१०० कोटींचा गल्ला जमवणारा मिथुनदा भारताचा पहिला सुपरस्टार होता
नक्षलवादी ते बॉलिवूड : मिथुनदाची संघर्षमय कहाणी
बॉलिवुड सुपरस्टार्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतो गोरा चिट्या वर्णाचा, चांगली नाकी डोळी असलेला देखणा हिरो. राजेश खन्ना आपला पहीला सुपरस्टार. गोरा, रोमॅन्टिक अंदाजाच्या ह्या हिरोच्या अदा पाहताच मुली घायाळ होत असत. पण सुर्य म्हटला की सुर्यास्त आलाच ह्या नियमाने राजेश खन्ना नावाच्या सुर्याचा अस्त आणि ॲंग्री यंग मॅन अमिताभ नावाच्या सुर्याचा उदय झाला. पण बॉलिवुडचा असा एक टप्पा आला की जिथे अमिताभच्याच बरोबर तुलनेत सुपरस्टार सारखं व्यक्तीमत्त्व नसलेला, कृष्णवर्णाचा एक जेमतेम दिसणारा मुलगा उदयास आला. तो म्हणजे गौरंग चक्रवर्ती उर्फ मिथुन चक्रवर्ती ज्याला आपण मिथुन दा नावाने ओळखतो.
पदार्पणातच अभिनयाचा थेट राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा हा फार कमी कलाकारांपैकी एक. “मृगया’ ह्या मृणाल सेन दिग्दर्शित सिनेमातल्या अभिनयाने त्यांना (Mithun Chakraborty) पहील्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ह्या मुलाने बऱ्याच दिग्गजांना आपली दखल घेण्यास भाग पाडले.
नक्षलवादी ते अभिनय
१६ जुन १९५०, ला तेव्हाच्या पूर्व बंगाल ह्या प्रांतात असलेल्या बरीसाल गावात त्यांचा जन्म झाला. कलकत्ताच्या स्कॉटीश चर्च कॉलेज मध्ये त्यांनी रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. पण तरीही काही परीस्थितीमुळे (ज्या बद्दल मिथुन दा फार बोलु इच्छित नाही), ते चक्क नक्षलवादी झाले आणि ह्याच दरम्यान त्यांच्या सख्या भावाचा एका भयंकर अपघातात मृत्यू झाला आणि मिथुन दा चे घर हादरुन गेले. नक्षली छावणी सोडून मिथुन दा आपल्या घरी परतले तेही त्यांच्या स्वतःच्या जिवाला धोका असतांना. आता त्यांनी घरासाठी काहीतरी करण्याचे ठरविले. खरंतर आपण फिल्म स्टार होवू असे त्यांना कधीही वाटले नाही. “मी ठरवुन नट बनलो नाही तर परीस्थितीमुळे नट बनलो.” असे ते आपल्या प्रत्येक मुलाखतीत सांगतात.
वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी कलकत्ता सोडले, आणि पुण्यात आले कारण कुणीतरी त्यांना फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया बद्दल सांगितले आणि ह्या संस्थेत ते भरती झाले. त्यांनी तिथे आपले अभिनयाचे आणि चित्रपटाचे धडे गिरवले आणि त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरु झाला. “मृगया” प्रदर्शित झाला त्या १९७६ सालीच त्यांची छोटी भूमिका असलेला “अंजाने” हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानंतर १९७८ मध्ये “फुल खिले है गुलशन गुलशन” ह्या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली. पण त्यांच्या वाट्याला मोठा सिनेमा आला नव्हता. त्यांना तशी अपेक्षाही नव्हती. कारण आपण फार फार तर मुख्य खलनायक पर्यंत मजल मारु असे त्यांना त्यांच्या रंगामुळे वाटे.
Mithun Chakraborty यांचा स्ट्रगल
आपल्या स्ट्रगलच्या काळात ते एकदा दिग्दर्शक मनमोहन देसाई ह्यांच्याकडे काम मागण्यासाठी गेले असताना त्यांना केवळ १० रुपये देवून देसाईंनी मिथुन दांना जायला लावले. कुणालाही हा अपमान वाटेल पण मिथुन दा म्हणतात की मनमोहन देसाईंकडे त्यांना द्यायला काहीच काम नव्हते म्हणून त्यांनी दहा रुपये दिले आणि मिथुनदाच्या पाठीमागे ते नेहमी इतरांना सांगत की “बघा, एक दिवस हा मुलगा खूप मोठा माणूस बनेल” आणि ते खरे झाले.
“मेरा रक्षक” नावाचा सिनेमा १९७८ साली आला आणि तो त्यांचा पहिला व्यावसायिकरीत्या यशस्वी सिनेमा ठरला. या सिनेमानंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांना मुख्य भूमिका असलेले सिनेमे मिळू लागले. “सुरक्षा” हा सिनेमा इतका गाजला की नंतर त्यांची मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट एकाच वर्षात प्रदर्शित झाले.
“हम पांच” आठवतो का तुम्हाला ? नसिरुद्दीन शाह, राज बब्बर, संजिव कुमार, गुलशन ग्रोवर ही मंडळी एकाच चित्रपटात असतांना “भिमा” च्या रोल मध्ये Mithun Da ने छाप पाडली. मिथुनदा चा अभिनय त्यांचा बांधा आणि रंग प्रचलित हिंदी सिनेमातल्या स्टार ह्या पदवीसाठी अपारंपरिक होता. इतके सिनेमे करुनही त्यांचा असा ब्रॅन्ड तयार झाला नव्हता. तो तयार करावा असे त्यांच्या मनात नव्हतेही.
