पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणाऱ्या लाला अमरनाथ यांचे भन्नाट किस्से
लाला अमरनाथ (Lala Amarnath) त्यांच्या उत्कृष्ट खेळीसोबतच रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. एकदा तर विजयनगरच्या महाराजांना भर मैदानात त्यांनी घाणेरड्या शिव्या दिलेल्या….
भारतीय क्रिकेटला फार मोठा रोमांचक इतिहास लाभला आहे. मुळात भारतात क्रिकेट आलं ते इंग्रजांमुळे आणि पुढे भविष्यात तर भारतंच क्रिकेटचा विश्वविजेता बनला. आज देखील भारतीय संघ हा क्रिकेटमधील जगज्जेता संघ म्हणून ओळखला जातो. ज्यांच्याकडे क्रिकेटला सुरुवात झाली त्यांच्याकडे देखील एवढ्या प्रमाणात क्रिकेट खेळला जात नसेल, जेवढा भारतात खेळला जातो.
भारताच्या गल्लीबोळात अगदी लहान मुलाला देखील सचिन-तेंडुलकर व्हायची इच्छा असते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अनेक दिग्गज नावं आपण विसरत चाललो आहोत, असंच एक नाव म्हणजे लाला अमरनाथ (Lala Amarnath). भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो भारतीय क्रिकेट संघ तयार झाला त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे लाला अमरनाथ होय.
ते फक्त भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य नव्हते तर पुढे त्यांनी टीम मॅनेजर, टीम कोच आणि अगदी समालोचक म्हणून देखील जबाबदारी पार पाडली. अशा या हरहुन्नरी क्रिकेटरला आज आपण विसरलो आहोत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. चला तर मग आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात कोण आहेत Lala Amarnath.
मित्रांनो प्रत्येक खेळाडू कुठल्यातरी किस्सा मुळे प्रसिद्ध झालेला असतो, म्हणजे सौरव गांगुलीने लाॅर्ड्स वरती इंग्लंडला धूळ चारल्यानंतर टी-शर्ट उतरवलं आणि आज देखील सौरव गांगुलीच्या त्या कृत्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत. ही कृती चुकीचे आहे असा आक्षेप घेण्यात येतो परंतु आजही सौरव गांगुली म्हटलं की आपल्याला तो प्रसंग नक्कीच आठवतो. अशाच काही प्रसंगांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर लाला अमरनाथ यांचे व्यक्तिमत्व सांगणार आहोत.
पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक
1933 मध्ये लाला अमरनाथ यांनी आपल्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात केली मुंबईतील डेक्कन जिमखाना येथे इंग्लंड सोबत असणाऱ्या त्यांच्या पहिल्याच अंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी शतक करून आपलं कर्तुत्व दाखवून दिलं. अगदी वेगवान गोलंदाजाला देखील त्यांनी बेधडक ठोकलं आणि स्पिनरची देखील गय केली नाही. आपण असं देखील म्हणू शकतो कि सेहवाग आणि Lala Amarnath जवळपास सारखेच खेळत असत.
पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक ठोकल्यामुळे लाला अमरनाथ यांचा सगळीकडे दबदबा निर्माण झाला. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणे ही त्याकाळी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. तो सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला परंतु तरीही प्रत्येक ठिकाणी चर्चा मात्र लाला अमरनाथ यांचीच होती.
ड्रेसिंग रूममध्ये Lala Amarnath यांनी संपूर्ण संघासमोर मुलाच्या कानशिलात लगावली
लाला अमरनाथ त्यांच्या रागीट स्वभावासाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रागीट स्वभावाचा प्रसाद अगदी त्यांच्या मुलांनी देखील अनेक वेळा घेतलेला आहे. अमरनाथ यांची तिन्ही मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटविश्वात उतरली. मोहींदर, सुरेंद्र या दोघांनी भारतासाठी टेस्ट क्रिकेट मध्ये योगदान दिलं तर राजेंद्र हे केवळ फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. यातील मोहींदर अमरनाथ हे सर्वात जास्त यशस्वी ठरले, त्यांच्या नावावर 11 आंतरराष्ट्रीय शतक देखील आहेत.
