VK Krishna Menon : नेहरूंचा तो चाणक्य ज्याला अमेरिका सुद्धा घाबरत असे
कश्मीर मुद्द्यावर जेव्हा भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचे प्रयत्न झाले, त्यावेळी VK Menon यांनी संयुक्त राष्ट्रसंघात सलग ८ तास भाषण केलं आणि अमेरिका-पाकिस्तानचे अनेक डाव त्यांनी हाणून पाडले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतासाठी अनेक आघाडीवर संघर्ष केलेला आहे. इतिहास अश्या नेत्या सोबतच त्याच्या सहकाऱ्यांना देखील नेहमीच लक्षात ठेवतो. आज या लेखाच्या माध्यमातून आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात विश्वासू सहकारी ज्यांच्याकडे चाणक्य म्हणून बघितलं जायचं अशा वि के मेनन यांच्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचं प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण जगामध्ये आपल्या नेतृत्वाचा आणि दूरदृष्टीचा प्रत्यय दिलेला आहे. नेहरू सोबतच त्यांचे सहकारी देखील तेवढेच कर्तुत्ववान होते. नेहरूंच्या सहकार्यांमध्ये सर्वात पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे वि के मेनन यांच. असं म्हणतात की संपूर्ण युरोप आणि पश्चिमी देशातील तथाकथित चाणक्य वीके मेनन यांना प्रचंड घाबरत असत. VK Menon यांच्यामुळेच आफ्रिकेमधील साम्राज्यवादाला सुरुंग लागला होता.
असं म्हणतात की त्यांच्या चलाख बुद्धीमुळे त्यांचे अनेक शत्रू देखील होते. मेनन यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींनी वेगवेगळ्या नावाने किताब दिला होता. ब्रिटनचे एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नेते अलेक्झांडर लेक्टरबक यांनी वि के मेमन यांना नेहरूंचा Evil Genius असं म्हटलं होतं, तर हेराॅल्ड मैकमिलन यांनी त्यांना हैरी हाॅप्किंस (अमेरिकेच्या राष्ट्रपती रुजवेल्ट यांचे विश्वस्त सल्लागार) असे नाव दिले होते. तर अमेरिकेतील सत्ताधारी त्यांना Poisonous Bastard असं म्हणत असत.
असं म्हणतात की 1947 पासून ते 1964 पर्यंत भारताच्या परराष्ट्र नीतीवर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रत्येक वाटचालीवर वि के मेनन यांचा प्रभाव होता. आपल्या सर्वांना माहिती आहे की Pandit Jawaharlal Nehru हे साम्यवादाचे पुरस्कर्ते होते, मेनन यांनी लंडन मध्ये शिक्षण घेत असतानाच साम्यवादाचे देखील धडे गिरवले होते. लंडन मध्ये राहून देखील त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. याच संघर्षाच्या काळात त्यांची आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट झाली नेहरूंना याच भेटीत मेनन यांची विद्वत्ता समजली होते. त्यामुळेच त्यांनी हे ठरवलं होतं की स्वतंत्र भारतात मेनन यांना मोठी जबाबदारी द्यायला हवी.
स्वातंत्र्यानंतर लगेचच नेहरूंनी VK Menon (Vengalil Krishnan Krishna Menon) यांना लंडनचा हायकमिशनर म्हणून जबाबदारी दिली. या जबाबदारीमुळे त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपलं लक्ष केंद्रित केलं. या काळात त्यांनी कोरिया वार, सुएज कालवा, तैवान नहर इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये स्वयंघोषित मध्यस्थ म्हणून जबाबदारी स्वीकारत हे प्रश्न मार्गी लावण्यास मदत केली. शीत युद्धादरम्यान त्यांच्यावरती अनेक राष्ट्रांची करडी नजर होती.परिणामी त्यांचे अनेक शत्रू तयार झाले होते.
1951 मध्ये इंग्लंड मधून त्यांना परत भारतात बोलावण्यात यावे असा प्रस्ताव देखील इंग्लंडने नेहरूंकडे ठेवला. कश्मीर मुद्द्यावर जेव्हा भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचे प्रयत्न झाले, त्यावेळी देखील वि के मेनन यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये तब्बल ८ तास भाषण घेऊन भारताची बाजू मांडली होती. या भाषणानंतर त्यांना थकव्यामुळे चक्कर आली होती.
