विमान अपघातातून बचावल्यानंतर नेताजींनी ‘गुमनामी बाबा’ ही ओळख धारण केली होती का ?
ब्रिटिशांच्या छळाने झाला नेताजींचा मृत्यू ? फ्रेंच सिक्रेट सर्व्हिस नुसार नेताजी जिवंत होते ? नेताजीच होते गुमनाम बाबा ? काय आहे नेताजींच्या मृत्यूमागचं गूढ ?
भारतीय प्रशासकीय सेवेची गडगंज पगाराची नोकरी सोडत देश सेवेकडे वळणारे, पोलीसांना चकवा देऊन नजकैदेतुन बाहेर पडत पेशावरमार्गे बर्लिनला जाणारे, सिंगापूर येथे भारताचे अस्थायी सरकार स्थापन करणारे, आझाद हिंद सेनेला ‘चलो दिल्ली’ चा नारा देत ब्रिटिशशासित भारतावर आक्रमण करत आसामच्या कोहिमावर तिरंगा फडकविणारे, अहो एवढंच काय तर “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा” अशी गर्जना करत स्वातंत्र्य लढ्यात नव्याने प्राण फुंकणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आजही आपल्या हृदयात स्थान टिकवून आहे.
नेताजींचे आयुष्य जेवढे खडतर आणि आव्हानांनी भरलेले होते तेवढाच त्यांचा मृत्यूदेखील रहस्यमय आणि गूढ होता. १८ ऑगस्ट १९४५ रोजी सिंगापूरहून जपानकडे निघालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आजही नेताजींच्या मृत्यूवरील संशयाचे ढग अनेकांच्या मनात कायम आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात सायक सेन नावाच्या व्यक्तीने सुभाषचंद्र बोसांनी विमान अपघातातून बचावल्या नंतर गुमनामी बाबा ही ओळख धारण केली होती का ? अशा आशयाचा माहितीचा अधिकार दाखल केला. त्यात असेही विचारण्यात आले की १८ ऑगस्ट १९४५ च्या घटनेनंतर नेताजींचा ठावठिकाण्याबद्दल माहिती आहे का ? यावर गृह मंत्र्यालायाने असे उत्तर दिले की विविध आयोगांच्या अहवालांचा निष्कर्ष आहे की नेताजींचा मृत्यू १९४५ च्या दुर्घटनेतच झाला. मात्र सरकारच्या त्या उत्तरानंतर देखील आजही त्यांच्या मृत्युभवती असलेलं शंकेचं वावटळ थांबलेलं नाही.
नेताजींच्या मृत्यबद्दल आजपर्यंत मोठ्या प्रमाणात चर्चिलेल्या काही घटना –
ब्रिटिशांच्या छळाने झाला नेताजींचा मृत्यू ?
निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी आपल्या ‘बोस – द इंडियन समुराय अँड द आयएनए मिलिटरी असेसमेंट’ या पुस्तकात असा दावा करतात की “नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. ती एक अफवा/थियरी होती जी जपानच्या इंटेलिजन्स एजंसीने जाणीवपूर्वक पसरवली होती जेणेकरून नेताजींना सोविएत युनिअनमध्ये सुरक्षितपणे निसटता यावं”
नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही, याचे अनेक अखंडणीय पुरावे असल्याचे सांगत जनरल बक्षी या गोष्टीवर जोर देतात की नेताजींनी तत्कालीन सोविऐत राजदूत जॅकोब मलिकच्या साहाय्याने आझाद हिंद सरकारचे दूतावास टोकियो मध्ये स्थापन केले होते. त्याचबरोबर जपानमधून निसटल्यानंतर नेताजी तेथे गेले देखील. त्यांनी सायबेरिया मधून तीन रेडिओ प्रसारणे केल्यावर बोस सोविएत रशियातून निसटल्याचे ब्रिटिशांना कळाले. त्यानंतर ब्ब्रिटिशांनी सोविएत अधिकाऱ्यांकडे जाऊन नेताजींची चौकशी करू देण्याची मागणी केली आणि याच चौकशीमध्ये नेताजींचा छळाने मृत्यू झाल्याचे जनरल बक्षी सांगतात.
नेताजीच होते गुमनाम बाबा ?
नेतांजींच्या मृत्यूबाबत सर्वात जास्त गाजली ती म्हणेज गुमनाम बाबाची कहाणी. १६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादमध्ये गुमनाम बाबा नावाने ओळखल्या जाणाऱ्या साधूचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर हा बाबा दुसरा तिसरा कोणी नसून नेताजी सुभाषचंद्र बोसचं होते असे दावे करण्यात आले. असं म्हंटलं जात की १९९९ साली नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एका न्यायाधिशानेच गुमनामी बाबाची गोष्ट सार्वजनिक केली होती.
या गुमनामी बाबाच्या गोष्टीबाबत नेताजींचे नातू खासदार सुगाता बोस यांना विचारले असता ते म्हणाले की “या विचित्र गोष्टीवर विश्वास ठेवण्यासारखा कोणताही पुरावा नाही”. नोव्हेंबर १९८५ रोजी जनमोर्चा नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्राला एक बेनामी पत्र मिळाले. या बेनामी पत्रानुसार हा गुमनामी बाबा म्हणजे नेताजी नसून गायत्री भवन येथे पंडित ब्रह्मदेव यांची हत्या करून गायब झालेले के.डी. उपाध्याय होते.
फ्रेंच सिक्रेट सर्व्हिस नुसार नेताजी जिवंत होते ?
पॅरिस स्थित इतिहासकार जेबिपी मोर फ्रेंच सिक्रेट सर्विसच्या अहवालांचा दाखला देत एकदा म्हणाले होते की नेताजी १९४७ पर्यंत जिवंत होते. त्या रिपोर्ट मध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की नेताजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे माजी प्रमुख होते त्याचबरोबर हिकरी किकान नावाच्या एका जापनीझ संघटनेचे सदस्य देखील होते. भारत आणि ब्रिटिशांनी नेहमीच या गोष्टीवर जोर दिला की नेताजींचा मृत्यू हा विमान अपघातात झाला. मात्र फ्रेंचांनी ही गोष्ट मानली नाही.
१९४५ मधील विमान दुर्घटनेनंतर या आणि अशा अनेक प्रकारच्या कहाण्या नेताजींबद्दल सांगितल्या जातात की नेताजींनी मृत्यूला कशी हुलकावणी दिली आणि अज्ञातवसात राहून कसे आपले जीवन व्यतीत केले किंवा त्यांचा मृत्यू कसा झाला. काही लोक म्हणतात की नेताजींनी उत्तर प्रदेशात एक संन्यासी म्हणून जीवन व्यतीत केले तर काही म्हणतात ते आसामच्या नागहील भागात राहिले. एवढंच नाही तर नेताजी रशियामध्ये, चिनी सैन्यात, जर्मनीत, महात्मा गांधींच्या अंत्यसंस्कारावेळी दिसल्याचे सुद्धा काही लोक सांगतात.
अनेक वर्षे नेताजींच्या मृत्यूवरून सुरु असलेल्या चर्चांमध्ये १९४५ नंतर नेताजी व्यक्तीशः दिसल्याची काही चित्र सुद्धा प्रकाशित झाली. मात्र ती हे सिद्ध करण्याइतपत ठोस नव्हती की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही.