जर्मनीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत सावरकरांनी सगळ्यांना भारतीय ध्वजासमोर झुकायला भाग पाडलेलं
सावरकरांनी इंग्लंडमध्ये जाऊन एक चळवळ उभी केलेली आणि ह्याच्या माध्यमातूनच १९०७ साली सावरकरांनी आणि मादाम कामा यांनी एक अशी घटना घडवून आणली ज्यामुळे जर्मनीतील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत इतर देशांच्या प्रतिनिधींना भारतीय ध्वजा समोर झुकायला भाग पाडलेलं
ने मजसी ने परत मातृभूमीला… सागरा प्राण तळमळला ! या कवितेच्या ओळी आपण सहसा विसरू शकत नाही. या ओळी वाचल्या, कानावर आल्या कि डोळ्यासमोर एक गोल चष्मा, डोक्यावर गोल टोपी, परखड व बेधडक स्वभाव असलेले एक व्यक्तिमत्त्व दिसते, याच व्यक्तिमत्त्वाने या काव्याची निर्मिती केली आहे. होय तुमच्या लक्षात आलं असेल कि आपण बोलतोय विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल.
२८ मे १८८३ रोजी भगूर, महाराष्ट्र येथे दामोदर व राधाबाई सावरकर यांच्या घरी मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव ठेवले विनायक… विनायक दामोदर सावरकर. सावरकरांना अजून २ भाऊ व एक बहीण असा परिवार होता. सावरकर लहान असतांनाच त्यांचे आई वडील वारले आणि मग सगळी जबाबदारी त्यांचा मोठा भाऊ गणेश सावरकर यांच्यावर आली आणि त्यांनी ती उत्तमरीत्या निभविली.
लहानपणापासूनच सावरकरांनी जातीय दंगे पहिले होते, या सगळ्याचा त्यांच्या मनावर परिणाम होत होता, इतर मुलांपेक्षा त्यांचे वेगळेपण जाणवत होते, सावरकर लहान वयातच मोठ्यांनाही सुचणार नाहीत इतक्या सुंदर शब्दांत कविता करीत होते, त्यांच्या मनात क्रांतीचे बीज पेरले जात होते, अशातच ते शिक्षणासाठी फर्ग्युसन विद्यालय, पुणे येथे आले आणि येथूनच जहाल मतवादी लोकमान्य टिळक यांचा प्रभाव सावरकरांवर पडला.
चळवळ
पुण्यामध्ये डिग्री घेत असतांनाच सावरकरांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग झाला होता. पुढे पुण्यातील शिक्षण पूर्ण करून ते वकिलीच्या शिक्षणासाठी इंग्लंड येथे रवाना झाले. वकीलीसाठी इंग्लंडच्या कॉलेजात शिकत असतांनाच त्यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत इंग्लंड मध्ये शिकत असणाऱ्या अनेक तरुणांना एकत्र आणले आणि भारत स्वतंत्र व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले.
इतक्यावरच सावरकर थांबले नाहीत. त्यांना सतत वाटत होते कि फक्त भारतालाच नाही तर साऱ्या जगातील लोकांना हे जाणवले पाहिजे कि स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यानुसार ब्रिटिशांनी देखील भारतावर राज्य करून कशा प्रकारे भारताचे प्रचंड नुकसानच केले आहे आणि भारताला स्वातंत्र्याचा अधिकार आहे हे देखील त्यांना जगात पोहोचवायचे होते. या मार्फत विविध देशांचा पाठिंबा आपल्याला मिळेल असा त्यांचा विश्वास होता. यामुळेच त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे स्वातंत्र्य हा विषय कसा आणता येईल याचा विचार केला.
त्यावेळी वर्तमानपत्र हे माहिती, विचार आणि क्रांती पोहोचविण्याचे महत्त्वाचे साधन होते, याचाच वापर सावरकरांनी करायचा ठरविला आणि वर्तमानपत्रात आपले काही लेख लिहिले. हे लेख सर्वप्रथम गेलिक अमेरिकन या वृत्तपत्रात छापून आले. आयरिश देशभक्तांकडून हे वर्तमानपत्र न्यू यॉर्क येथे सुरु होते. या वर्तमानपत्रात सावरकरांनी लेख लिहिले.