जेव्हा काश्मीर मुद्द्यावर अमेरिकेने पाकिस्तानला साथ दिली तेव्हा रशियाला भारताची मदत करण्यासाठी वि के मेनन यांनीच तयार केलं होतं.
त्यांच्या 1957 मधील संयुक्त राष्ट्रातील भाषणामुळे त्यांना “हिरो आॅफ काश्मीर” असे देखील म्हटले जाते. त्यावेळी अमेरिकेला काश्मीर प्रश्नी जनमत चाचणी घ्यायची होती परंतु वि के मेनन यांनी हा डाव पूर्ण होऊ दिला नाही. मेनन यांचं आपल्या राष्ट्रापती प्रचंड प्रेम होतं त्यामुळेच इंग्लंड मध्ये हायकमिशनर असताना देखील ते फक्त एक रुपया पगार घेत असत, काही काळाने त्यांनी तो पगार घेणे देखील बंद केल.
1957 च्या दरम्यान नेहरूंनी मेनन यांना भारतात परत बोलावलं आणि इलेक्शन नंतर त्यांना संरक्षण मंत्री ही जबाबदारी सुद्धा देण्यात आली. परंतु यावेळी मात्र चीनच्या मुद्द्यावर मेनन यांनी मोठी चूक केली. तत्कालीन सेनाध्यक्ष के सी थिमय्या आणि मेनन यांच्यात नेहमीच मतभेद होत असत आणि चीनने याच मतभेदाचा फायदा उचलला, भारताचं मोठं नुकसान झालं. चिनी सीमेवर जेव्हा हालचालींना वेग आला तेव्हा सेना अध्यक्षांनी भारतीय सैन्याला तयार राहण्याची ताकीद दिली परंतु यावेळी V.K. Krishna Menon यांचं असं म्हणणं होतं की भारताला पाकिस्तान पासून धोका आहे, चीन पासून नाही.
त्यावेळी भारताला आधुनिक हत्यारांची गरज होती त्यामुळे सेना अध्यक्षांनी मेनन यांच्याकडे बेल्जियम रायफल्स ह्या आधुनिक बंदुकीची मागणी केली, पण मेनन यांनी नकार दिला. मेनन यांनी नंतर पूर्व भागातील जबाबदारी लेफ्टनंट जनरल कौल यांच्याकडे सुपूर्त केली आणि यामुळे नाराज झालेल्या थिमय्या यांनी नेहरूंकडे राजीनामा प्रस्तुत केला. नेहरूंनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं परंतु त्यांच्या मुद्द्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांना मेनन यांच्या वरती विश्वास होता पण सीमेवर चीनच्या कारवाया वाढतच होत्या. यामुळेच काँग्रेस आणि जनतेमध्ये मेनन यांच्याबद्दल दोष उत्पन्न होऊ लागला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जनतेतून येऊ लागली.
1961 मध्ये सेनाध्यक्ष थिमय्या रिटायर झाले आणि 1962 च्या ऑक्टोबर मध्ये चीनने भारतावर हल्ला केला. मेनन यांच्या चुकीच्या रणनीतीमुळे भारताला या युद्धात मोठे नुकसान सहन करावं लागलं. संसदेला शांत करण्यासाठी नेहरूंनी तत्कालीन सेनाध्यक्ष थापर यांच्याकडून राजीनामा घेतला परंतु थापर यांचा राजीनामा घेऊन संसदेतील रोष शांत होऊ शकला नाही. संपूर्ण देशाने जेव्हा मेनन यांच्या राजीनाम्याची मागणी केली तेव्हा हतबल होऊन नेहरूंनी त्यांचा देखील राजीनामा घेतला.
कुलदीप नैय्यर याच्या ‘Beyond The Lines’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे एका पत्रकाराने जेव्हा V.K. Krishna Menon यांना युद्धा संबंधी प्रश्न विचारला तेव्हा मेनन म्हणाले,
“काही रहस्य माझ्या सोबतच संपायला हवीत कारण जर मी बोललो तर नेहरूंवर आरोप होतील आणि माझ्या निष्ठेमुळे मी त्या गोष्टी बोलून देखील दाखवू शकत नाही.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण 1974 मध्ये सर्व रहस्य सोबत घेऊन त्यांनी आपला देह सोडला. संपूर्ण जगामध्ये नावलौकिक करून देखील भारतात त्यांना मोठ्या प्रमाणात अपमान आणि पराभव स्वीकारावा लागला हे त्यांच्या जिव्हारी लागलं होतं.