१९६५ च्या युद्धात पाकिस्तान विरुद्ध जिंकूनही भारताची हार कशी झाली ?
युद्धात जिंकलो तहात हरलो
सन १९६५ आणि सन १९६६ चा पुर्वार्ध भारतीयांच्या स्मृतीतून कधीही जाणार नाही. देशाच्या दृष्टीने अभिमान वाटणाऱ्या आणि देशाला हळहळायला लावणाऱ्या आणि बरोबरच शंकेत टाकणाऱ्या काही घटना ह्या काळात घडल्या. त्या घटना म्हणजे भारत-पाक युद्ध, भारताच्या सैन्याची एतिहासिक कामगिरी, युनायटेड नेशन्सने लादलेले सिझ फायर, ताश्कंद करार आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू.
भारत-पाकिस्तान दरम्यान १९४८ नंतर वातावरण तसे तणावाचेच होते. काश्मीर काबीज करण्याचा १९४८ चा पाकचा केविलवाणा प्रयत्न भारताने उधळून लावला ह्याची सल पाकिस्तानच्या मनात होती. पाकिस्तान एका संधीची वाट पाहत होते जी त्यांना भारतीय सैन्याला नमवण्यास मदत करेल. पाकिस्तानने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ऑपरेशन जिब्राल्टरच्या अंतर्गत ५००० ते ३०००० सैन्यासह काश्मीरमधील चार उंचावरील प्रदेश, गुलमर्ग, पीरपंजाल, उरी, बारामुल्ला हे काबीज करण्याचा प्रयत्न केला. तो ह्यासाठी की ह्या उंचीवरुन भारतीय सैन्याला नमवणे सहज शक्य होईल असे त्यांना वाटले.
भारताला पाकिस्तानच्या ह्या लुडबुडीची भनक लागली आणि भारतीय सैन्याने पूर्ण शक्तीनीशी उत्तर देउन ऑपरेशन जिब्राल्टर मोडीत काढले आणि इथूनच त्या एतिहासिक युद्धाला सुरुवात झाली. भारत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिहला चढवु शकेल असे पाकिस्तानच्या ध्यानी मनीही नव्हते. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानच्या ह्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर द्यायचे ठरविले आणि पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर मोडीत काढून भारताने पहिला घाव घातला. काय होते पाकिस्तानचे सिक्रेट मिशन – ऑपरेशन जिब्राल्टर ?
भारतीय सैन्याने उत्कृष्ट कामगीरी बजावत पाकिस्तानच्या पश्चिम भागावर हल्ला चढवला होता. ह्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला. चीन तेव्हाही भारताविरुद्ध कुरापती करण्यात माहीरच होता, पण ह्या वेळी त्यांनी पाकिस्तानला प्रत्यक्ष पाठिंबा दिला नव्हता. पण असे असले तरी चीनने पाकिस्तानला लपुन सर्वातोपरी मदत केली. चीनचा भारतावर राग असण्यामागचे कारण म्हणजे भारताने जवाहरलाल नेहारुंच्या कार्यकाळात दलाई लामा यांना आश्रय दिला होता.
सैन्यप्रमुखांनी दिलेली चुकीची माहिती
असं म्हणतात तत्कालीन सैन्यप्रमुख जयंतो नाथ चौधरी (General Jayanto Nath Chaudhuri) यांनी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना दिलेल्या खोट्या माहितीमुळे जिंकत असलेल्या युद्धात तह करण्याची वेळ भारतावर आली. पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यानी जेव्हा भारताच्या सैन्य व दारूगोळ्या बद्दलचा आढावा सैन्यप्रमुख जयंतो नाथ चौधरी ह्यांच्या कडून घेतला तेव्हा त्यांनी भारताचा दोरुगोळा हा संपुष्टात आला असून आपण जास्त प्रमाणात रणगाडे गमावले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात भारतीय दारुगोळा आणि हत्यारे १४% च्या वरही वापरला गेला नव्हता आणि तुलनेने पाकिस्तानचा ८०% दारुगोळा वापरुन झाला होता.
ह्याचा अर्थ स्पष्ट होता, आणखी आठवडाभर जर युद्ध चालु राहीले असते तर पाकिस्तानला एकतर शरणागती पत्कारावी लागली असती किंवा युद्धात तग धरण्यासाठी चीनची खुली मदत मागावी लागली असती. आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी चीनने असा खुला पाठिंबा दिलाच नसता व पाकिस्तानला शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण जयंतो नाथ यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे पंतप्रधान शास्त्रीजींनी (Lal Bahadur Shastri) तहावर विचार करण्यास सुरुवात केली.
