केवळ ६ महिने पंतप्रधानपद भूषवलेल्या व्यक्तीच्या नावे ‘किसान दिवस’ साजरा केला जातो
भारताच्या इतिहास शेतकऱ्यांचा पंतप्रधान म्हटलं तर केवळ एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे….
यशस्वी माणसं ती नव्हे जी असामान्य काम करतात, यशस्वी ते होतात जे सामान्य काम सुद्धा असामान्य पद्धतीने करतात. हे वाक्य बरेच वेळा आपण वाचलं असेल. आपण आपल्या भूतकाळात अथवा आजूबाजूला नीट निरखून पाहिलं कि, हे वाक्य खरं करून दाखवणारी अनेक मंडळी आपल्याला दिसतात. अशाच एका व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण जरा ओळख करून घेऊया. त्यांचे नाव आहे ‘चौधरी चरण सिंग’. एक कृषीप्रेमी, धोरणी आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून जनसमाजात चौधरी चरण सिंग यांची ओळख आहे.
कोण होते चरण सिंग ?
चौधरी चरण सिंग (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म पिता चौधरी मीर सिंग व माता नेत्रा कौर यांच्या परिवारात, २३ डिसेंबर १९०२ रोजी, उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ येथील नूरपूर या गावी झाला. खूप गरिबी अनुभवून शिक्षण घेतलेल्या चरण सिंग यांनी याच उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली व पुढे भारताचे ५वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केले. राजकारणात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतानाही त्यांनी प्रत्येक वेळी आपले लक्ष गरीब, मजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे ठेवले. म्हणूनच आजही शेतकऱ्यांचे पुढारी म्हणून चरण सिंग प्रत्येकाच्या आठवणीत आहेत.
पार्श्वभूमी
चरण सिंह यांनी नूरपूर गावातूनच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे मॅट्रिक ते मेरठच्या सरकारी शाळेतून उत्तीर्ण झाले. चरण सिंग यांनी विज्ञान, कला क्षेत्रात पदवी मिळवली आणि पुढे ते वकील झाले. एकंदरीतच चरण सिंग यांचे बालपण अत्यंत साधे व गरिबीत गेले. अनेक मजदूर, शेतकरी इत्यादी लोकांच्या सहवासात ते वाढले होते. चरण सिंग यांचे वडील स्वतः शेतकरी होते. कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांची परिस्थिती तेव्हा जशी होती आत्ता सुद्धा तशीच आहे.
आपण जिथे जन्म घेतो, ज्या परिस्थिती मध्ये वाढतो आणि ज्या समाजात राहतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. अश्याच शेतकऱ्यांची गरिबी ,दुःख त्यांच्या समस्या जवळून अनुभवणाऱ्या व मजदूर आणि शेतकऱ्यांमध्ये वाढलेल्या चरण सिंह यांनी पुढे आयुष्यभर शेतकरी आणि मजूर यांच्या हितासाठी प्रयत्न केले.
चरण सिंग यांबद्दल आणखी काही
चरण सिंग (Chara Singh) हे वकील असल्याने गाझियाबाद येथे वकिली करत असत. याचदरम्यान त्यांचा विवाह गायत्रीदेवी यांच्याशी झाला. पण काही माणसं फार वेगळी असतात. त्यांच्या कामापेक्षा काही वेगळेच त्यांना खुणावत असते. असंच काहीसं चरण सिंग यांच्या आयुष्यात झालं. वकिली वगैरे करत असताना त्यांना मात्र खुणावत होती स्वतंत्रता चळवळ. गरिबी, जमीनदार, समाज, या साऱ्यांच्या बंधनात वाढलेल्या चरण सिंग यांना स्वातंत्र्याचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवत होते. शेवटी उजेडाचं महत्व हे अंधारातुन आलेल्या माणसांनाच समजतं.
१९२९ मध्ये चरण सिंग यांनी महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत सुद्धा सिंग यांनी सहभाग घेतला. गांधीजींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेत भाग घेऊन त्यांनी मिठाचा सत्याग्रह सुद्धा केला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली मग त्यांनी स्वतःला स्वतंत्र चळवळीचा एक अविभाज्य भाग करून घेतले.