Mithun Da केवळ सुपरस्टार नव्हे डान्सिंग सुपरस्टार झाले
विशेष म्हणजे मिथुनदा ला डांस उत्तम जमायचा जो कदाचितच इतर सुपरस्टार म्हणवणाऱ्या नटांना जमत होता. बाबर सुभाष ह्यांनी मिथुनदा चा हा गुण हेरला. ते लिहीत असलेल्या कथेसाठी त्यांना उत्तम अभिनेता व डांसर हवा होता. ही कथा एका स्ट्रिट डांसरची होती जो पुढे जावून एक नावाजलेला डांसर बनतो. हो तोच “डिस्को डांसर” सिनेमा जो प्रचंड लोकप्रिय झाला आणि मिथुन ह्या नावाची भुरळ प्रेक्षकांना पडली. सुपरस्टार्स आपल्याकडे होतेच पण भारताला डांसिंग स्टार मिळाला तो ह्या चित्रपटामुळे. गल्ली गल्लीत पोरं हातात काडी माईक सारखी पकडुन “आय एम अ डिस्को डांसर” हे गाणं म्हणत नाचू लागली. बप्पी दा आणि मिथुन दा ने भारताला डिस्को वर अक्षरशः थिरकवले.
भारताच्या बाहेर युरोप मध्ये केवळ राज कपूरलाच ओळखत असत पण डिस्को डांसर रिलीझ झाल्यानंतर हे चित्र बदललं कारण युरोप मध्ये आत Mithun Chakraborty चे फॅन्स तयार झाले होते. ही भारतातील पहीली अशी फिल्म होती जिने जगभरात शंभर कोटीचा गल्ला जमावला. मग त्याच बरोबर “कसम पैदा करने वाले की” हा चित्रपट आला आणि आता मिथुन दा भारताचा अपारंपरिक असा सुपरस्टार झाला. त्यांच्यावर सिनेमाच्या ऑफर्सचा पाउस पडु लागला.
८० चे दशक त्यांनी अक्षरशः गाजवले. त्यांचे एकाच वर्षात १९ सिनेमे प्रदर्शित झाले. ज्यात दाता, बिस साल बाद, इलाका, ,मुज्रिम, प्रेम प्रतिग्या हे हिट सिनेमे होते. त्यांच्या इतक्या प्रमाणात आलेल्या सिनेमांचा त्यांच्याच सिनेमांना तोटाही झाला. पण एकीकडे अमिताभ हीट तर दुसरीकडे मिथुन दा कडे पाहून चित्रपट गृहात गर्दी करणारे प्रेक्षक असे चित्र दिसु लागले आणि मिथुन आणि अमिताभची तुलना होऊ लागली.
अनेक सिनेमांसाठी राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार
“अमितजी ही बेस्ट है” अस स्वतःच मिथुन दा म्हणतात. अग्निपथ चित्रपटात ह्या दोघांनी काम केले आणि तो सिनेमा म्हणजे अभिनयाची पर्वणीच. पण ह्यातल्या नारळ पाणी विकणाऱ्या क्रिश्नन अय्यरची भूमिका इतकी छान वठवली की त्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. टिकाकार आणि प्रेक्षक दोघांना खुश करणारा हा नट आहे. एकीकडे अग्निपथसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवत असतांना दुसरीकडे बंगाली सिनेमा “ताहदेर कथा” मधल्या भुमिकेसाठी त्यांना पुन्हा एकदा अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
समांतर सिनेमा बरोबरच असे सकस सिनेमे करणे सोपे नसतेच. १९९८ मध्ये त्यांनी “स्वामी विवेकानंद” चित्रपटासाठी “रामकृष्णन” च्या भुमिकेसाठी आपला तिसरा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. अगदी गरीबीतून वर आलेल्या ह्या माणसाला परिस्थितीची उत्तम जाण आहे. सिनेमा हेच आपले उदरनिर्वाहाचे साधन असू नये हे त्यांना कळाले कारण इथली अनिश्चितता त्यांना परिचयाची होती. “सुपरस्टार बन गए पर वो हमेशा के लिए नही होता” असे ते म्हणतात.
सिनेमा पासून दूर राहणं पसंत केले
त्यांनी काही काळ सिनेमा पासून दूर राहणं पसंत केले आणि “मोनार्क हॉटेल” नावाने हॉटेल्सचा व्यवसाय उटी मध्ये सुरु केला आणि उटी आणि आसपासच्या परीसरात चित्रीकरण असेल अशाच लो बजेट चित्रपटात काम करु लागले. त्यासाठी निर्मात्यांना “मोनार्क” हॉटेलमध्ये सवलत देऊ केली. म्हणून अनेक निर्मातेही तिथे Mithun Da ला घेऊन चित्रपट करु लागले. ह्या दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसच्या पाठींब्यावर ते राज्यसभेचे खासदार झाले. नुकताच २०१६ ला त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. दरम्यान लकी, विर, चिंगारी, मणी रत्नमचा गुरु ह्या सिनेमांमधुन ते आपल्या अभिनयात परत आले. काही दिवसांपूर्वी आलेल्या “ताश्केंत फाईल्स” ह्या सिनेमात त्यांनी पुन्हा उत्तम अभिनयाची झलक दाखवली आहे.
बोलण्यातल्या बंगाली लहेजा, अभिनयातला सच्चेपणा आणि मेहनत ह्या जोरावर नक्षली ते सुपरस्टार हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. “मै असानीं सें हार नहीं मानता, मै लढता हुं, कैसा भी वक्त हो, मै अपनी पुरी ताकत के साथ लढता हुं” असे ते म्हणतात. “जिंदगी मेरा गाना” हे ते जगले आहेत. त्यांच्या कडून असे प्रेरणा देणारे अनेक कामं होवोत हीच सदिच्छा.