त्यांचा मूळ हेतू होता कि जगाला भारताच्या समस्यांचे चित्र दिसावे, यामुळे त्यांच्या लिखाणातून त्यांनी भारतापुढे असणाऱ्या आव्हानांची चर्चा केली, भारतावर ब्रिटिशांकडून होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केले आणि भारताला असलेल्या अनेक प्रश्नांची ओळख त्यांनी याद्वारे करून दिली. इतके करून ते थांबले नाहीत, त्यांनी याच लेखांची पोर्तुगीझ, रशियन, फ्रेंच व जर्मन भाषांतरे केली व त्या देशांमध्ये सुरु असणाऱ्या वर्तमानपत्रांमध्ये हे लेख प्रसिद्ध केले. यामुळे भारतापुढे काय समस्या आहे याची जाणीव प्रमुख देशांना आणि तेथील देशवासीयांना करून देण्यात आली.
त्यांना ठाऊक होते कि जग आपल्यापेक्षा प्रगत होत आहे, म्हणून आपल्याला भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांची मदत घेणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी अनेक आयरिश, चायनीज, तुर्किश अशा देशातील अनेक माणसांशी संबंध जोडले आणि त्यांच्याकडून अनेक क्रांतिकारी कल्पना, डावपेच, तंत्रज्ञान शिकून घेतले. स्वातंत्र्यासाठी सर्व भारतीय समाज एक होणे गरजेचे आहे यासाठी त्यांनी गुरुमुखी भाषेत अनेक पत्रके लिहून भारतातील शीख सैनिकांमध्ये भारताबाहेर राहून सुद्धा पोहोचविली. याद्वारे शीख बांधवाना सुद्धा देशभक्तीने पेटून उठण्याचा संदेश त्यांनी दिला.
मादाम कामा आणि भारताचा ध्वज
यानंतर त्यांनी भारताच्या समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे अजून पुढचे पाऊल उचलले. जर्मनी मध्ये स्ट्र्युटाग्रँट येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरविण्यात येत होती. या मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून मादाम कामा आणि सरदारसिंग राणा यांची निवड झाली. त्यांना अनेकवेळा विरोध झाला परंतु यांनीही शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर त्यांना प्रवेश मिळाला.
सावरकर आणि मादाम कामा यांनी तेव्हा भारताचा ध्वज तयार केला होता. तो ध्वज घेऊन आपली हि मंडळी या परिषदेला उपस्थित होती. हि परिषद २२ ऑगस्ट १९०७ रोजी भरविण्यात आली.
या परिषदेच्या व्यासपीठावरून, “हिंदुस्तानवरील ब्रिटिशांची पकड हि देशाच्या प्रगतीसाठी हानीकारक असून जगभरातील स्वातंत्र्यप्रेमी लोकांनी भारताला गुलामगिरीतून मुक्ती देण्यास सहकार्य करावे”, असा ठराव मादाम कामा मांडणार होत्या.
या गोष्टीला ब्रिटिशांनी विरोध दर्शविला व फक्त भाषण करण्याचीच मुभा मादाम कामा यांना देण्यात आली. मिळलेल्या संधीचा लाभ घेऊन मादाम कामा व्यासपीठावर भाषण करू लागल्या.
मादाम कामा यांनी भाषण केले, आणि अखेर त्यांनी भारताचा ध्वज त्या परिषदेत पहिल्यांदा फडकविला, समोर असलेल्या प्रतिनिधींना तो ध्वज दाखवत त्या म्हणाल्या,
“अनेक हुतात्म्यांनी या देशासाठी प्राण दिले आणि त्यांच्याच रक्ताने हा ध्वज पवित्र झाला आहे, हा भारताचा ध्वज आहे, मी आपणाला आव्हान करते कि कृपया आपण सर्वानी उठून या ध्वजाला वंदन करावे”, असे म्हंटल्याबरोबर समस्त प्रतिनिधींनी उभे राहून ध्वजाला वंदन केले.
मादाम कामा यांच्या भाषणाने सारेच प्रभावित झाले. यामुळे भारतासाठी स्वातंत्र्य गरजेचे आहे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून जगभरात पोहोचला. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय काँग्रेसने याला पाठिंबा सुद्धा दर्शविला. जर्मनीच्या कैसर यांनी असे देखील नमूद केले कि, ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देणे हि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी खूप महत्त्वाचे ठरेल’.
अशा प्रकारे सावरकरांना जे हवे होते ते घडले. त्यांनी घडविले, त्यांना मादाम कामा आणि अशा अनेकांची उत्तम साथ लाभली. भारताला स्वातंत्र्य मिळावे हि बाब आंतरराष्ट्रीय राजकारणात सावरकरांनी आणली. या नंतरही सावरकर स्वस्थ नव्हते. त्यांचा प्रवास निरंतर चालू होता, भारतभूमीला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडविण्याच्या विविध वाटा शोधण्यासाठी…