राजनीतिक आयुष्य
चरण सिंह एक प्रभावी राजकारणी म्हणून गणले जातात. सुरुवातीला त्यांनी काँग्रेस पक्षात पाऊल टाकले आणि एक कुशल व प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून नाव मिळवले. विधानसभेसाठी अनेकवेळा चरण सिंग निवडुन आले होते. त्यांनी राजकारणात अनेक पदभार सांभाळले आहेत. त्यांनी पार्लिमेंटरी सेक्रेटरी पद स्वीकारले, पुढे राज्य, न्याय, कायदे, चिकित्सा अशा विविध गोष्टी सचिव या पदावरून त्यांनी निष्ठेने सांभाळल्या. ते उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले.
१९५२ मध्ये त्यांना उत्तरप्रदेश मधून कृषी खाते सांभाळण्याची संधी मिळाली आणि कृषीप्रेमी असल्याकारणाने त्यांनी ते पद मोठ्या निष्ठेने सांभाळले. पुढे ते भारताचे ५ वे प्रधानमंत्री (5th Prime Minister of India) झाले. परंतु त्यांचा कार्यकाळ ५/६ महिन्यांपर्यंतच मर्यादित राहिला. चरण सिंग यांनी स्वतःच प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
असं म्हंटल जातं कि काँग्रेसच्या दबावामुळे त्यांना अशी कामे करायला भाग पाडलं जात होतं जी त्यांच्या सिद्धांतांविरुद्ध आहेत.
चरण सिंग अतिशय सिद्धांतवादी व्यक्तिमत्व होते, त्यांच्या या सिद्धांतांना धक्का लागेल असे कोणतेही कार्य त्यांनी केले नाही. म्हणूनच त्यांनी प्रधानमंत्रीपद सुद्धा सोडून दिले.
त्यांचे शेतकरी व मजुरांवरील प्रेम नेहमीच दिसून येते. त्यांनी स्वीकारलेल्या प्रत्येक पदावरून त्यांनी शेतकऱ्यांसाठी शक्य तितक्या योजना आखल्या. उत्तरप्रदेशात कार्यरत असताना त्यांनी अनेकवेळा स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. उत्तरप्रदेशच्या ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय होता आणि त्याला सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न सिंग यांनी केले. त्यांच्या अशा सर्वसामान्य राहणीमानामुळे आणि व्यापक विचारांमुळेच ते जनतेत प्रसिद्ध होते. एक राजकारणी यापेक्षा ते एक समाजसेवक म्हणून जनसामान्यांत प्रसिद्ध होते.
चरण सिंग (Chaudhary Charan Singh) स्वतः शेतकरी कुटुंबातील होते, त्यांनी खूप जवळून शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या होत्या. त्यांना जमीनदार, तलाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना होती. यासाठी त्यांनी Zamindari Abolition Bill-1952 हे विधेयक आणले ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या त्रासातून शेतकरी मुक्त होतील. या विधेयकामुळे अनेक तलाठी तसेच अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. हे राजीनामे सिंग यांनी स्वीकारले आणि पूर्णपणे नवीन पदभरती सुरु करून त्यात १८% जागा हरिजनांसाठी राखीव केली. त्यांच्या अशाच कामांमुळे ते सामान्यजनांत प्रसिद्ध होते.
Zamindari Abolition Bill-1952 हे विधेयक आणल्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा त्रास चरण सिंग यांनी कमी केला. म्हणूनच २००१ पासून चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस किसान दिवस (National Farmers Day) म्हणून साजरा केला जातो.
वैयक्तिक आयुष्यात व राजकीय आयुष्यात चरण सिंग अतिशय साधी राहणी अवलंब करत. ‘साधी रहाणी उच्च विचार’ या तत्वावर त्यांचे राहणीमान होते. त्यांच्या राहणीमानातून, कार्यातून आणि बोलण्यातून त्यांचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम व काळजी व्यक्त होत असे. भ्रष्ट्राचाराला त्यांचा नेहमीच विरोध होता त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला बराच आळा बसला होता. गांधीवादी विचारधारेवर चरण सिंग यांचा फार विश्वास होता, त्यांच्या अनेक भाषणांतून हे दिसून येते.
चरण सिंह एक उत्तम पुढारी होतेच. याबरोबरच उत्तम लेखकही होते. ‘अबोलीशन ऑफ जमीनदारी’, ‘इंडियाज पॉवर्टी अँड इट्स सोल्युशन्स’ अशी पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिली.
ते म्हणतात ना कि, थोर माणसं शरीराने मारतात पण, त्यांचे कार्य आणि विचार यामधून ते सदैव जिवंत असतात. त्याचप्रमाणे २९ मे १९८७ रोजी जरी चौधरी चरण सिंग अनंतात विलीन झाले असले तरीही त्यांचे विचार, त्यांची कार्ये आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेले प्रेम सदैव अबाधित आहे.