पण यानंतर आलेल्या पराक्रमी राजाने आपल्या तळपत्या तलवारीने सातवाहनांचा दरारा पुन्हा निर्माण केला तो ‘गौतमीपुत्र सातकर्णी’. गेलेला प्रदेश पुन्हा मिळवून त्याने साम्राज्याचे पुनरुज्जीवन केले.
शक, पल्लव, यवन अश्या एकास एक असणारया राज्यांना गौतमीपुत्र सातकर्णीने पराभवाचे पाणी पाजले. त्याच्या ह्या पराक्रमाबद्दल त्याच्या आईने त्याचे ‘त्रिसमुद्रतोय-पितवाहन’ असे वर्णन केले आहे, याचा अर्थ ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत.
स्वतःच्या आईबद्दल असलेल्या नितांत प्रेमापोटी त्याने स्वतःच्या नावपूर्वी आईचे नाव लावले आणि तो झाला पराक्रमी “गौतमीपुत्र सातकर्णी”. पुढे अनेक राजांनी या प्रथेचे पालन करत आईच्या नावाचा आपल्या नावात आवर्जून उल्लेख केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.