जयंतो नाथ ह्यांच्या डरपोकतेपणा व मनमानी कारभारा विषयी स्वतः तत्कालीन सरक्षंण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या डायरीत लिहीले आहे. ते म्हणतात “जयंतो नाथ फार लवकर घाबरुन जात असत व सीमेवर जाण्यास तयार नसत.” र.द. प्रधान हे यशवंतरावचे सचिव होते व त्यांना यशवंतरावांची डायरी वाचण्याची मुभा होती. त्यांनीच ही हकीकत त्यांच्या “१९६५ वॉर, द इनसाइड स्टोरी : दी डिफेन्स मिनिस्टर डायरी ऑफ इंडिया पाकीस्तान वॉर” ह्या पुस्तकांत मांडली आहे.
पंजाब प्रातात जेव्हा जनरल हरबक्स सिंग पोजिशन वर होते, तेव्हा जयंतो नाथ चौधरी यांनी त्यांना त्यांच्या ११ तुकड्यांना घेउन मागे हटण्याचा व सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आदेश दिला. पण जनरल हरबक्स सिंग यांनी प्रसंगावधान राखत जयंतो ह्यांचा आदेश न पाळता पाय रोवून लढण्याचे ठरविले आणि पंजाब प्रांत सुरक्षित ठेवण्यात त्यांना यश आले. त्यांनी जर जयंतो यांचा आदेश प्रमुख म्हणून मानला असता तर पंजाब पाकिस्तानच्या हातात गेले असते. हि सर्व हकीकत जनरल हरबक्स सिंग यांनी आपल्या “इन द लाईन ऑफ ड्युटी” ह्या पुस्तकात लिहीली आहे.
हीच ती लढाई ज्यात भारतीय सैन्याचे हवालदार अब्दुल हमीद यांनी प्रचंड विरतेने लढुन पाकिस्तानचे बरेच पैटन टॅंक उध्वस्त केले होते आणि पंजाब राखले होते.
भारताने लाहोर आणि सियालकोट वर संपूर्ण ताबा मिळविला असता इतकेच नाही तर पाकिस्तानचे अस्तित्वच संपुष्टात आले असते पण चुकीच्या माहीतीमुळे ताश्कंत करार करण्यास शास्त्रीजी तयार झाले. १० सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तान सैन्यावर इतका जबरदस्त हल्ला चढविला होता की पाकिस्तानी सैन्य आपल्या २५ टॅंक्स सोडुन पळुन गेले होते. टॅंक मधले इंजिन आणि वायरलेस चालूच ठेऊन त्यांनी पळ काढला म्हणजे भारताचा विजय कितीतरी जवळ होता.
सप्टेंबर २३ ला युनायटेड नेशन्सने सिझ फायर लागू केला आणि सोव्हियेत युनियनने दिलेल्या ताश्कंत कराराच्या प्रस्तावासाठी दोनीही देशांनी ताश्कंतला चर्चेसाठी व स्वाक्षरीसाठी जाण्याचे ठरविले. इथुन पुढे जे घडले ते अनाकलनीय व निराशाजनक होते.
युद्धात जिंकतो आणि तहात गमावतो
आपण भारतीय युद्धात जिंकतो आणि तहात जिंकलेलं गमावतो अशी आपली जगभर ख्याती आधीच होती. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) भारताच्या ह्या प्रतिमेला पुसून काढतील आणि आपल्या सैन्याला निराश करणार नाही असा भारतीयांना विश्वास होता आणि तसेच वचन त्यांनी सैन्याला दिले होते, कारण नुकताच १९६२ मध्ये आपण चीन सोबत युद्ध हरलो होतो. जानेवारी १९६६ च्या पहिल्या सप्ताहात भारत व पाकिस्तान दोन्ही देशाचे प्रमुख नेते ताश्कंतला रवाना झाले.
ताश्कंत हे तेव्हाच्या सोव्हियेत युनियन मधल्या उझबेकिस्तान मधले शहर. तिकडे सुरु झालेल्या चर्चेत शास्त्रीजींनी सांगितले कि ते काश्मीरच्या बाबतीत कुठल्याही तडजोडीला तयार नाहीत कारण त्यांनी तसे वचन आपल्या देशवासीयांना दिले आहे. ह्या करारात सोव्हिएतने मध्यस्थ म्हणून ॲलेक्सी कोसिगिन यांची निवड केली होती कारण दोन्ही देशांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. शास्त्रीजींना करारात ‘No War Clause’ हवा होता. म्हणजे पाकिस्तान कडून असे आश्वासन की भविष्यात कोणत्याही प्रश्नासाठी पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धाचा वापर करणार नाही.