एकदा भारताच्या सराव शिबिरामध्ये खेळत असताना मोहींदर एक शॉट चुकीच्या पद्धतीने परत परत खेळत होता, त्यावेळी लाला अमरनाथ यांनी त्याला दोन-तीन वेळेस कसं खेळायचं समजावून सांगितलं परंतु जेव्हा मोहींदर परत चुकीच्या पद्धतीने शाॅट खेळु लागला तेव्हा बॉण्ड्री वर उभ्या असलेल्या Lala Amarnath यांनी आपल्या मुलाचा सर्व खेळाडू खेळाडू समोर अत्यंत खराब भाषेत शिव्या दिल्या.
इतर खेळाडू देखील लाला अमरनाथ यांना तेव्हापासून घाबरू लागले.असंच त्यांच्या दुसऱ्या मुलांनी देखील या गोष्टीचा अनुभव घेतलेला सांगण्यात येतो, एकदा कुठल्यातरी गोष्टीवरुन लाला अमरनाथ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला संपूर्ण संघासमोर ड्रेसिंग रूममध्ये कानशिलात लगावली होती.
एका ३५ वर्षीय स्पिनरला अचानक संघात स्थान दिलं आणि…
लाला अमरनाथ यांच्या निवड कौशल्याबद्दल देखील अनेक किस्से सांगितले जातात. 1959 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एक टेस्ट सिरीज ठरवण्यात आली होती. ही टेस्ट सिरीज भारतात होणार होती, यातील पहिला सामना तर भारताने गमावला होता आणि दुसऱ्या सामन्यासाठी भारत चांगल्या स्पीनरच्या शोधात होता. यावेळी लाला अमरनाथ यांनी 35 वर्षीय जसू पटेल यांना संधी दिली.
जसू पटेल यांनीदेखील दुसऱ्या सामन्यात तब्बल 14 विकेट घेत स्वतःला सिद्ध केलं आणि लाला अमरनाथ यांचा निर्णय योग्य ठरवला. यातील नऊ विकेट तर जसू पटेल यांनी एकाच पारीत घेतल्या होत्या, अनिल कुंबळे यांच्या दहा वीकेटच्या रेकॉर्ड आधी संपूर्ण भारतीय संघाच्या नावावर एकमेव व जस्सुभाई पटेल यांचाच सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड होता.जसू पटेल यांच्या करिष्मामुळे भारताने तो सामना जिंकला.
विजयनगरच्या महाराजांना शिव्या दिलेल्या
लाला अमरनाथ यांचं कधीच मॅनेजमेंट सोबत जमलं नाही आणि अनेक वेळी त्या लोकांसोबत त्यांचे खटके देखील उडाले. त्यांच्या या स्वभावाचा फटका त्यांच्या मुलाच्या क्रिकेट करियरला देखील बसल्याचं सांगितलं जातं. भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधी 1936 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान टेस्ट सिरीज खेळली गेली होती. या काळात फक्त राजे आणि महाराजे क्रिकेट खेळत असत.
भारतीय संघाचे कर्णधार त्यावेळी विजयनगरचे महाराज होते. त्यांचे आणि Lala Amarnath यांचे कधीच पटले नाही. विजयनगरच्या महाराजांशी मैत्री करण्याचे लाला अमरनाथ यांनी अनेक प्रयत्न केले. या सीरिजमध्ये लाला अमरनाथ यांनी शतक देखील केलं परंतु विजयनगरचे महाराज हे आपल्या साथीदारांशी योग्य प्रकारे वागत नसत.
लाला अमरनाथ यांनी चांगली गोलंदाजी केल्यानंतर देखील त्यांना गोलंदाजीसाठी जास्त संधी देण्यात आली नाही, शतक केल्यानंतर देखील लाला अमरनाथ यांना त्यांच्या नेहमीच्या नंबर वर फलंदाजी करू दिली नाही आणि याच गोष्टीवर चिडून एका सामन्यात लाला अमरनाथ यांचा राग बाहेर आला त्यांनी रागाच्या भरात विजयनगरच्या महाराजांना पंजाबी मध्ये प्रचंड शिव्या दिल्या याचा परिणाम म्हणून लाला अमरनाथ यांना त्या सामन्यानंतर भारतात वापस पाठवण्यात आले.