भारतीय सैन्याच्या एका ‘जुगाड’ मुळे चीन लदाख जिंकू शकला नाही, अन्यथा…
चीनचा चुशुल क्षेत्रावर वाकडा डोळा होता, कारण हे क्षेत्र मिळविले की लेह-लडाख जिंकण्याचा मार्ग सुकर होत होता. आपण जर हे क्षेत्र चीनला हरलो असतो तर आजचा भारताचा नकाशाच खूप वेगळा असता
१९६१-६२ चा काळ, त्या काळाबद्दल माहीत असलेल्या भारतीयांना, विशेषतः सैन्यातील प्राणपणाने लढणाऱ्या जवानांना त्या आठवणी कदाचित नकोशाच असतील. भारत-चीन युद्ध (India China war) आणि भारताचा झालेला पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला, नेहरुंना देखील तो सहन झाला नाही. पण कुठल्याही युद्धात संपूर्ण पराभवच होतो असं नाही. पराजित पक्ष वा देशाकडे त्यांचा विजयाचा असा एक क्षण असतो. ह्या युद्धात भारताचेही असे काही क्षण होते जिथे चीनला जशाच तसे उत्तर मिळाले.
चुशुल (Chushul) हा लदाखचा एक भाग. चीनचा ह्या क्षेत्रावर वाकडा डोळा होताच, कारण हे क्षेत्र मिळविले की लेह जिंकण्याचा मार्ग सुकर होत होता. आपण जर हे क्षेत्र चीनला हरलो असतो तर आजचा भारताचा नकाशाच खूप वेगळा असता आणि तो आपल्याला बघवल्या गेला नसता. पण आपल्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी लढवलेली शक्कल आणि धैर्य व त्यांची इच्छाशक्तीच्या जोरावर भारताने चुशुलचा आपला किल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळविले.
चीनने ह्या भागात त्यांचे रणगाडे उतरवले. त्यांच्याशी दोन हात करायला भारतीय लष्कराने AMX-13, ह्या रणगाड्यांची मागणी केली. पण खरा पेच तर पुढे होता. डोंगरांच्या मधून जाणारा स्पंगगुर गैप हा चीन आणि भारताला जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्या रस्त्यानेच चीनला ह्या भागात शिरकाव करण्याची संधी होती. लदाख मार्गे हे रणगाडे चुशुल पर्यंत नेणारे मार्ग युद्ध परीस्थितीमुळे बंद होते. ह्या रणगाड्यांना विमानाने चुशुल क्षेत्रात आणणे हा एकच उपाय भारतीय सैन्यासमोर होता. पण हे आव्हान सोपे नव्हते. युद्धजन्य परीस्थितीत बलाढ्य चीन (China) चा सामना तो देखील डोंगराळ भागात करायचा होता.
भारतीय वायुसेनेला (IAF) ह्या कामासाठी पाचारण करण्यात आले. वायुसेनेने सगळी तयारी केली पण त्यांच्यासमोर दोन तांत्रिक अडचणी होत्या. पहिली म्हणजे हे रणगाडे भारतीय वायुसेनेच्या ए.एन.- १२ ह्या हवाई जहाजात चढवणे, कारण रणगाडे चढवत असतांना, रणगाड्यांच्या वजणाने विमानाचा मागचा भाग दाबला जात होता. दुसरी समस्या म्हणजे रणगाड्यांची चाके असलेले लोखंडी पट्टे हवाई जहाजाच्या ॲल्युमिनियमच्या पृष्टभागावरुन घसरत होते परिणामी हा पृष्ठभाग फाटण्याचा धोका होता. युद्ध चालू असतांना असे नुकसान होऊ देणे भारताला परवडणारे नव्हते. ही हकीकत मार्शल पी.सी. लाल ह्यांनी “My years with IAF” ह्या आपल्या पुस्तकात नमूद केली आहे. ह्या दोन्ही समस्यांवर उपाय शोधायचा होता.
लेफ्टनंट कर्नल गुरबचन सिंग (Lt Col Gurbachan Singh) यांनी ह्या समस्येवर एक डोकं लावून देसी जुगाड काढला. त्यांनी स्थानिक सुतारांना विमानाच्या पृष्ठभागात बसतील अशी हुबेहूब मापाची फळी तयार करण्याचे काम दिले. ज्यामुळे रणगाडे न निसटता विमानत प्रवेश करु शकत होते. अशा प्रकारे विमानाच्या पृष्ठभागाला इजा न होता रणगाडे आत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. रणगाडे विमानात प्रवेश करताना त्यांचे प्रचंड वजन विमान कसे पेलु शकेल हाच प्रश्न समोर उरला होता. तिथेही सुतारांची साथ लाभली. सुतारांकडुन लाकडी चाप बनवून घेण्यात आले आणि ते विमानाच्या अंगाला लावण्यात आले. दाब सहन करता यावा यासाठी चाप आणि विमानाच्या अंगा दरम्यान वाळूचे पोते ठेवण्यात आले आणि काय आश्चर्य, ह्या क्लृप्त्या यशस्वी ठरल्या.