पाकिस्तानने खूप आढेवेढे घेत शेवटी त्या “नो वॉर क्लॉज” ला नकारच दिला. अखेर १० जानेवारी १९६७ ला दोन्ही देशांनी ताश्कंत करारावर सह्या केल्या, या कराराच्या (Tashkent Agreement) अनुसार युद्ध काळात दोनीही देशांनी ताब्यात घेतलेले प्रदेश एकमेकांना परत करावे ज्यानुसार सर्वात जास्त तोटा भारताचाच झाला कारण तुलनेने पाकिस्तानने भारताचा फार कमी भुभाग काबीज केला होता आणि “नो वॉर क्लॉज” करारातून वगळण्यात पाकिस्तान यशस्वी झाला. अशा प्रकारे सैन्याने धैर्याने जिंकलेले युध्द भारताने तहात हरले.
शास्त्रीजी खुप नाराज झाले. आपण आपल्या शब्दाला जागलो नाही ह्याची सल त्यांच्या मनात असावी. त्या रात्री आपल्या हॉटेलच्या रुममध्ये चिंतेत शतपावली करणारे शास्त्रीजींना एका कॅमेराच्या माध्यमातून सर्वांनी बघितले. इतका एकतर्फी करार त्यांनी का स्विकारला हे अजूनही रहस्यच आहे. पण भारतीय तहात हुशार नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले. रात्री ९.३० वाजता कराराचा कार्यक्रम संपवून शास्त्रीजी सर्वांना निरोप देउन आपल्या रुममध्ये गेले. त्यानंतर चार तासांनी रात्री अडीच वाजता त्यांना हृदय विकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली.
शास्त्रीजींच्या मृत्यू भोवती असलेले संशय (Mystery behind death of Lal Bahadur Shastri)
त्यांच्या मृत्यूभोवती बरेच संशय आहेत. जसे की कोणताही मोठा नेता जेव्हा हॉटेल रुम मध्ये थांबतो तेव्हा त्याच्या रुममध्ये एक घंटी असते जी अतीटतीच्या प्रसंगी नेत्याला वाजवुन मदत बोलवता येते. अशी कुठलीही घंटी शास्त्रीजींच्या रुममध्ये नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नेहमीचा स्वयंपाकी राम नाथने जेवन न बनवता भारतीय राजदूत टी.एन.कॉल ह्यांचा स्वयंपाकी जान मुहम्मदने जेवन बनविले होते.
शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांचा स्वयंपाकी राम नाथचा अपघात झाला व त्याची स्मृती गेली. तिसरी गोष्ट म्हणजे शास्त्रीजींचे पुत्र अनिल शास्त्री यांनी शास्त्रीजींच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर निळे डाग पाहीले. हे डाग शास्त्रीजींचा मृत्यू गुढ परीस्थितीत झाल्याच्या संशयाला बळ देतात आणि हे असे असतांना शास्त्रीजींच्या देहाचे शवविच्छेदन न करता थेट अंतिमसंस्कार केला गेला.
लेखक अनुज धर यांनी लाल बहादूर शास्त्रींच्या गूढ मृत्यू वरुन माहिती अधिकार याचिका दाखल करुन शास्त्रीजींच्या मृत्यूबद्दलची कागदपत्रे मागितली तर त्याला उत्तर देताना सरकारने ही माहीती उघड केल्यास भारताचे परराष्ट्र संबंध तणावाचे होतील, देशात अराजकता माजेल व संसदीय प्रतिष्टेचा भंग होईल असे उत्तर दिले. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना नक्की काय झाले हेही आम्हाला कळू शकणार नाही कारण इतर देशांचा विचार करावा लागेल.
कुणी म्हणतं की ह्यात पाकिस्तानचा हात आहे तर कुणी म्हणत हे CIA(अमेरिकेची गुप्तचर संस्था) चे कारस्थान आहे तर काही जण KGB (रशियाची गुप्तचर संस्था)वर संशय घेतात. पण सत्य आजवर एकाही सरकारने शोधून काढले नाही. इतकेच काय तर शास्त्रीजींच्या जयंती आणि पुण्यतिथी शिवाय कुठल्याही पक्षाचे सरकार व नेते साधा उल्लेखही करत नाही त्यांचा.
नुकताच Tashkent Files ह्या चित्रपटाने ह्या सर्वच घटनेविषयीच्या असलेल्या गोष्टींचा उलगडा करण्याचा व प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न समाजाने व सरकारने गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. पण भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि लाल बहादूर शास्त्रींना हा देश विसरणार नाही. हा देश जेवढा नेहरू आणि गांधींचा म्हणून ओळखला जातो तेवढाच तो लाल बहादूर शास्त्री यांचा म्हणून ओळखला गेला पाहिजे.