आता हे एवढं वजन घेऊन झेप घ्यायची म्हणजे विमानतले बाकीचे वजनदार घटक काढावे लागणार होते नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. त्यासाठी Indian Army ने रणगाड्यांचा दारुगोळा काढून टाकण्याचे ठरवले. वायुसेनेने विमानातील १० टन वजन त्याआधीच कमी केले होते, तसेच आवश्यक तेवढेच इंधन विमानाच्या टाकीत शिल्लक ठेवण्याचे ठरविले. रणगाड्यांची बंदुके देखिल काढुन घेण्यात आली. यामुळे बरेच वजन कमी करण्यात सेनेला यश आले.
आता ह्या पुढचे आव्हान होते ते म्हणजे अवजड असलेले रणगाडे प्रत्यक्ष विमानामध्ये विना अडचण चढवण्याचे. ह्या साठी सैन्यदलातील 3 सैनिकांची गरज होती. एक रणगाडा चालविण्यासाठी, दुसरा त्या चालकाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तिसरा ह्या सगळ्याकडे लक्ष देण्यासाठी. Indian Air Force ला २४ ऑक्टोबर १९६२ रोजी रोजी ह्याचा सराव करुन दाखवण्यात आला आणि वायुसेनेचा विश्वास बसल्यावर अखेर दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष रणगाडे विमानात चढविण्याचा निर्णय अंमलात आणायचे ठरले.
ह्यात अजुन एक समस्या निर्माण झाली. जी तुकडी हे काम प्रत्यक्षात करणार होती त्यातील चालकाला त्याच्या घरुन असा निरोप आला की त्याची पत्नी जी गरोदर होती ती लवकरच एका बाळाला जन्म देणार होती आणि त्याचे तिथे उपस्थित असणे महत्वाचे होते. त्याने वरिष्ठांकडे रजेची विनंती केली. वायुसेनेला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा ते निराश झाले. त्याला पर्याय म्हणुन दुसरा सैनिक होता पण एकत्र काम केलेल्या तुकडीत बाहेरची व्यक्ती आली की काम तडीस जाणार नाही असे भारतीय वायुसेनेला वाटले. वायुसेनेची भिती रास्त होती.
अखेर चालक न बदलण्याचा निर्णय झाला. लेफ्टनंट कर्नल गुरबचन सिंग यांनी आर्मीचे डॉक्टर त्या चालकाच्या पत्नीच्या उपचारासाठी पाठविले व इतरही सर्व व्यवस्था केली. डॉक्टरांनी योग्य उपचार केले आणि त्या चालकाच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि डॉक्टरांनी तिचा आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा एक फोटो काढला. इकडे ह्या तिघांच्या तुकडीने रणगाडे सुखरुप विमानात चढविण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले. ही मोहीम फत्ते करुन आल्यावर त्या चालकाला त्याच्या पत्नीचा व नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा फोटो बक्षीस म्हणून देण्यात आला व त्याची रजा मान्य करण्यात आली.
२४ ऑक्टोबरच्या रात्री पहीला रणगाडा विमानामध्ये यशस्वीपणे चंदीगडला चढविण्यात आला व २५ ऑक्टोबरच्या सकाळी तो Chushul ला सुमुद्र सपाटीपासून १५०० फुट उंचीवर उतरविण्यात आला आणि त्याच रात्री दुसरा रणगाडा देखील चढविण्यात आला व २६ ऑक्टोबरच्या रात्री चुशुलला उतरविण्यात आला. विमानामध्ये पुरेसे इंधन भरता आले नाही. त्यात चुशुल सारख्या थंड प्रदेशात विमानाला उतरण्यापुर्वी आपले इंजिन तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी चालू ठेवावे लागत असे आणि परत चंदीगडकडे रवाना होण्यासाठी पुरेसे इंधन राहावे म्हणून युद्धभुमिवर १५ मिनीटांपेक्षा जास्त काळ थांबताही येत नसे. त्यामुळे ह्या १५ मिनिटातच रणगाडे उतरविण्याचे जिगरीचे काम करावे लागले.
इतिहास पहील्यांदाच शत्रूच्या नाकाखाली आपण इतके मोठे रणगाडे विमानाने आणले. ह्या रणगाड्यांनी भारतीय लष्कराच्या चुशुल मधील तुकडीचे मनोधैर्य नक्कीच वाढविले आणि त्यांनी चिनी आक्रमणाला तोडीस तोड उत्तर दिले.
हे हि वाचा –